देशात आता सणासुदीचा हंगाम सुरू झाला आहे. नवरात्री उत्सव सुरू असून या काळात अनेक लोकं उपवास करतात. देशभरातील देवीचे भक्त नवरात्रीचे उपवास पाळतात आणि उपवासात सात्विक अन्न खातात. उपवास करण्याचे आरोग्याला अनेक फायदे आहेत. उपवास केल्याने मन संतुलित राहते आणि एक शिस्त स्वतःमध्ये येते. पण, उपवास ठेवण्यासाठी कठोर नियमांचे पालन करावे लागते. उपवासात राजगिरा पीठ, साबुदाणा, पाणी, बटाटा, रताळे, विविध फळे, भगरीचे पीठ, गाजर आणि काकडी इत्यादींचे सेवन केले जाऊ शकते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उपवास म्हटलं की, पटकन आठवणारा पर्याय म्हणजे साबुदाणा. साबुदाणा खाण्याचा खवय्या वर्ग आपल्याकडे खूप मोठा आहे. पण, मधुमेह असणाऱ्या व्यक्तींना या काळात उपवास करताना विशेष काळजी घ्यावी लागते. विशेषत: व्‍यक्‍तीला मधुमेह असेल आणि सेवन केले जाणाऱ्या आहाराबाबत योग्‍य काळजी घेतली नाही तर त्‍याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. मधुमेह असलेल्या रुग्णांनी उपवास करताना तुमच्या डॉक्टरांशी सल्लामसलत करणे, उपवासात काय खावे आणि काय खाऊ नये, याविषयीची माहिती घेतली पाहिजे, असे मॅक्स हेल्थकेअरचे एंडोक्रिनोलॉजिस्ट आणि डायबिटीजचे अध्यक्ष डॉ. अंबरिश मिथल सांगतात, असे वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे.

डॉक्टर सांगतात, मधुमेहाचा त्रास असल्यास उपवासादरम्यान अधिक काळ उपाशी राहण्याची चूक करू नये. थोड्या-थोड्या अंतराने पौष्टिक पदार्थ खाणे गरजेचं आहे. यामुळे रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. जर तुम्ही इन्सुलिन घेत असाल किंवा रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करू शकणार्‍या सल्फोनील्युरियासारख्या औषधांचा वापर करत असाल, तर उपवास टाळणे तुमच्यासाठी चांगले ठरेल. तसेच गरोदर महिला आणि किडनीच्या आजारासारख्या गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांनी उपवास करू नये, असा सल्ला डाॅक्टर देतात.

(हे ही वाचा : सुटलेले पोट कमी करायचेय? योगा तज्ज्ञ म्हणतात, नियमित करा ‘ही’ दोन योगासने; महिनाभरात व्हाल सडपातळ )

मधुमेहाच्या रुग्णांनी काय खाऊ नये?

इन्सुलिनचे इंजेक्शन घेणाऱ्या मधुमेहींना उपवासाच्या दिवशी रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी झाल्याचे वाटू शकते. परिणामी उपवास सोडताना जास्त प्रमाणात अन्नपदार्थ खाल्ले जाण्याची शक्यता असते, पण असे चुकूनही करू नये. ज्या फळांमध्ये कार्ब्स आणि नॅचरल शुगरचे प्रमाण जास्त असते, अशी फळे मधुमेहाच्या रूग्णांनी खाणे टाळावे.

मधुमेहाच्या रुग्णांनी काय खावे?

खरंतर मधुमेह असलेल्या लोकांनी रक्तातील ग्लुकोजची इष्टतम पातळी राखण्यासाठी नियमित कालावधीनंतर खाणे आवश्यक आहे. स्नॅक्ससाठी मखाना हा एक चांगला पर्याय आहे, कारण त्यांच्यामध्ये १०४ कॅलरीज आणि भरपूर प्रथिने असतात. बदाम आणि अक्रोडसारखे नटांचे योग्य भाग प्रथिने आणि चांगले चरबी प्रदान करतात. दूध आणि दुग्धजन्य पदार्थ हे प्रथिने आणि कॅल्शियमचे उत्तम स्रोत आहेत, म्हणून हे खाणं तुमच्या आरोग्यासाठी चांगले ठरू शकते.

उपवासात साबुदाणा खाल्ल्याने तुमच्या रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते?

साबुदाणा खाल्ल्याने शरीराला जीवनसत्त्वे आणि खनिजे तसेच कार्ब्स मिळतात. एक कप साबुदाणा (अंदाजे १५० ग्रॅम) मध्ये १३५ ग्रॅम कर्बोदकांमधे फक्त १.३७ ग्रॅम फायबर आणि ०.२ ग्रॅम प्रथिने असतात. पण, ते तब्बल ५४४ कॅलरीज पुरवते. जर तुम्हाला उपवासात साबुदाणा खायचाच असेल तर नट, पनीर आणि मोठ्या प्रमाणात भाज्या यांसारख्या मिश्रित पदार्थांसह तुम्ही त्याचे थोडेफार सेवन करू शकता. खरंतर उपवासात साबुदाणा खात असाल, तर कार्बोहायड्रेटमुळे रक्तातील साखर वाढू शकते. जर तुम्हाला साबुदाणा खायची इच्छा असेल तर तुम्ही आठवड्यातून एकदा किंवा दोनदा भाज्यांसह मिश्रित साबुदाणा खाऊ शकता.

उपवास करताना मधुमेहींनी विशेष काळजी घेतली पाहिजे. शरीराला आरोग्यासाठी हानिकारक असलेल्या पदार्थांपासून दूर राहिले पाहिजे, असाही सल्ला डाॅक्टर देतात.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Can eating sago during navratri fast increase the blood sugar level rapidly what the doctor says heres know pdb
Show comments