Ramiz Raja Criticizes Pakistan Team Management : आयसीसी टी-२० विश्वचषक २०२४ या स्पर्धेच्या तयारीसाठी इंग्लंडमध्ये टी-२० मालिका खेळण्यासाठी गेलेला पाकिस्तान संघ अपयशी ठरला. चार सामन्यांच्या या मालिकेत संघाचा २-० असा पराभव झाला. पावसामुळे दोन सामने रद्द झाले, मात्र उर्वरित दोन सामन्यांमध्ये यजमान संघाने बाबर आझमच्या सेनेचा पराभव केला. या पराभवानंतर पाकिस्तानचा माजी क्रिकेटर रमीझ राजा संतापला आहे. पीसीबीचे माजी अध्यक्ष रमीझ राजा यांनी संघ व्यवस्थापनावर टीका केली. या दिग्गज खेळाडूने पाकिस्तान संघात प्रयोग करण्याबाबत चिंता व्यक्त केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पाकिस्तान संघाचा सत्यानाश केला –

संघ व्यवस्थापनावर टीका करताना रमीझ राजाने आपल्या यूट्यूब चॅनलवर सांगितले की, “त्यांनी संघासोबत प्रयोग करणे थांबवले पाहिजे. योग्य संघासह सामन्यात प्रवेश केला पाहिजे. तुम्हाला स्ट्राइक रेटची भीती दूर करणे आवश्यक आहे, कारण तुमच्याकडे असे खेळाडू नाहीत. तुम्ही या संघाचा सत्यानाश केला आहे.” युवा फलंदाज सॅम अयुबला सलामीवीर म्हणून मैदानात उतरवण्याच्या निर्णयाबद्दल या अनुभवी खेळाडूने खुलेपणाने आपले मत व्यक्त केले.

रमीझ राजा पुढे म्हणाला, “तुम्ही सलामीची जोडी (बाबर आणि रिझवानची) तोडून संघाचा सत्यानाश केला आहे. मधल्या फळीची भूमिकाही योग्य नाही. तुम्ही अष्टपैलू खेळाडूंना मध्यभागी ठेवले आहे आणि दोन विकेटकीपर खेळत आहेत. तुम्ही वेगवान गोलंदाज बदलत आहात. तुमचे फिरकीपटू चेंडू स्पिन करत नाहीत आणि त्यांच्यात आत्मविश्वासाची कमतरता आहे. तुम्ही इमाद वसीमला प्लेइंग इलेव्हनमधून वगळले. कोणत्याही बाजूने हालचाल नाही आणि तुम्ही टी-२० विश्वचषकापूर्वी संघ पूर्णपणे उद्ध्वस्त केला आहे.”

हेही वाचा – Brydon Carse : इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजावर बंदी, सट्टेबाजी प्रकरणात दोषी आढळल्याने कारवाई

सॅम आयुब ठरला फ्लॉप –

नुकत्याच झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत सॅम अयुबला सुरुवातीला फॉर्म परत मिळवण्यात अडचणी आल्या. मात्र, त्याने पहिल्या सामन्यात २९ चेंडूत ४५ धावांची झटपट खेळी करत चांगलीच सुधारणा दाखवली. न्यूझीलंडविरुद्धच्या चार सामन्यांमध्ये २१ वर्षीय अयुबने १४.२५ च्या सरासरीने ५२ धावा केल्या आणि मालिकेतील त्याची सर्वोच्च धावसंख्या ३२ धावा होती. अयुब संघात सामील होण्यापूर्वी, बाबर आणि रिझवान पाकिस्तानी संघासाठी सलामीवीर म्हणून खेळत होते, ज्यांनी टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वात नेत्रदीपक सलामी दिली होती. २०२२ मध्ये खेळल्या गेलेल्या शेवटच्या टी-२० विश्वचषकादरम्यान बाबर आणि रिझवान यांनी शानदार फलंदाजी केली. या स्पर्धेत त्याची तीन शतकी सलामी भागीदारीही पाहायला मिळाली.

हेही वाचा – T20 WC 2024 : टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात आतापर्यंत कसा राहिलाय टीम इंडियाचा प्रवास? जाणून घ्या..

९ जूनला भारताशी लढत –

आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानला अ गटात ठेवण्यात आले असून त्यात कट्टर प्रतिस्पर्धी भारत, कॅनडा, यूएसए आणि आयर्लंड या प्रमुख संघांचा समावेश आहे. गुरुवारी टेक्सासमधील ग्रँड प्रेरी स्टेडियमवर यजमान यूएसए विरुद्धच्या सामन्याने त्यांचा प्रवास सुरू होईल. यानंतर बाबर आझमचा संघ ९ जूनला भारताशी भिडणार आहे. हा सामना न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: You ruined the team ramiz raja criticizes pakistan team management after the t20 series defeat against england vbm
Show comments