Water Fast : सेलिब्रिटी ट्रेनर यास्मिन कराचीवाला नेहमी तिच्या फिटनेसविषयी नवनवीन गोष्टी सांगते. ती फक्त वर्कआउटच नाही, तर आहारालाही तितकेच महत्त्व देते. नुकताच यास्मिन कराचीवालाने सहा दिवस निर्जल उपवास केला होता. त्याविषयी सांगताना तिने कबूल केले की, सहा दिवस पाणी न पिणे तिला अवघड गेले.
ती सांगते, “मी सहा दिवस पाणी प्यायले नाही. कॉफी नाही, काहीही नाही. त्यामुळे माझे चयापचय बिघडले. जेव्हा मी निर्जल उपवास करीत होती तेव्हा मला खूप उत्साही आणि छान वाटत होते; पण त्यानंतर मला वाटले की, माझे चयापचय मंद झाले आहे.”

कराचीवाला यांच्या मते, “तुम्ही बाली किंवा लोणावळ्याला सहा दिवसांसाठी गेला आणि तुम्ही त्यावरच लक्ष केंद्रित केले, तर कदाचित तुम्ही निर्जल उपवास करू शकता; पण तुम्ही ते सातत्याने करू शकत नाही. धकाधकीच्या आयुष्यात तर सहा दिवस पाण्याचा त्याग करणे करणे शक्य नाही.”

हेही वाचा : भेसळयुक्त कुट्टूच्या पिठ्ठामुळे उत्तर प्रदेशात १५० हून अधिक लोकांना अन्नातून विषबाधा झाल्याचा आरोप; कशी ओळखावी भेसळ? तज्ज्ञांकडून जाणून घ्या

आज आपण सहा दिवस पाणी न पिणे म्हणजे निर्जल उपवासाचा (Water Fast) आरोग्यावर कसा परिणाम होतो, याविषयी जाणून घेणार आहोत.

हैदराबाद येथील ग्लेनेगल्स हॉस्पिटल्सच्या इंटर्नल मेडिसिनचे एचओडी, वरिष्ठ सल्लागार फिजिशियन डॉ. हरिचरण जी सांगतात, “सहा दिवस निर्जल उपवास केल्याने आपल्या शरीरावर विविध प्रकारे परिणाम होऊ शकतो. डिटॉक्सिफिकेशन किंवा वजन कमी करण्यासाठी जर तुम्ही पाणी पीत नसाल तरीही याबाबत सावधगिरी बाळगणे किंवा काळजी घेणे आवश्यक आहे.”

शरीरावर प्रभाव – जेव्हा तुम्ही सलग सहा दिवस पाणी पीत नाही, तेव्हा सुरुवातीच्या दिवसांमध्ये शरीरातील ग्लायकोजेनचा साठा कमी होतो, ज्यामुळे ऊर्जेसाठी फॅट्सचा वापर होतो. डॉ हरिचरण जी सांगतात, “यामुळे वजन कमी होऊ शकते. तसेच शरीराच्या इतर कार्यांवरही परिणाम होतो.”

चयापचय क्रियेत बदल – दीर्घकालीन उपवासादरम्यान शरीर ऊर्जेसाठी फॅट्सचे केटोन्समध्ये रूपांतर करते. केटोन्स शरीरासाठी विषारी असतात; जे साखरेची पातळी कमी करतात. त्याशिवाय दीर्घकाळ निर्जल उपवास केल्याने चयापचय क्रियेवर परिणाम दिसून येतो. शरीर ऊर्जा वाचवण्याचा प्रयत्न करते आणि त्यामुळे चयापचय क्रिया मंद होऊ शकते.

हेही वाचा : High Protein Breakfast : नाश्त्याला फक्त दोन अंडी नाही तर ‘हे’ तीन पर्याय तुम्हाला देतील भरपूर प्रोटीन; वाचा तज्ज्ञांचे मत

इलेक्ट्रोलाइट असंतुलन – “इलेक्ट्रोलाइटचे सेवन न करता, दीर्घकाळ उपवास केल्याने अनेक आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. अशा उपवासामुळे थकवा, चक्कर येणे व स्नायुदुखी यांसारखी लक्षणे जाणवू शकतात, ” असे डॉ. हरिचरण जी सांगतात

मानसिक आरोग्यावर परिणाम – सहा दिवस सतत पाणी न प्यायल्याने तुमच्या मानसिक आरोग्यावर त्याचा परिणाम दिसू शकतो. सतत मूड बदलणे, काहींना भूक आणि चयापचयातील बदलांमुळे चिडचिडेपणा जाणवू शकतो. त्याशिवाय तणाव वाढू शकतो, असे डॉ. हरिचरण सांगतात.

वैद्यकीय सल्ला – दीर्घकाळ निर्जल उपवास करण्यापूर्वी आरोग्य तज्ज्ञांशी आवर्जून बोला. वैद्यकीय सल्ला घ्या. औषधोपचार घेणाऱ्या व्यक्तींना या निर्जल उपवासामुळे काही आरोग्याच्या समस्या वाढू शकतात.