भारतीय संविधानाचा स्वीकार ज्या दिवशी केला गेला तो दिवस म्हणजे २६ नोव्हेंबर. दरवर्षी हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस राष्ट्रीय कायदा दिन म्हणून पण ओळखला जातो. १९४९ मध्ये यादिवशी भारतीय संसदेने अधिकृतपणे संविधानाचा स्वीकार केला. २६ जानेवारी १९५० पासून संविधान देशात लागू झाले. १९ नोव्हेंबर, २०१५ रोजी केंद्रीय सामाजिक आणि सशक्तीकरण मंत्रालयाने २६ नोव्हेंबर संविधान दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. चला तर मग जाणून घेऊयात याचा इतिहास, महत्व………

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इतिहास

भारतीय संविधान आणि घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ भारतीय संविधान दिन साजरा केला जातो. भारत सरकारने आंबेडकरांचे १२५ वे जयंती वर्ष साजरे केले जात असताना त्यांना एक प्रकारची श्रद्धांजली वाहण्यासाठी २६ नोव्हेंबर २०१५ रोजी पहिला अधिकृत संविधान दिन साजरा केला. संविधानाबाबत जनजगृती करण्यासाठी आणि आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने देशभरात २६ नोव्हेंबर हा दिवस ‘संविधान दिन’ म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने २४ नोव्हेंबर २००८ ला आदेश काढून ‘२६ नोव्हेंबर’ हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्याचे घोषित केले होते.

महत्त्व

संविधान दिन किंवा राष्ट्रीय विधी दिन हा २६ नोव्हेंबर रोजी भारतभर साजरा केला जातो. २९ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी मसूदा समिती स्थापन झाली. अनेक बैठका व चर्चासत्रांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने स्वीकारला. त्यामुळे २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो.

आपल्या संविधानाने देशातील प्रत्येक नागरिकाला स्वतंत्र भारतात राहण्याचा समान अधिकार दिला आहे. पाश्चिमात्य संस्कृतीच्या युगात देशातील तरुणांमध्ये संविधानाची मूल्ये रुजवणे हा संविधान दिन साजरा करण्यामागचा एकमेव उद्देश आहे. आपल्या देशाच्या संविधानाच्या निर्मितीमध्ये डॉ. भीमराव आंबेडकर यांचा सर्वात महत्त्वाचा वाटा होता. त्यामुळे त्यांना आदरांजली वाहण्याचे प्रतीक म्हणूनही संविधान दिन साजरा केला जातो.

भारतीय संविधानाचे महत्वाचे दहा मुद्दे

भारताचे संविधान ब्रिटन, आयर्लंड, जपान, अमेरिका, दक्षिण आफ्रिका, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, कॅनडा यांच्यासह अन्य देशांच्या मसुद्यांनी प्रेरित आहे.

भारताचे संविधान एक हस्तलिखित दस्तावेज आहे. हा जगातील सर्वात मोठ्या हस्तलिखित दस्तावेजांपैकी एक आहे. मूळ इंग्रजी मसुद्यात १ लाख १७ हजार ३६९ शब्द आहेत.

भारताच्या मूळ संविधानात समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष या दोन शब्दांचा प्रस्तावनेत थेट उल्लेख नव्हता. पण ४२व्या घटनादुरुस्तीद्वारे तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या सरकारने प्रस्तावनेत समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष या दोन शब्दांचा थेट समावेश केला. प्रस्तावनेत १९७६ मध्ये ही घटनादुरुस्ती झाली. प्रस्तावनेत आतापर्यंत झालेली ही एकमेव घटनादुरुस्ती आहे.

भारतीय संविधानाची मूळ संरचना भारत सरकार अधिनियम १९३५ वर आधारित आहे.

भारताच्या संविधान सभेची स्थापना १९४६ मध्ये झाली. या सभेचे कामकाज २ वर्ष ११ महिने, १८ दिवस यात सामावलेले १६६ दिवस सुरू होते.

भारतीय संविधानाची मूळ हस्तलिखित प्रत आजही संसदेच्या पुस्तकालयात उपलब्ध आहे.

भारताच्या संविधान सभेने २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधानाच्या मुसद्याला मंजुरी दिली. ही मंजुरी मिळताच जयजयकार, जयघोष, बाक वाजवणे या पद्धतीने संविधान सभेच्या सदस्यांनी आनंद साजरा केला.

संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी संविधानाच्या मसुद्याला मंजुरी देण्याचा प्रस्ताव सादर केला. यावेळी केलेल्या भाषणात त्यांनी गांधींना श्रद्धांजली अर्पण केली. गांधीविचारांनी हा एक अनोखा विजय मिळवल्याचे ते म्हणाले.

संविधानाच्या मसुद्याला मंजुरी मिळाल्यानंतर जण-गण-मन झाले आणि संविधान सभेचे त्या दिवशीचे कामकाज संपले. स्वातंत्र्यसैनिक पूर्णिमा बॅनर्जी यांनी जण-गण-मन हे राष्ट्रगीत गायले.

संविधानातील तरतुदीनुसार सभागृहाने २४ जानेवारी १९५० रोजी देशाच्या पहिल्या राष्ट्रपतींची निवड झाली. एका विशेष अधिवेशनात संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांना भारतीय गणराज्याचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवडण्यात आले.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Constitution day celebrated 26th november get know some important things about it scsm