Tea At Evening : भारतात चहा हा प्रत्येकाच्या आयुष्यातील दैनंदिन जीवनाचा महत्त्वपूर्ण भाग आहे. विशेषत: दुधाचा चहा आपण आवडीने घेतो. सकाळी उठल्यानंतर अनेक जण चहाने दिवसाची सुरुवात करतात आणि त्यानंतर दिवसातून दोनतीन वेळा चहा घ्यायलाही हे लोक कचरत नाहीत. त्यात संध्याकाळीही काही जण आवर्जून चहा पितात. पण, तुम्हाला माहिती आहे का संध्याकाळी चहा प्यायल्यानंतर आपल्या आरोग्यावर काय परिणाम होतात? याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. दीक्षा भवसार-सावलिया सांगतात, "जवळपास ६४ टक्के भारतीय लोकांना चहा पिणे आवडते; पण त्यातील ३० टक्के लोक संध्याकाळी चहा पितात." तुम्हालाही संध्याकाळी चहा पिणे आवडते का? तुम्हाला ही चांगली सवय वाटते का? आणि संध्याकाळी चहा प्यावा की टाळावा? डॉ. दीक्षा भवसार-सावलिया यांनी याविषयी सविस्तर माहिती दिली. चांगली झोप, अॅसिडिटी होऊ नये व योग्य पचनक्रिया यासाठी झोपण्याच्या १० तास आधी चहा किंवा कॉफी घेणे टाळावे कारण त्यामध्ये कॅफिनचे प्रमाण अधिक असते, असे डॉ. सावलिया आवर्जून सांगतात. आहारतज्ज्ञ स्मृती झुनझुनवालाही सांगतात की, चहा पिणे वाईट नाही; पण तो कसा प्यावा, दुधाबरोबर प्यावा की नाही, किती प्रमाणात घ्यावा व दिवसातून किती वेळ घ्यावा, याविषयी नेहमी शंका निर्माण होते. पण त्या पुढे सांगतात, "काळा चहा अधिक फायदेशीर आहे. काळ्या चहामध्ये असणाऱ्या अँटिऑक्सिडंट्समुळे अॅसिडीटी कमी होते आणि आरोग्य चांगले राहते; पण भारतीयांना चहामध्ये दूध आणि साखर घालण्याची सवय आहे. त्यामुळे चहामधील पौष्टिक गुणधर्म नाहीसे होतात." हेही वाचा : Antibiotics : तुम्ही सर्दी-तापासाठी अँटीबायोटिक्स घेता का? आताच थांबवा, नाहीतर भोगावे लागू शकतात गंभीर परिणाम; वाचा तज्ज्ञ काय सांगतात… संध्याकाळी कोणी चहा प्यावा ? डॉ. सावलिया यांच्या मतानुसार, फक्त काही ठराविक लोकांचा गट संध्याकाळी चहाचा आस्वाद घेऊ शकतो. जे लोक रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करतात.ज्यांना अॅसिडिटी किंवा गॅस्ट्रिकचा कोणताही त्रास नाही.ज्यांची पचनशक्ती खूप चांगली आहे.ज्यांना चहाचे व्यसन नाहीज्यांना झोपेशी संबंधित कोणतीही समस्या नाही.जे लोक रोज वेळेवर जेवण करतात.जे व्यक्ती अर्धा किंवा एक कप यापेक्षा कमी चहा पितात. संध्याकाळी चहा पिणे कोणी टाळावे? डॉ. सावलिया सांगतात की, खालील लक्षणे असणाऱ्या व्यक्तींनी संध्याकाही चहा पिणे टाळावे. ज्यांना निद्रानाशाचा त्रास होतो.ज्यांना सतत ताण-तणाव असतो.ज्यांची त्वचा आणि केस लवकर कोरडे पडतात.ज्यांना वजन वाढवायचे आहेज्यांना केव्हाही भूक लागते.ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे.ज्यांना अॅसिडिटी किंवा पचनाशी संबंधित समस्या आहे.ज्यांचे वजन खूप कमी आहे. हेही वाचा : Weight Loss : वजन कमी करण्यासाठी सब्जा फायदेशीर आहे का? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात …. चहामध्ये दूध घातल्यावर काय होते? चहामध्ये दूध घातल्यानंतर काय होते याविषयी डॉ. झुनझुनवाला सांगतात, "चहामध्ये दूध घातल्यानंतर चहाचा कडूपणा आणि तुरटपणा कमी होतो; ज्यामुळे चहा अधिक चविष्ट वाटतो. याशिवाय साखर घातल्यानेही तुरटपणा दूर होतो. त्यामुळेच चहामध्ये दूध आणि साखरेचा वापर केला जातो. पण, दुधामुळे चहामधील अँटिऑक्सिडंट्स कमी होतात आणि चहामधील पौष्टिकताही दूर होते. त्यामुळे चहा प्यायल्यानंतर जळजळ वाटते.कॅसिन हे दुधामध्ये असणारे प्रोटीन आहे; जे चहामध्ये फ्लेव्होनॉइड (Flavonoid ) आणि कॅटेचिन (Catechin) असे मिळून एक मिश्रण तयार करते. त्यामुळे अॅसिडिटी होते. भारतीयांना तर सकाळी उठल्यानंतर दुधाचा चहा पिण्याची सवय असते. त्यामुळे अनेकदा त्यांच्या पचनक्रियेवर याचा वाईट परिणाम दिसून येतो चहा पिण्याच्या सवयीत बदल करा डॉ. झुनझुनवाला चांगल्या जीवनशैलीसाठी चहा पिण्याच्या सवयींमध्ये काही बदल करण्यास सांगतात. ते खालीलप्रमाणे : सकाळी उठल्यानंतर काजू, मनुका किंवा एखादे फळ खा आणि नंतरच दुधाचा चहा प्या.चहात दूध घातल्यानंतर चहा जास्त उकळू नका. त्यामुळे चहामध्ये काही प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स शिल्लक राहण्यास मदत होते.चहा बनवल्यानंतर त्यावर दूध घातल्यास अधिक पौष्टिक चहा बनतो.जर तुम्हाला दिवसातून ३-४ वेळा चहा पिण्याची सवय असेल, तर तुम्ही चहाचे वेगवेगळे प्रकार घेऊ शकता. जसे की ग्रीन टी, कॅमोमाइल चहा, गुलाब चहा, काळा चहा इत्यादी.जर तुम्हाला चहा बंद करायचा असेल, तर हळूहळू दररोज एक कप बंद करा.संध्याकाळी चहा पिणे टाळा. कारण- त्यामुळे निद्रानाशाचा त्रास होऊ शकतो.