पावसाळ्यानंतर जसजसा शरद ऋतू सुरू होतो, तसतसे पुर्वेकडून वारे वाहू लागतात. हे वारे पावसाळ्यातल्या काळ्या ढगांना वाहून दूर नेतात. आकाशात यत्र-तत्र पांढर्‍या ढगांचे पुंजके दिसतात. हलका पाऊस पाडणारे व मंद गडगडाट करणारे असे सूर्याच्या केशरी रंगाचे व शिळेच्या काळसर रंगाचे ढग अधूनमधून दिसतात. मात्र एकंदर आकाश स्वच्छ व निरभ्र होते. याच दिवसांमध्ये आकाशामध्ये अगस्ती तार्‍याचा उदय होतो. वास्तवात आकाशात दक्षिण दिशेला जेव्हा अगस्ती तारा चमकू लागतो, तेव्हा वर्षा ऋतू संपल्याचे ते निदर्शक असते, असे आपली परंपरा म्हणते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सर्व दिशासुद्धा निर्मळ- स्वच्छ होतात आणि क्रौंच पक्ष्याच्या माळा आकाशात उडताना दिसतात. पिवळसर रंगाचा सूर्य आकाशात चमकू लागतो आणि सुर्याची किरणे तीव्र होऊन जमिनीवर पडू लागतात. पावसाळ्यातील ओलसर-थंड वातावरणामध्ये बदल होऊन उष्णता वाढू लागते आणि वातावरण उष्ण होते. पावसाळ्यात सर्वत्र जमलेल्या पाण्याचा निचरा होऊ लागतो. सुर्याची तीव्र किरणे जमिनीवरचे पाणी शोषून घेतात. क्वचित कुठे ओलावा व चिखल राहतो, पण एकंदर पावसाळ्यात झालेला चिखल शरदातली उष्णता सुकवून टाकते. शरदातल्या सूर्यकिरणांच्या पोषणाने वनस्पती बहरुन येतात. बाण, काश(कसौंदा), सातवीण, बन्धूक, असाण या वृक्षांनी भूमी सुशोभित होते आणि काश, सातवीण आदी झाडांना फ़ुले येऊ लागतात. लाल फ़ुलांच्या कांचनार वृक्षाला शरदामध्ये रक्तवर्णीय-सुंदर फ़ुले येतात. तळ्यामध्ये कुमुद नामक कमळांची फुले उमलू लागतात. पावसाळ्यात शेतकऱ्याने जमिनीत रुजवेलेले बी वाढू लागते. शेतांच्या जमिनी हिरव्यागार पिकांनी भरुन जातात. एकंदरच वर्षा ऋतुनंतर वातावरणात उष्मा वाढून निसर्गाला ऊबदार व सुंदर करणारा तो शरद ऋतू.

हेही वाचा… Health Special: कोणत्या प्रकारची कॉफी आरोग्यासाठी उत्तम? केव्हा आणि कशी प्यावी?

शरद ऋतुचे वैशिष्ट्य म्हणजे या दोन महिन्यांमध्ये रात्री अनुभवास येणारे चंद्राचे शीतल अस्तित्व. या दिवसांमधला चंद्र हा विशेषेकरुन सृष्टीला थंडावा देणारा असतो. एकंदरच रात्री शीतलतेचा आनंद देणारे थंड वातावरण, तर दिवसा तळपत्या सूर्याची उष्णता अशा थोड्या विचित्र वातावरणाचा सामना शरीराला या ऋतुमध्ये करावा लागतो,जे स्वाभाविकरित्या आरोग्याला पोषक होणे कठिण असते.

हेही वाचा… Health Special: ऑस्टिओआर्थरायटिस म्हणजे काय?

शरद ऋतुमध्ये पुर्वेकडून वाहून येणारे वारे वर्षा ऋतुमधल्या ढगांना वाहून नेतात असा उल्लेख वर आला आहे. या वार्‍यांचे गुणदोष आयुर्वेद शास्त्राने सांगितले आहेत, तेसुद्धा समजून घेऊ; ज्यामुळे वाचकांना आपल्या पूर्वजांच्या अभ्यासाच्या व्यापकतेची कल्पना येईल, जी माहिती आज २१व्या शतकातही उपयोगी पडेल अशीच आहे.

पूर्वेकडच्या वार्‍यांचे गुणदोष

शरद ऋतुमध्ये जे पूर्वेकडून वारे वाहून येतात, त्यांचे गुणदोष पुढीलप्रमाणे : शीतल (थंड स्पर्शाचा, थंड गुणांचा व शरीरामध्ये थंडावा वाढवणारा),अतिमधुरतेचे गुण ज्यामध्ये भरलेले आहेत असा, एकंदरच शरीराला बल देणारा असतो. असे असले तरी त्याच्यामध्ये वात वाढवण्याचा दोष असतो, ज्यामुळे वातप्रकृती व्यक्तींसाठी तो हितकारक नसतो. त्याचप्रमाणे ज्याला व्रण (जखमा) झाल्या आहेत, ज्याच्या अंगावर सूज आहे त्यांच्यासाठीसुद्धा शरदातले पूर्वेकडून वाहणारे वारे बाधक ठरतात. या पूर्व दिशेकडून वाहात येणार्‍या वार्‍यांचे सेवन करु नये, असा एक महत्त्वाचा सल्ला आयुर्वेदाने दिला आहे. (चरकसंहिता १.६.४५)

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Climatic changes in sharad rutu autumn hldc dvr
Show comments