बडोद्यामधल्या खवय्यांसाठी एक वाईट बातमी आहे ती म्हणजे पाणीपुरीच्या विक्रीवर सध्या बंदी घालण्यात आली आहे. बडोद्यात गोलगप्पा नावानं ओळखल्या जाणाऱ्या पाणीपुरीवर सध्या आरोग्यासाठी अपायकारक असल्याचा शिक्का मारत महापालिकेनं बंदी घातली आहे. पाणीपुरी बनवण्याची पद्धत आरोग्याला हानीकारक असल्याचा निष्कर्ष पालिकेनं काढला आहे. पावसाळ्यामध्ये संसर्गजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढतो. याच कालावधीच विविध रोगांच्या साथी फैलावतात आणि त्या नंतर पालिकांसाठी डोकेदुखी बनतात. सध्या ज्या प्रकारे पाणीपुरी बनवल्या जातात ते बघितलं तर या वातावरणात टायफॉइड, कावीळ व विषबाधेमुळे होणारे रोग बळावतील त्यामुळे सध्या पाणीपुरीच्या विक्रीला बंदी घालत असल्याचं स्पष्टीकरण महापालिकेनं दिलं आहे. पाणीपुरी विकण्यात येणाऱ्या अनेक गाड्यांवर, दुकानांवर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी छापे मारले व त्यांना अत्यंत अपायकारक पद्धतीनं पाणीपुरी बनवलं जात असल्याचं आढळलं, असं सांगण्यात आलं आहे. पालिकेच्या आरोग्यविभागानं यावेळी जप्त केलेलं हजारो किलोंचं सामान फेकून दिलं आहे. खराब झालेलं पीठ, सडलेले बटाटे, घाणेरडं तेल व दुर्गंधीयुक्त पाणी यांचा यात समावेश आहे. शहरभरातल्या छाप्यांमध्ये 50 जागांची कसून तपासणी केली असता हे वास्तव समोर आलं आहे. सगळ्या प्रकारच्या खाद्यविक्रेत्यांनी पावसाळा संपेपर्यंत पाणीपुरी विकू नये असा आदेश पालिका प्रशासनानं काढला आहे.