भारतात उन्हाळ्याची तीव्रता वाढत आहे. कडाक्याच्या उन्हाच्या झळांपासून आराम मिळवण्यासाठी अनेक जण उसाचा रस, फळांचे रस आणि थंडगार कॉफी यांसारख्या पेयांकडे वळतात. पण, इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) मार्गदर्शक सूचना जारी केली आहे, ज्यात उसाचा रस, फळांचे रस, कोल्ड्रिंक, चहा आणि कॉफी या लोकप्रिय पेयांचे अतिसेवन करू नये यासाठी सावधगिरी बाळगली पाहिजे.

“भारतात विशेषतः उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या उसाच्या रसामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते आणि त्यामुळे त्याचा वापर कमी केला पाहिजे.”

“सॉफ्ट ड्रिंक्स हे पाणी किंवा ताज्या फळांकरिता योग्य पर्याय नाहीत आणि ते टाळले पाहिजे,” असे त्यात म्हटले आहे. त्याऐवजी ताक, लिंबू पाणी, संपूर्ण फळांचा रस (साखर न घालता) आणि नारळ पाणी यांसारख्या पर्यायांची शिफारस ICMR करते.

संतुलित आणि पौष्टिक आहार घेऊन उष्णतेवर मात करू इच्छिणाऱ्या आरोग्याबाबत जागरूक असणाऱ्या व्यक्तींसाठी हा सल्ला दिला जातो.

उसाच्या रसामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असल्याने आरोग्याशी संबंधित धोके

मार्गदर्शक तत्त्वांशी सहमती दर्शवत DHEE हॉस्पिटल्सच्या मुख्य आहारतज्ज्ञ, शुभा रमेश एल यांनी द इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना सांगितले की,उसाचा रसामध्ये नैसर्गिक शर्करा असते. विशेषत: उष्ण हवामानात उसाचे रस प्यायल्याने आरोग्यासाठी अनेक धोके निर्माण होतात.

निर्जलीकरण : जास्त साखरेचे सेवन केल्याने पाण्याची कमतरता वाढते, कारण शरीराला साखरेचे चयापचय करण्यासाठी अधिक पाण्याची आवश्यकता असते. उन्हाळ्यात विशेषतः हे घडू शकते, जेव्हा शरीर आधीच घामाने लक्षणीय पाणी गमावते.

रक्तातील साखरेची वाढ : उसाच्या रसातील साखरेचे जलद शोषण केल्याने रक्तातील ग्लुकोजच्या पातळीत वाढ होऊ शकते, ज्यामुळे इन्सुलिन प्रतिरोधक (insulin resistance ) क्षमता आणि टाइप २ मधुमेहाचा धोका वाढतो.

वजन वाढणे : साखरयुक्त कोल्ड्रिंकमधून अतिरिक्त कॅलरी वजन वाढण्यास कारणीभूत ठरतात, ज्यामुळे मधुमेह आणि हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी रोगांसारख्या आरोग्य समस्या आणखी गुंतागूंत होऊ शकतात.

संपूर्ण फळे आणि फळांचा रस यामधील पौष्टिक फायद्यांमधील मुख्य फरक

द इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना कनिक्का मल्होत्रा, सल्लागार आहारतज्ज्ञ आणि प्रमाणित मधुमेह शिक्षक सांगतात, “संपूर्ण फळांमध्ये पौष्टिक फायबर असते, जे रस करताना नष्ट होते. फायबरमुळे जास्त वेळ पोट भरल्यासारखे जाणवते, ज्यामुळे पचनक्रियेस मदत होते आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते. म्हणून संपूर्ण फळ हे अधिक पर्यावरणास अनुकूल ऊर्जा स्त्रोत ठरते.”

फळांचे गर आणि सालीमध्ये जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स असतात, जे रस काढताना गमावले किंवा कमी होऊ शकतात. संपूर्ण फळ खाताना लाळेचे उत्पादन वाढते, जे केवळ पचन सुलभ करत नाही तर साखर शोषण्याची गतीदेखील नियंत्रित करते.

