Chanakya Niti In Marathi: चाणक्य नीतिमध्ये जीवन यशस्वी करण्यासाठी अनेक प्रकारची धोरणे सांगितली आहेत. असं म्हणतात की जो व्यक्ती या धोरणांना चांगल्या प्रकारे समजून घेतो आणि आपल्या जीवनात त्याचा अवलंब करतो तो त्याच्या आयुष्यातील अनेक समस्यांना एका चुटकीत दूर करू शकतो. चाणक्य नीतिमध्ये सांगितले आहे की, आपण पैशाचा व्यवहार कसा करावा, पैशाची बचत कशी करावी आणि त्या पैशाचा योग्य वापर करण्याचा मार्ग काय आहे?
चाणक्य नीति सांगते की, संपत्ती जमा करण्यासोबतच ती योग्य ठिकाणी गुंतवावी. पैशाचा नेहमी आदर केला पाहिजे. कारण पैसा नेहमी व्यक्तीला आदर मिळवून देतो आणि संकटांशी लढण्यास मदत करतो. ज्या देशात किंवा प्रदेशात रोजगार, हितचिंतक, सन्मान आणि शिक्षण उपलब्ध नाही अशा ठिकाणी कोणी राहू नये. आपल्या आजूबाजूला जिथे गरजेच्या सर्व गोष्टी आहेत त्याच ठिकाणी राहणे फायदेशीर असतं.
चाणक्य नीति म्हणतं की, पैसा लोककल्याणासाठी देखील वापरला गेला पाहिजे. म्हणजेच पैसा लोकांच्या कल्याणासाठी वापरला गेला पाहिजे. अशा लोकांचा सर्वत्र आदर केला जातो. पैसा नेहमी सुरक्षित ठेवला पाहिजे. देखाव्यावर अनावश्यक खर्च करणे टाळा. जे इतरांना दाखवण्यासाठी पैसा खर्च करतात, अशा लोकांची संपत्ती लवकर वाया जाते.
चाणक्य नीतिमध्ये असंही सांगण्यात आलंय की, संपत्तीच्या बाबतीत अहंकार बाळगू नये. कारण अहंकार माणसाच्या बुद्धीला भ्रष्ट करतो. त्यामुळे व्यक्तीचं धन लवकर नष्ट होतं. असं करणं टाळावं. चाणक्य नीतिनुसार जो व्यक्ती स्वतःचं ध्येय ठरवू शकत नाही तो कोणत्याही कामात विजयी होऊ शकत नाही. म्हणून प्रथम ध्येय निश्चित करा आणि ते साध्य करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करा.
तुम्ही कोणतेही काम सुरू करणार असाल, तर हे तीन प्रश्न स्वतःला नक्कीच विचारा- आधी मी हे काम का करत आहे? या कामाचे फलित काय असेल? मी हे करू शकतो का? या तीन प्रश्नांची उत्तरे सापडली, तरच कामाला सुरुवात करा. अशा प्रकारे, यश मिळण्याची शक्यता वाढेल.