Anurag Thakur on India vs Pakistan Bilateral Cricket: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय क्रिकेट संबंध बऱ्याच काळापासून बिघडले आहेत. गेल्या दहा वर्षांत या दोघांमध्ये एकही द्विपक्षीय मालिका आयोजित झालेली नाही. भारत आणि पाकिस्तान यांनी शेवटची मालिका २०१३मध्ये एकमेकांविरुद्ध खेळली होती. अलीकडेच आशिया कप २०२३मध्ये भारत आणि पाकिस्तान दोनदा आमनेसामने आले होते. मात्र, काही दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत एक कर्नल, एक मेजर आणि पोलीस उपअधीक्षक शहीद झाल्यानंतर पाकिस्तानसोबत क्रिकेट अजिबात खेळू नये, अशी मागणी जोर धरू लागली आहे. या मागणीदरम्यान भारताचे क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी मोठे वक्तव्य केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“पाकिस्तान जोपर्यंत सीमेपलीकडून होणारा दहशतवाद आणि भारतात घुसखोरी थांबवत नाही तोपर्यंत त्याच्यासोबत कोणतीही द्विपक्षीय मालिका खेळली जाणार नाही, असा निर्णय बीसीसीआयने फार पूर्वीच घेतला होता,” असे क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी सूचक विधान केले. सध्या, भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामने फक्त ICC टूर्नामेंटमध्येच होतात. याशिवाय या दोघांमध्ये बऱ्याच काळापासून कोणतीही द्विपक्षीय मालिका खेळली गेली नाही.

हेही वाचा: Aakash Chopra: “विराट कोहलीला संघातून वगळणे हे…”, आकाश चोप्राने टीम इंडियाला दिला आश्चर्यचकीत करणारा सल्ला

क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी शुक्रवारी सांगितले की, “जोपर्यंत खेळांचा संबंध आहे, बीसीसीआयने फार पूर्वीच ठरवले होते की पाकिस्तान जोपर्यंत घुसखोरी आणि सीमापार दहशतवाद थांबवत नाही तोपर्यंत द्विपक्षीय सामने होणार नाहीत. मला वाटते हीच देशातील प्रत्येक सामान्य नागरिकाची भावना आहे. यावर मी अधिक बोलू इच्छित नाही.”

आशिया चषक २०२३हे संपूर्णपणे पाकिस्तानमध्ये होणार होते, परंतु बीसीसीआयने सांगितले की भारत सरकारच्या परवानगीअभावी ते आपला संघ पाठवू शकत नाहीत. याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने २०२३ मध्ये भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकावर बहिष्कार घालण्याची धमकी दिली. मात्र, आशियाई क्रिकेट परिषदेने हायब्रीड मॉडेलनुसार आशियाई चषक आयोजित केले आणि काही सामने पाकिस्तानमध्ये खेळले गेले तर उर्वरित श्रीलंकेत होत आहेत.

हेही वाचा: IND vs BAN, Asia Cup: रोहित शर्मा नेपाळ विरुद्धची मॅच विसरला? हिटमॅन म्हणतोय, “या सीरिज मध्ये चेस…”

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया सध्या श्रीलंकेत आशिया कप खेळत आहे. भारताने अंतिम फेरी गाठली आहे. त्याचबरोबर पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर पडला आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील गट टप्प्यातील सामना पावसामुळे रद्द झाला. यानंतर सुपर-४च्या लढतीत भारताने पाकिस्तानचा २२८ धावांनी पराभव केला. आशिया चषकाचे अधिकृत यजमानपद पाकिस्तानकडे आहे हे विशेष. भारताने सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार दिला, त्यानंतर आशियाई क्रिकेट परिषदेने (ACC) संकरित मॉडेल स्वीकारले आणि श्रीलंकेला सह-यजमान बनवण्यात आले. पाकिस्तानमध्ये चार सामने आयोजित करण्यात आले होते, तर अंतिम सामन्यासह श्रीलंकेत ९ सामने आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Will india play bilateral cricket series with pakistan sports minister anurag thakur replied avw