आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी पहिल्या वेळी आधार गरजेचे नाही. मात्र दुसऱ्या वेळी लाभ घेताना ते अनिवार्य असल्याचे ज्येष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे.
जर आधार क्रमांक नसेल तर लाभार्थीने आधारसाठी नोंद केल्याची कागदपत्रे सादर करणे गरजेचे असल्याचे राष्ट्रीय आरोग्य संस्थेचे मुख्य कार्यकारी प्रमुख इंदू भूषण यांनी स्पष्ट केले. ‘आधार’च्या अंमलबजावणीची जबाबदारी या संस्थेकडे आहे. ‘आधार’ घटनात्मक वैध असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर त्याबाबत उपाययोजना केली जात आहे. तसेच या संदर्भात न्यायालयाच्या आदेशाचा अभ्यास करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आयुष्मान योजनेचा लाभ पहिल्यांदा घेण्यासाठी आधार किंवा निवडणूक ओळखपत्र दाखवावे लागेल असे त्यांनी स्पष्ट केले.
आयुष्मान भारत राष्ट्रीय आरोग्य विमा योजनेचे नाव बदलून आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना असे करण्यात आले. २३ सप्टेंबरला पंतप्रधानांच्या हस्ते झारखंडमधून त्याची सुरुवात करण्यात आली. योजना सुरू झाल्यापासून ४७ हजार जणांनी या योजनेचा फायदा घेतला आहे. जगातील सर्वात मोठी आरोग्य विमा योजनेत याची गणना केली जाते. ९२ हजार जणांना गोल्ड कार्ड्स दिल्याचे राष्ट्रीय आरोग्य संस्थेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिनेश अरोरा यांनी सांगितले. या योजनेत प्रत्येक कुटुंबाला प्रतिवर्षी पाच लाख रुपयांचे आरोग्य विमा कवच आहे. १० कोटी ७४ लाख गरीब कुटुंबांना याचा लाभ मिळणे अपेक्षित आहे. लाभार्थीना रोकडरहित व कागदरहित सेवा दिली जाणार आहे. योजनेतील ९८ टक्के लाभार्थी निश्चित असून, देशभरातील चौदाशे खासगी व सरकारी रुग्णालयांनी त्यासाठी नोंद केली आहे.