पीटीआय, दुबई

ऑस्ट्रेलियात भारताला पराभव पत्करावा लागला यापेक्षा मायदेशात न्यूझीलंडविरुद्ध झालेला ०-३ हा पराभव भारतीय क्रिकेटसाठी सर्वांत निराशाजनक होता, असे मत भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने व्यक्त केले. यो दोन्ही मालिकांत फलंदाजांचे अपयश खूप महत्त्वाचे होते. रोहित शर्मा आणि विराट कोहली या प्रमुख फलंदाजांना दोन्ही मालिकांत चमक दाखवता आली नाही. यामुळे दोघांवर चौफेर टीका होत असताना युवराजने मात्र त्यांची पाठराखण केली आहे.

‘‘ऑस्ट्रेलियाने नेहमीच आपले वर्चस्व राखले आहे. यापूर्वी आपण त्यांच्यावर मात केली हा इतिहास झाला. त्यानंतरही ऑस्ट्रेलियाने आपला आलेख कायम उंचावला. भारताने मात्र प्रयत्नांची कास सोडली. न्यूझीलंडविरुद्ध आलेले अपयश सर्वात निराशाजनक होते असे मी पुन्हा पुन्हा सांगेन. पण, रोहित आणि विराटला दोषी धरणे चुकीचे नाही. हे दोन्ही अनुभवी फलंदाज आहेत. त्यांचे योगदान मोठे आहे आणि ते सहजासहजी विसरता येणार नाही. त्यांना यातून बाहेर पडण्यासाठी वेळ देणे गरजेचे आहे,’’असे युवराज म्हणाला.

‘‘पराभव पचवण्याची ताकद असायला हवी. चांगले खेळतात तेव्हा कुणी बोलत नाही. पण, वाईट खेळायला लागल्यावर सगळे पुढे येतात. प्रसारमाध्यमे तर वाटच बघत असतात. पण, मी टीका करणार नाही. मी या खेळाडूंचे समर्थनच करेन. खेळाडूंवर टीका करणे सोपे असते, पाठिंबा देणे कठीण असते,’’ असे युवराजने सांगितले.

Story img Loader