गेल्या बऱ्याच महिन्यांपासून भारताचा क्रिकेटपटू युझवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी वेग धरला होता. पण आता युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांचा दोघांच्या संमतीने घटस्फोट झाल्याचे वकिलांनी माहिती दिली आहे. आज २० मार्च रोजी धनश्री-चहलच्या घटस्फोटाची सुनावणी होती, त्यानंतर या दोघांचाही आता घटस्फोट झाला आहे.

चहल आणि धनश्री दोघांनी वांद्रे येथील कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला होता. आता गुरुवारी, २० मार्च रोजी कौटुंबिक न्यायालयाने दोघांचे घटस्फोटाचे अपील मंजूर केले आहे. यासह ४ वर्ष आणि ३ महिन्यांनंतर दोघेही विभक्त झाले आहेत.

गुरुवारी २० मार्च रोजी मुंबईच्या वांद्रे फॅमिली कोर्टाने घटस्फोटावर अंतिम निर्णय दिला. या सुनावणीसाठी चहल आणि धनश्री पोहोचले होते. चहल प्रथम काळे जॅकेट आणि मास्क घालून त्याच्या वकिलांसह पोहोचला. काही वेळाने धनश्री पांढरा टी-शर्ट घालून पोहोतली. तर तिनेही चेहऱ्यावर मास्क लावला होता. या दोघांचे व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत होते.

मुंबई फॅमिली कोर्टाने युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांचा घटस्फोट मंजूर केला आहे. युझवेंद्र चहलचे वकिल नितीन गुप्ता यांनी चहल आणि धनश्री यांचा घटस्फोट झाल्याचे सांगितले. वकिल म्हणाले, “दोघांचेही लग्न संपुष्टात आले आहे. दोन्ही पक्षांचा आता अधिकृतपणे घटस्फोट झाला आहे आणि आता ते दोघेही पती-पत्नी नाहीत. त्यांची संयुक्त याचिका स्वीकारण्यात आली आहे.”

चहल-धनश्रीचं ४ वर्षांपूर्वी झालं होतं लग्न

चहल आणि धनश्री २४ डिसेंबर २०२० रोजी विवाहबंधनात अडकले होते. तीन-चार महिन्यांपूर्वी त्यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या बातम्या येऊ लागल्या. दरम्यान त्यांनी इन्स्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केले, तर एकमेकांचे फोटोही त्यांनी सोशल मीडियावरून डिलीट केले होते. अफवा सुरू असतानाच गेल्या महिन्यातच घटस्फोटाची प्रक्रिया सुरू झाल्याचे समोर आले आणि आज २० मार्चला अखेरीस त्यांच्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब झाला.

Story img Loader