WTC 2023 Final India vs Australia: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय संघाची कामगिरी अत्यंत खराब झाली आहे. पहिल्या दिवशी भारताच्या गोलंदाजांनी निराशा केली आणि ऑस्ट्रेलियन संघ ४६९ धावा करू शकला. त्याचवेळी दुसऱ्या दिवशी फलंदाजांनी निराशा केली आणि दोन दिवसांचा खेळ संपेपर्यंत भारताची धावसंख्या १५१/५ अशी आहे. टीम इंडिया अजूनही ऑस्ट्रेलियाच्या स्कोअरच्या ३१८ धावांनी मागे आहे आणि फॉलोऑन टाळण्यासाठी भारताला २६९ धावा गाठायच्या आहेत. आता टीम इंडियाच्या सर्व आशा अजिंक्य रहाणे आणि श्रीकर भरत यांच्यावर आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुन्हा एकदा, आयसीसी स्पर्धेतील एका मोठ्या सामन्यात अक्षरशः ढेपाळले असे म्हटले तर वावगं ठरणार नाही. रोहित शर्मा, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली चांगली सुरुवात केल्यानंतर छोट्या धावांवर बाद झाले. भारतीय अव्वल फळी अशा वेळी ढासळली जेव्हा त्याची सर्वाधिक गरज होती. भारताच्या आघाडीच्या चार फलंदाजांपैकी एकाही फलंदाजाला १५ धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. रवींद्र जडेजाच्या ४८ धावांच्या खेळीने खेळ सांभाळण्याचा प्रयत्न केला, पण तोही भारताला संकटातून बाहेर काढू शकला नाही.

ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी कसून गोलंदाजी करत भारतीय फलंदाजांवर दडपण ठेवले, पण दोन भारतीय फलंदाजांनी केलेली शॉटची निवड अतिशय खराब होती. चेतेश्वर पुजारा आणि शुबमन गिल यष्टीमध्ये येणारे चेंडू सोडून क्लीन बोल्ड होऊन पॅव्हेलियनमध्ये परतले. पुजारा अशा फलंदाजांपैकी एक आहे ज्याला त्याचा ऑफ स्टंप चांगलाच माहीत आहे, पण या सामन्यात त्याने अशी चूक केली जी कोणाच्याही पचनी पडणार नाही.

भारताचे माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री यांनी पुजाराचा चांगलेच फटकारले. ते म्हणाले, “पुजारा चेंडू वाईटरित्या सोडत होता, त्याचा पुढचा पाय लेगस्टंपच्या दिशेने जात आहे जेव्हा त्याचे शरीर चेंडूकडे जात असावे. तो आधी चेंडू खेळण्याचा प्रयत्न करत होता पण नंतर त्याने तो सोडण्याचा निर्णय घेतला. त्याचा हाच चुकीचा निर्णय टीम इंडियाला खूप महागात पडत आहे.”

हेही वाचा: WTC Final IND vs AUS: शुबमन-पुजाराला जाळ्यात अडकवलं! काही कळण्याच्या आत झाली दांडी गुल, टीम इंडियाची अवस्था बिकट; पाहा Video  

टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक शास्त्री म्हणाले की, “पुजाराने याआधी तीन वेळा इंग्लंडचा दौरा केला असून तो त्यात यशस्वीही ठरला आहे. कौंटी क्रिकेटमध्येही त्याने जबरदस्त कामगिरी केली आहे, परंतु या सामन्यात त्याची शॉटची निवड वाईट होती. मागच्या वर्षीही पुजाराची त्याच्या काऊंटी अनुभवामुळे इंग्लंडविरुद्धच्या एकमेव कसोटीसाठी निवड झाली होती, पण तिथेही त्याने फारशी चांगली कामगिरी केली नाही. आता त्याने ओव्हलवरही निराशा केली.”

भारताचे समालोचक शास्त्री पुढे म्हणाले की, “शुबमन गिलने चूक करणे समजण्यासारखे आहे कारण अद्याप  तो नवीन असून त्याला खूप काही शिकायचे आहे. त्याच्यासारख्या तरुणांसाठी हे सुरुवातीचे शिकण्याचे दिवस आहेत, परंतु १००-कसोटींचा अनुभव गाठीशी असणाऱ्या पुजाराला त्याचा ऑफ-स्टंप कुठे आहे हे माहित असले पाहिजे, अशा फुटकळ चुका करून टीम इंडियाला अडचणीत आणत आहात हे त्यांनी समजून घेतले पाहिजे.”

हेही वाचा: WTC 2023: “राष्ट्रगीतावेळी दिसणारा जोश मैदानात दाखवता येत नसेल तर…”, मॅथ्यू हेडनची रोहित ब्रिगेडवर सडकून टीका

रवी शास्त्री म्हणाले, “आम्ही इंग्लंडमध्ये चेंडू सोडण्याबद्दल नेहमी चर्चा करतो. तुमचा ऑफ स्टंप कुठे आहे हे जाणून घेण्याबद्दल आम्ही नेहमी खेळाडूंना मार्गदर्शन करत असतो. शुबमन गिल त्याच्या फूटवर्कमध्ये थोडा आळशी आहे. तो काळाबरोबर शिकेल, तो अजूनही तरुण आहे. पण, पुजारा हा अनुभवी असून त्याच्याकडून झालेली चूक पाहून निराश झालो. त्याचे पाय चेंडूच्या दिशेने एका सरळ रेषेत असायला हवे होते. त्यामुळेच प्रशिक्षक तुम्हाला सांगतात की तुमचा ऑफ-स्टंप कुठे आहे हे तुम्हाला माहीत असावे.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wtc final ravi shastri angry with pujaras shot selection said he has 100 test experience did not expect this from him avw
Show comments