सध्या सर्वत्र आपल्या हवेची गुणवत्ता (air quality) कशी आहे याची चर्चा असते आणि रोजचा हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक (air quality index) कधी वाईट आणि कधी खूप वाईट अशा स्तरांमध्ये वर खाली होताना दिसतो. दरवर्षी पावसाळ्यातही ‘पाऊस दिवसेंदिवस अधिकाधिक बेभरवशाचा होत चालला आहे’ अशी विधाने आपण सगळे जण करत असतो. ‘आपल्या कोकणात कधी इतकी चक्रीवादळे आलेली नाहीत बा माझ्या पाहण्यात’ असे म्हणणारेही अनेक जण आहेत. यंदा तर महाराष्ट्रातले काही जिल्हे ‘दुष्काळग्रस्त’ झाले! ‘डिसेंबर महिना संपत आला, पण थंडीचा पत्ताच नाही!’ असे आपण सगळेचजण यंदा म्हणतो आहोत. थोडक्यात हवामानात होत चाललेल्या बदलांविषयी आपण सगळेच चर्चा करत असतो आणि चिंताही व्यक्त करतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अवकाळी पावसाने शेतात उभी असलेली पिके डोळ्यासमोर नष्ट होणे ही गोष्ट काही आपल्याला नवीन राहिलेली नाही. एक दिवस ओपीडीमध्ये ५०-५५ वर्षांचे गृहस्थ आले. एका महिन्यात त्यांचे रूपच पालटून गेले होते. दिवसभर आढ्याकडे डोळे लावून बसलेले असत. कोणाशी बोलत नसत. खाणे पिणे तर जवळजवळ सोडून दिले होते. सतत सुस्कारे सोडत आणि अचानक उठून फेऱ्या घालू लागत. नाशिक जिल्ह्यातले ते शेतकरी होते. अवकाळी पावसाने शेत उद्धस्त झाल्यानंतर ‘पुढे काय होणार?’ ह्या चिंतेने त्यांना गिळून टाकले होते. मनात सतत उदास वाटायचे. झोप यायची नाही. त्यांना उदासीनतेचा आजार झाला होता. त्यांच्याशी बोलल्यानंतर लक्षात आले की, शेतकऱ्याच्या मनात प्रचंड निराशा होती. तुटपुंजी सरकारी आर्थिक मदत मिळाली किंवा नाही तरी भविष्याबद्दलची अनिश्चतता त्यांना घाबरवून टाकणारी होती.

दुसऱ्याच दिवशी एक तरुण मुलगा आला. म्हणू लागला, गावाकडे शेतीत अनेक अडचणी, म्हणून नोकरी शोधात शहरात आलो. नोकरी तरी धड कुठे मिळते आहे? आता गारपीट मग दुष्काळ असेच चक्र सुरू राहिले तर इथेही महागाई वाढणार. नोकरी नीट नाही म्हणून गावाकडे जावे तर तिथे तरी काय ठेवले आहे? त्याला अशा विचारांनी भंडावून सोडले होते. कामात लक्ष लागत नव्हते. आपल्या जगण्यात कही अर्थ राहिला नाही असा सारखा विचार त्याच्या मनात येई आणि आत्महत्या करावीशी वाटे.

दोघांनाही योग्य औषधे मी सुरू केली. वेळच्यावेळी मनोविकारतज्ज्ञाकडे आल्यामुळे दोघांनाही फायदा झाला आणि परिस्थितीला सामोरे जाण्याचे बळ मिळाले. दोघांमध्ये एक साम्य होते. बदलत्या हवामानाचा त्यांच्या मनःस्थितीवर विपरीत परिणाम झाला होता आणि त्यांना मानसिक विकार झाला.

हेही वाचा… Health Special : ‘देअर इज नो वन साइज फिट्स टू ऑल’!

वाढते तापमान, समुद्राची वाढती पातळी, बर्फाचे वितळणे असे हळू हळू घडणारे बदल हवामानात होत आहेत, तसेच अचानक येणारी चक्रीवादळे, पूर, दुष्काळ, गारपीट अशा संकटानाही तोंड द्यावे लागते आहे. या सगळ्याचा आपल्या मनावर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम होतो आहे आणि आता तो अधिकाधिक लक्षात येऊ लागला आहे.

गारपीट किंवा पूर अशा आपत्तीनंतर लगेच होणारे अनेक मानसिक परिणाम दिसून येतात. प्रचंड भीती मनात निर्माण होते. झोप लागत नाही. थोड्याशा आवाजानेही दचकायला होते. छातीत धडधडू लागते, घाम फुटतो, अंग थरथरू लागते. घराचे झालेले नुकसान, आपल्या प्रिय व्यक्तीचा मृत्यू अशा गोष्टींना सामोरे जावे लागते.

