टेलीकॉम कंपनींमध्ये सुरु असणारे वॉर थांबायचे नाव घेत नाहीये. रिलायन्स जिओने बाजारात प्रवेश केल्यापासून हे वॉर जास्तच रंगले आहे. एका कंपनीने इंटरनेट डेटा किंवा इतर कोणतीही ऑफर जाहीर केली की इतर कंपन्याही आपल्या वेगवेगळ्या ऑफर्स जाहीर करत ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. बीएसएनएलही या स्पर्धेत मोठ्या जोमाने उतरली असल्याचे दिसते. मागच्या काही दिवसांपासून कंपनी आपले एकाहून एक असे प्लॅन जाहीर करत आहे. नुकताच कंपनीने आपला ७५ रुपयांचा रिचार्ज प्लॅन लाँच केला असून यामध्ये ग्राहकांना चांगल्या सुविधा मिळणार आहेत. बीएसएनएलच्या ७५ रुपयांच्या प्रीपेड रिचार्जवर ग्राहकांना अनलिमिटेड व्हॉईस कॉल्स, १० जीबी डेटा आणि ५०० एसएमएस मिळणार आहेत. या नव्या BSNL रिचार्ज पॅकची व्हॅलिडिटी १५ दिवसांची असून १५ दिवसानंतर ग्राहकांना ९८ रुपये किंवा त्याहून जास्त किंमतीचे रिचार्ज करावे लागेल. या रिचार्जनंतर आणखी १८० दिवसांची वैधता वाढवून मिळणार आहे. कंपनीने हा प्लॅन Reliance Jio च्या ९८ रुपयांच्या प्लॅनला आव्हान देण्यासाठी तयार केला आहे. जिओच्या पॅकमध्ये २ जीबी ४जी डेटा आणि ३०० मेसेज मिळत आहेत. या प्लॅनची वैधता २८ दिवसांची असून हे सर्व दिवस अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग मिळणार आहे. याआधी बीएसएनएलने जिओच्या १९८ रुपयांच्या प्लॅनला पर्याय म्हणून १७१ रुपयांचा प्लॅन लॉन्च केला होता. बीएसएनएलच्या या नव्या प्लॅनमध्ये युजर्सला एका महिन्यासाठी ६० जीबी म्हणजेच दरदिवशी २ जीबी ३ जी डेटा मिळेल असे सांगण्यात आले होते. याशिवाय अमर्यादित व्हॉइस कॉल्सची आणि मोफत एसएमएसची सुविधाही होती. सध्या बीएसएनएलचा हा प्लॅन केवळ तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्येच उपलब्ध करण्यात आला असला तरी लवकरच तो अन्य ठिकाणीही सुरु होईल असे कंपनीने सांगितले होते. याशिवाय बीएसएनएलने आपल्या ९९९, ६६६, ४८५ आणि ४२९ व १८६ रुपयांच्या प्लॅनमध्येही जास्तीचा डेटा देत आहे. मोबाईल इंटरनेटच्या प्लॅन्सबरोबरच बीएसएनएलने ब्रॉडबँडच्या प्लॅनमध्येही बरेच बदल केले आहेत. या क्षेत्रात आपले स्थान कायम रहावे असा कंपनीचा प्रयत्न आहे.