Randeep Hooda weight Loss : बॉलीवूड अभिनेता रणदीप हुड्डा हा त्याच्या फिटनेससाठी ओळखला जातो. नुकतेच त्याने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर आधारित बायोपिक चित्रपटामध्ये काम केले. त्यासाठी त्याला वजन कमी करावे लागले. याविषयी रणदीप सांगतो की, एका क्लायमॅक्स सीनसाठी त्याने २८ दिवसांमध्ये १८ किलो वजन कमी केले. “मी २८ दिवसांमध्ये १८ किलो वजन कमी केले, हे एक कठोर पाऊल होते. मी खाणे पिणे सोडले, त्यामुळे वजन लवकर कमी झाले. दीड वर्ष माझे वजन कमी होते,” असे डिजिटल क्रिएटर शुभंकर मिश्राबरोबर बोलताना रणदीपने सांगितले.
वजन कमी करण्याची इच्छा असणाऱ्या लोकांना तुम्ही असेच वजन कमी करण्याचा सल्ला द्याल का, असे रणदीपला जेव्हा विचारले तेव्हा त्याने स्पष्ट नकार दिला. तो म्हणाला, “वजन कमी करण्यासाठी आणि चांगले दिसण्यासाठी उपवास हा एक उत्तम मार्ग आहे. उपवासापेक्षा चांगले काहीही नाही. संपूर्ण आयुष्यात आपली पचनसंस्था सतत काम करते आणि अनेकदा पोटाच्या किंवा आतड्यांशी संबंधित आरोग्याच्या समस्या उद्भवतात. जेव्हा तुम्ही काही उपवास करता, तेव्हा पोटाला किंवा आतड्यांना आराम मिळतो. उपवास आपल्याला जास्त ऊर्जा देते. ही ऊर्जा जेवल्यानंतर मिळालेल्या ऊर्जेपेक्षा जास्त असते. तुम्ही काहीही खाल्ले नाही तरी तुम्हाला सक्रिय ठेवते, त्यामुळे तुम्ही १-२ दिवस उपवास ठेवू शकता.”
रणदीप सांगतो की, “उपवास करताना आपण काय खातो किंवा काय नाही याची काळजी घेतली पाहिजे, तुम्ही काहीही खाऊ नका.पाणी, ब्लॅक कॉफी किंवा ब्लॅक टी पिऊ नका. लिंबू पाणी, नारळ पाणी पिऊ नका. तुम्ही जितका जास्त वेळ उपवास ठेवू शकता तितके ते तुमच्या आरोग्यासाठी आणि तुमच्या दिसण्यासाठी असते.”
याविषयी द इंडियन एक्स्प्रेसनी तज्ज्ञांच्या हवाल्याने सविस्तर माहिती जाणून घेतली. रणदीपच्या विधानावरून उपवासाविषयी असलेली लोकांची सामान्य समज दिसून येते. पण, याविषयी सावधगिरी बाळगणे तितकेच महत्त्वाचे आहे, असे क्लिनिकल आहारतज्ज्ञ गरिमा गोयल सांगतात.
खरं काय?
उपवासामुळे पचनसंस्थेला आराम मिळतो. अधून मधून (१४-१६ तास) उपवास केल्याने आतड्यांच्या आरोग्यास फायदा मिळू शकतो. छातीतील जळजळ कमी होऊ शकते आणि इन्सुलिन संवेदनशीलता सुधारू शकते. कमी कालावधीसाठी केलेल्या उपवासामुळे सतर्कता सुधारू शकते. काही लोकांना उपवास केल्यानंतर उत्साही वाटते, कारण पचनक्रियेसाठी आवश्यक असलेली ऊर्जा साठवलेली असते, तसेच उपवास करताना नॉरपेनेफ्रिन (norepinephrine) सारखे हार्मोन्स वाढू शकतात.
उपवास करताना काय काळजी घ्यावी?
“तुम्ही जितके जास्त वेळ उपवास कराल तितके चांगले आहे.” प्रत्येकाला हे लागू होत नाही, असे गोयल सांगतात.
जास्त काळ उपवास (२४-४८ तास) शरीरावर ताण येऊ शकतो. विशेषत: महिलांवर याचा जास्त परिणाम दिसून येतो.
हार्मोनल असंतुलन असलेल्या (उदा., PCOS, थायरॉइड), मधुमेह किंवा कमी रक्तदाब असलेले लोक, ज्यांना खाण्याशी संबंधित आजार आहे तसेच गर्भवती किंवा स्तनपान करणाऱ्या महिलांना दीर्घकाळाच्या उपवासाचे नकारात्मक परिणाम दिसू शकतात.
ब्लॅक कॉफी, चहा, लिंबू आणि नारळ पाणीचे सेवन
“रणदीप ड्राय उपवासाला प्रोत्साहन देतो. (कॅलरीज अजिबात नाहीत), पण हे सर्वांसाठी फायदेशीर नाही,” असे गोयल सांगतात.
- उपवासादरम्यान लिंबू किंवा नारळ पाणी उपयुक्त ठरू शकते.
- जर लोक मार्गदर्शनाशिवाय फक्त पाणी पित दीर्घकाळ उपवास करत असतील तर इलेक्ट्रोलाइट असंतुलन आणि निर्जलीकरणचा धोका वाढू शकतो.
- फक्त दिखाव्यासाठी उपवास करणे समस्यांना निमंत्रण आहे, असे गोयल सांगतात.
गोयल यांच्या मते, “उत्तम दिसणे म्हणजे तुम्ही निरोगी असणे असे नाही. उपवास केल्याने काही लोकांना हलके वाटू शकते, परंतु जर तुम्ही उपवास जाणीवपूर्वक केला नाही तर थकवा, पोषक तत्वांची कमतरता तसेच स्नायूंच्या समस्यासुद्धा वाढू शकतात”, असे गोयल पुढे सांगतात.
या गोष्टी लक्षात ठेवाव्यात
उपवास हा एकच पर्याय नाही. गोयल सांगतात की, काही तत्त्वे योग्य असली तरी त्यांना “the more the better” (अति प्रमाण, अति चांगले) प्रमाणे स्वीकारणे, विशेष म्हणजे जेव्हा वैज्ञानिक पुराव्याशिवाय याला प्रोत्साहन दिले जाते तेव्हा आणखी धोकादायक ठरू शकते.
उपवास करून कसे वजन कमी करायचे ?
- सुरुवात ४८ तासांच्या उपवासाने नव्हे तर हळूहळू (१२-१४ तास) उपवासाने करा.
- तुमच्या शरीराचे ऐका. चक्कर येणे, थकवा आणि चिडचिड हे धोक्याचे संकेत असू शकतात.
- प्रत्येकाने उपवास करू नये, विशेषतः आरोग्याच्या समस्या असलेल्यांनी उपवास करणे टाळावे.
- उपवास करताना योग्य पोषण, हायड्रेशन आणि निरोगी जीवनशैलीकडे लक्ष द्यावे. वजन कमी करण्यासाठी सोपा उपाय म्हणून उपवास करू नये, असे गोयल सांगतात.