शरीराच्या योग्य वाढीसाठी आहारात सकस आणि पौष्टिक पदार्थांचा समावेश करणं गरजेचं आहे. त्यामुळे रोजच्या जेवणात पालेभाज्या किंवा कडधान्य यांचा समावेश आवर्जुन करायला हवा. सर्वसामान्यपणे प्रत्येकाच्या स्वयंपाक घरात काही ठराविक कडधान्य असल्याचं पाहायला मिळतं. यात मूग,मटकी, वाल, वाटाणे, चणे यांचा समावेश असतो. परंतु, या कडधान्यांव्यतिरिक्त काळे वाटाणेदेखील तितकेच चवीचे आणि गुणकारी आहेत. परंतु, त्याचे फायदे फार कमी जणांना माहित आहेत. अनेक वेळा कोकणी किंवा मालवणी माणसांच्या जेवणामध्ये काळ्या वटाण्याची उसळ किंवा आमटी यांचा हमखास समावेश असल्याचं पाहायला मिळतं. विशेष म्हणजे चवीने रुचकर असलेल्या या कडधान्याचे काही फायदे आहेत, ते आज आपण जाणून घेऊ - १. काळ्या वाटाण्यांचं सेवन केल्यामुळे हृदयाशी संबंधित समस्या किंवा तक्रारी दूर राहू शकतात. काळ्या वाटाण्यांमध्ये अँटी- इंफ्लेमेट्री तत्व आणि अँटी ऑक्सिडेंटचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर असतं. त्यामुळे हृदयाशीनिगडीत आजार दूर ठेवण्यास मदत होते. २. काळ्या वाटाण्यांमध्ये फायबर आणि अतिरिक्त फॅट कमी करण्याची क्षमता असते. त्यामुळे काळ्या वाटाण्याची आमटी किंवा भाजी यांचा आहारात समावेश केला, तर वजन नियंत्रणात राहतं. ३. काळे वाटाणे मधुमेहींसाठी गुणकारी आहेत. ४. काळ्या वाटाण्यांमुळे पचनक्रिया सुधारते. ५. काळ्या वाटाणे कर्करोगावरदेखील गुणकारी असल्याचं म्हटलं जातं. (काळे वाटाणे शरीरासाठी गुणकारी जरी असले तरीदेखील कोणताही उपाय करण्यापूर्वी डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)