पूर्वीच्या काळी पायाला मुक्कामार लागला किंवा पायाला सूज आली की आजीबाईच्या बटव्यातून हळूच आंबेहळद डोकं वर काढी. त्याकाळी आतासारखे दवाखाने किंवा हॉस्पिटल नव्हते. त्यामुळे वैदयबुवा असो किंवा घरचा आजीचा बटवा शरीरावर कोणताही मार लागला की त्यावर आंबेहळदीचा लेप लावला जाई. कालांतराने प्रत्येकाच्या घरातून आंबेहळद हळूहळू कमी झाली आणि त्याची जागा पेनकिलर किंवा अन्य औषधांनी घेतली. परंतु, आंबेहळद ही अत्यंत गुणकारी आहे. त्यामुळे फार कमी जणांच्या घरात किंवा आयुर्वेदिक दुकानात आंबेहळद मिळते. विशेष म्हणजे आंबेहळद की वेळ मार लागल्यावरच वापरतात हा एक समज आहे. आंबेहळदीचे अनेक गुणकारी फायदे आहेत.त्यामुळे हे फायदे कोणते ते जाणून घेऊयात. १. मुक्कामार किंवा सूज आल्यावर आंबेहळद उगाळून त्याचा लेप लावा त्यामुळे सूज कमी होते. २. शरीराचा एखादा भाग दुखत असल्यास त्यावर आंबेहळदीचा लेप लावल्यास वेदना कमी होतात. ३. साकलेल्या रक्ताचा प्रवाह सुरळीत होतो. यासाठी आंबेहळद उगाळून कोमट करुन ती रक्त साकळलेल्या जागेवर लावावी. ४. शरीरातील कोणत्याही भागात गाठ आली असेल तर आंबेहळदीचा लेप लावावा. ५.अंगावरील पूरळ दूर होतात. ६.आंबेहळद आणि साय एकत्र करुन त्याचा लेप लावल्यास त्वचेचा रंग उजळतो दरम्यान, आंबेहळद ही तीक्ष्ण असून ती कधीही खात नाहीत. त्यामुळे तिचा वापर कायम बाह्यअंगावरच केला जातो. (ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘लोकसत्ता ऑनलाइन’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)