आपत्तीनंतर दीर्घ काळपर्यंत मानसिक परिणाम दिसून येतात. त्याला post traumatic stress disorder म्हणतात. डोळ्यासमोर सतत आपत्तीच्या वेळची दृश्ये येत राहतात, सतत त्याच आठवणी येतात. भीती वाटणे, दचकणे, झोप न लागणे याबरोबरच मनात उदास वाटणे, चिंता वाटणे, निराश वाटणे अशी अनेक लक्षणे दिसून येतात.

प्रत्यक्ष आपत्तीला सामोरे जावे लागले नाही, तरी माध्यमांद्वारे प्रसृत होणाऱ्या बातम्या, दाखवली जाणारी दृश्ये यांचा अप्रत्यक्ष परिणाम अनेकांवर होतो. अनेक जण छोट्या छोट्या घटनांनी घाबरू लागतात. जरा जोरात पाऊस पडू लागला की ही मंडळी घाबरून घरी पळतात. काही जण अवघ्या मानवजातीच्या काळजीने वेढलेले राहतात. आपण जगबुडीच्या दिशेनेच चाललो आहोत तर आत्ता काही प्रयत्न कशाला करा असा निराशावादही निर्माण होतो. काही जण ‘हवामान बदल वगैरे सगळे थोतांड आहे. मानव प्रगतीपथावर आहे आणि त्याने सतत निसर्गावर विजय मिळवला पाहिजे’ असे मांडू लागतात आणि होणाऱ्या घटनांचा आपल्या मनावर परिणाम होऊ देत नाहीत. तर कही जण सारे दैवाच्या हवाल्यावर ठेवून आपले आयुष्य जगत राहतात.

वाढत्या तापामानासारखे बदल सातत्याने होतात. त्यांचा परिणाम म्हणून माणसाच्या मनातील हिंस्रपणा वाढीस लागतो. तो अधिक आक्रमक बनतो. खून मारामाऱ्या, आत्महत्त्या यांचेही प्रमाण वाढते असे आता शास्त्रीय संशोधनाने दाखवून दिले आहे.

अप्रत्यक्षपणे हवामानातील बदलांमुळे अनेक सामाजिक आणि आर्थिक परिणाम होतात. उदा. गावाकडून शहराकडे स्थलांतर, गरिबी, बेरोजगारी, सामाजिक विषमता इ. या सामाजिक परिस्थितीचाही अनेकांच्या मानसिकतेवर वाईट परिणाम होतो. चिडचिड, अतिचिंता, उदासीनता, निराशा अनेकांमध्ये दिसून येते.

मानसिक विकारांच्या लक्षणांसाठी वेळच्यावेळी मदत घेणे आणि योग्य ते उपचार सुरु करणे गरजेचे असते. हवामानातील बदलांचा आपल्या मनावर परिणाम होऊ नये म्हणून ते नाकारणे, किंवा केवळ नशिबाला बोल लावणे हे उपाय नाहीत. आपल्यावर कोसळणारी आपत्ती ही अचानक आणि अनपेक्षित असते. त्यामुळे आपत्तीला तोंड देण्याची मानसिक तयारी करायला शिकले तर आपत्तीचे नियोजन करण्यात आपण यशस्वी होतो. प्रत्यक्ष अनुभवाच्या वेळी आधीपासून केलेल्या योजनेचा आपला बचाव करण्यासाठी उपयोग होतो.

आपल्या जीवन पद्धतीमध्ये आवश्यक ते बदल करूनही आपले मानसिक सामर्थ्य वाढवता येते. निसर्गाच्या रक्षणासाठी उचललेली छोटी छोटी पाऊले उदा. प्लास्टिक न वापरणे, झाडे लावणे, कचऱ्याचे व्यवस्थापन अशा गोष्टींनी मानसिक समाधान लाभते. आपण आपला खारीचा वाटा उचलतो आहोत असे वाटते. यातून मनात निर्माण होणाऱ्या चिंता, शंका कमी होतात. एकत्रितपणे, समूहाने, संपूर्ण वस्तीने मिळून केलेले प्रयत्न मनात सुरक्षिततेची भावना वाढीस लावतात. मनाची लवचिकता वाढते, कोणत्याही आपत्तीला तोंड देण्याचा धीर येतो.

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपल्या प्रयत्नांतून मनात आशावाद निर्माण होतो. मनात आशा म्हणजे उदासीनता, चिंता अशा सर्व विकारांपासून संरक्षण!
हवामानात होणारे बदल खरे की खोटे, मानवनिर्मित की नैसर्गिक अशा चर्चांमध्ये न पडता आपले मानसिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी आपण प्रयत्न करू या.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Do droughts floods earthquakes affect the mindset hldc dvr
Show comments