हेही वाचा – “उन्हाळ्यात रस्त्यावरील खाद्यपदार्थ खाऊ नका”, BMC चे आवाहन; विक्रेत्यांसह ग्राहकांनी कशी बाळगावी सावधगिरी?

पाण्याला पर्याय म्हणून कोल्ड्रिंक पिऊ नका

पाण्याऐवजी कार्बोनेटेड आणि नॉन-कार्बोनेटेड दोन्ही कोल्ड्रिंक पिणे हा अनेक कारणांमुळे चुकीचा पर्याय असल्याचे शुभा सांगतात. “सॉफ्ट ड्रिंक्समध्ये अनेकदा जास्त प्रमाणात साखरेचा समावेश असतो, ज्यामुळे कॅलरीजचे प्रमाण वाढते आणि संभाव्य वजन वाढते. अनेक कोल्ड्रिंक्समध्ये कृत्रिम चव, रंग आणि संरक्षक असतात, ज्यांचा कालांतराने आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो,” असेही त्यांनी सांगितले म्हणते

याव्यतिरिक्त, सॉफ्ट ड्रिंक्समधील कॅफिन आणि आम्लयुक्त घटकांचा परिणाम लघवीचे प्रमाण वाढवणारा असू शकतो, ज्यामुळे निर्जलीकरण होऊ शकते. भारतासारख्या उष्ण हवामानात हे विशेषतः धोकादायक आहे, जेथे हायड्रेशन राखणे महत्त्वाचे आहे.

चहा आणि कॉफीमधून घेतल्या जाणाऱ्या कॅफिनचे सेवन नियंत्रित करण्याचा सल्ला

मल्होत्रा​ सावध करतात की, “तुम्ही दररोज किती कॉफी आणि चहा पितात याची काळजी घ्या,” कॅफिन घटकांचा परिणाम लक्षात घ्या.

कॅफिनचे प्रमाण कमी करा : थोड्या थोड्या वेळाने कॅफिनचे सेवन टाळा. कॅफिन सकाळी आणि दुपारच्या सुमारास घेऊ शकता.

औषधी वनस्पती निवडा : दालचिनी / हळद आणि कॅमोमाइल / जास्मिन / हिबिस्कससारख्या वनस्पतींच्या चहाची निवड करू शकता.

तुमच्या शरीराचे ऐका : जर तुम्हाला अस्वस्थता, चिंता किंवा झोपेची समस्या येत असेल तर कॅफिनचे सेवन कमी करा.

हेही वाचा – World No Tobacco Day: “धूम्रपान सोडणे इतके अवघड का आहे? तुम्हाला धुम्रपान करण्याची इच्छा का होते? जाणून घ्या…

भारतात उष्णतेची लाट आणि वाढत्या तापमानाला तोंड देत असताना हायड्रेटेड कसे राहायचे?


या उन्हाळ्यात तुम्ही निरोगी आणि योग्यरित्या हायड्रेटेड आहात याची खात्री करण्यासाठी खालील पावले उचलण्याची शिफारस शुभा यांनी केली आह

पाण्याचे सेवन – दिवसभरात किती शारीरिक हालचाल होते आणि उष्णतेच्या किती संपर्कात येता त्यानुसार बदल करून दररोज किमान ८-१० ग्लास पाणी पिण्याचे लक्ष्य ठेवा.

इलेक्ट्रोलाइट सोल्यूशन्स : गमावलेले क्षार आणि खनिजे पुन्हा भरण्यासाठी घरगुती किंवा व्यावसायिकरित्या उपलब्ध इलेक्ट्रोलाइट सोल्यूशन्स वापरा.

हायड्रेटिंग फूड्स : हायड्रेशन वाढवण्यासाठी तुमच्या आहारात टरबूज, काकडी आणि संत्री यांसारखी पाणीयुक्त फळे आणि भाज्यांचा समावेश करा.

अल्कोहोल आणि साखरयुक्त पेये टाळा : यामुळे डिहायड्रेशनचा धोका वाढू शकतो आणि ते मध्यम प्रमाणात सेवन केले पाहिजे किंवा पूर्णपणे टाळले पाहिजे.