Why Champions Trophy Winner Team Receive Special White Blazers with Trophy: चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ ची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. येत्या १९ फेब्रुवारीला ही स्पर्धा पाकिस्तान आणि दुबईमध्ये खेळवली जाणार आहे. या स्पर्धेमध्ये ८ उत्कृष्ट वनडे संघ सहभागी होणार असून ८ संघांची दोन गटात विभागणी केली आहे. दरम्यान या आयसीसी स्पर्धेसाठी सर्वच संघांनी आपल्या स्क्वॉड तर जाहीर केलेच आहेत. पण आयसीसीने बक्षिसाची रक्कमदेखील जाहीर केली. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या विजेत्या ट्रॉफी आणि बक्षिसाची रक्कम तर मिळतेच पण त्याचबरोबर विजयी संघाला पांढऱ्या रंगाचे ब्लेझर्सही घातलेलं आपण पाहिलं असेल. पण विजयी संघ हे ब्लेझर्स का घालतो, जाणून घ्या.

आयसीसीने १४ जानेवारीला चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठीचा एक नवीन प्रोमो जारी केला होता. यामध्ये पाकिस्तानचा दिग्गज खेळाडू वसीम अक्रम होता. त्याचबरोबर यापूर्वी झालेल्या वनडे सामन्यांचे काही व्हीडिओ होते. याचसह आपण एक पांढऱ्या रंगाचा ब्लेझर तयार होतानादेखील या व्हीडिओमध्ये पाहिलं. या ब्लेझरच्या खिश्यावर यंदाच्या चॅम्पियन्स ट्रॉफीचा लोगोदेखील आहे.

आयसीसीने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये अक्रमने या स्पर्धेचा वारसा सांगितला. आठ संघांच्या नुकत्याच झालेल्या कामगिरीबद्दलही त्यांनी भाष्य केले. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये विजेत्या संघाला ट्रॉफीसह पांढरा ब्लेझर दिला जातो. याची सुरूवात २००९ मध्ये करण्यात आली आणि त्यानंतर प्रत्येक वेळी विजेत्या संघाच्या खेळाडूंना हा ब्लेझर घातला जातो.

२०१३ मध्ये भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतरचे फोटो टीम इंडियाच्या चाहत्यांच्या मनात अजूनही ताजे आहेत. पण हे ब्लेझर फक्त चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर का देतात? आयसीसीच्या मते, प्रत्येक सामना महत्त्वाचा असतो आणि हा पांढरा कोट याचेच प्रतिनिधित्व करते. या प्रतिष्ठित स्पर्धेत सहभागी होणाऱ्या आणि चॅम्पियन बनण्यासाठी प्रत्येक सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंना परिपूर्ण असलेल्या संघात पराभूत करत चॅम्पियन्स होण्याचा सन्मान मिळवतात, म्हणून विजयी संघाला हा कोट दिला जातो. यामुळेच आयसीसी प्रत्येक चॅम्पियन्स ट्रॉफी विजेत्याला सामन्यानंतर सादर करते आणि संघ केवळ ट्रॉफीसाठीच नाही तर प्रतिष्ठित पांढऱ्या कोटसाठी देखील खेळतात.

आठ वर्षांच्या कालावधीनंतर खेळवली जात असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा १९ फेब्रुवारी ते ९ मार्च या १९ दिवसांत खेळवली जाणार आहे. अव्वल आठ संघांमध्ये १५ सामन्यांमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळणार आहे. स्पर्धेच्या सुरुवातीच्या टप्प्यासाठी आठ संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक संघ तीन गट-स्तरीय सामने खेळेल. या गटातील अव्वल दोन संघ सेमीफायनलसाठी पात्र होतील.

Story img Loader