आपल्यापैकी अनेकांना उन्हातून आल्यावर किंवा अगदी सहज म्हणून थंडगार संत्र, कलिंगड, सफरचंद अशा फळांचा रस पिणे पसंत असेल. मात्र त्यापैकी सफरचंदाच्या रसाचा तुमच्या शरीरावर नेमका काय परिणाम होत असेल याचा कधी विचार केला आहे का?

खरे तर सफरचंदाचा रस आणि मद्य यांच्यात दूरदूरपर्यंत कोणताही संबंध नाही. मात्र, असे असले तरीही दोन्ही पेये आपल्या शरीरासाठी हानिकारक असू शकतात का या प्रश्नाबद्दल अनेकांच्या मनात उत्सुकता वाढू लागली आहे.

असा विचार करण्यामागचे कारण हे की, इन्स्टाग्राम या समाजमाध्यमावरील द डायरी ऑफ अ सीईओ या पॉडकास्टमध्ये माजी न्यूरोएंडोक्रिनोलॉजिस्ट डॉक्टर रॉबर्ट लस्टिग यांनी केलेला दावा आहे. “लहान मुलं मद्य पीत नसली तरीही त्यांना फॅटी लिव्हरसारखा आजार होतो. कारण- ती सफरचंदाच्या रसाचे सेवन करतात; ज्याचे चयापचय शरीरात मद्याप्रमाणे केले जाते,” असे त्या पॉडकास्टमध्ये डॉक्टर रॉबर्ट यांनी म्हटले आहे.

हेही वाचा : केवळ रिफाईंड नव्हे नैसर्गिक साखरेनेही वाढते वजन! डॉक्टरांनी सांगितलेल्या ‘Facts’ एकदा पाहाच…

“सफरचंदाचा रस शरीरावर मद्याप्रमाणे परिणाम करतो की नाही हा विषय जरी धक्कादायक असला तरीही त्यावर तपास करणे फायदेशीर ठरेल. दोन्ही पेयांचा आपल्या शरीरावर वेगवेगळा परिणाम होत असून, त्यांबद्दल अभ्यास करून, तो समजून घेण्याने आपल्याला पेय निवडताना निर्णय घेण्यास मदत होऊ शकते.” असे डीएचईई हॉस्पिटलच्या मुख्य आहार व पोषण तज्ज्ञ शुभा रमेश एल यांचे मत असल्याचे दी इंडियन एक्स्प्रेसच्या एका लेखावरून समजते.

दररोज सफरचंदाचा रस आणि मद्यपान सेवनाच्या परिणामातील फरक

सफरचंदाचा रस आणि मद्य या दोन्हींमधील घटकांमुळे ते आरोग्यावर बरोबर विरुद्ध परिणाम करीत असतात, असे शुभा म्हणतात. सफरचंदाच्या रसात फ्रुक्टोज आणि ग्लुकोज यांसारखी नैसर्गिक साखर, विविध जीवनसत्त्वे व क जीवनसत्त्वासारखे अँटिऑक्सिडंट्स उपलब्ध असतात.

“असे असले तरीही यामधील साखरेचे प्रमाण आणि वारंवार सेवनामुळे वा सेवन केल्या जाणाऱ्या प्रमाणामुळे हे पेय चिंतेची बाब ठरू शकते. प्रक्रिया केलेला सफरचंदाचा रस हा बाजारात अगदी सहज आढळतो. मात्र, त्यामध्ये ताज्या रसामध्ये मिळणाऱ्या फायबर आणि काही पोषक घटकांचा अभाव असतो,” असे शुभा सांगतात.

दुसरीकडे रेड वाईनसारख्या मद्याचे प्रमाणात सेवन केल्याने, त्यामधील असणारे अँटिऑक्सिडंट घटक हृदयाच्या आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरू शकतात, असे समजते. असे असले तरीही मद्य हे पचविण्याच्या दृष्टीने आपल्या शरीरासाठी विष आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे. अगदी मोजक्या प्रमाणात जरी मद्य सेवन केले तरीही त्याचा परिणाम आपल्या यकृताचे कार्य, मेंदूचे आरोग्य आणि एकंदरीत आरोग्यावर नकारात्मक पद्धतीने होऊ शकतो.

सफरचंदाचा रस व मद्य यांच्यातील साखरेच्या शरीरावर होणाऱ्या परिणामाची तुलना

आपले शरीर सफरचंद रस आणि मद्य या दोन्हीतील साखरेवर वेगवेगळ्या पद्धतीने प्रक्रिया करते. त्यामुळे रक्तातील साखर, यकृताचे कार्य व वजनवाढ यांसारख्या घटकांवर परिणाम होतो, असे शुभा सांगतात.

हेही वाचा : तुम्ही आणि तुमचे हृदय खरंच तंदुरुस्त आहे का? काय आहे ‘क्वीन्स स्टेप चाचणी’? तुम्हीही एकदा करून पाहा

रक्तातल्या साखरेवरील परिणाम :

  • सफरचंद रसात उच्च प्रमाणात फ्रुक्टोज असतात; ज्यामुळे रक्तातील साखरेची झपाट्याने वाढ होते. असे झाल्यामुळे सतत भूक लागणे, अतिप्रमाणात खाणे यांसारख्या समस्या उदभवू शकतात. हे त्रास विशेषतः मधुमेह असणाऱ्या व्यक्तींना होण्याची शक्यता असते किंवा तो आजार विकसित होण्याचा धोका असू शकतो.
  • मद्यपान करण्यानेसुद्धा रक्तातील साखरेचे प्रमाण वर-खाली होत असते. नियमित मद्यपान केल्याने इन्सुलिनची प्रतिरोधकता [resistance] वाढू शकते. त्यामुळे रक्तातील साखरेचे योग्य प्रकारे व्यवस्थापन करण्यात शरीराला अडथळा निर्माण होऊ शकतो.

यकृताच्या कार्यावरील परिणाम :

  • अतिप्रमाणात सफरचंदाचा रस प्यायल्यास, त्यामधील फ्रुक्टोजमुळे यकृतावर ताण येऊ शकतो; ज्यामुळे ‘फॅटी लिव्हर’सारख्या समस्या उदभवू शकतात. योग्य प्रमाणात सफरचंदाचा रस पिणे सुरक्षित असले तरीही अतिसेवनाने यकृतावर तणाव निर्माण होऊ शकतो.
  • मात्र, मद्यपानाने यकृतास थेट धोका निर्माण होतो. यकृताद्वारे प्रक्रिया केल्या जाणाऱ्या मद्याचे सेवन नियमितपणे केले, तर फॅटी लिव्हरसारखेच यकृतासंबंधीचे आजार, हिपॅटायटिस आणि सिरोसिस यांसारख्या भयंकर समस्यांचा सामना करावा लागू शकतो. इतकेच नाही, तर प्रमाणात मद्यपान केले तरीही यकृतातील एंझाइम वाढू शकतात; जे अवयवांवरील वाढलेला ताण दर्शविण्याचे काम करतात.

वजन वाढणे :

  • सफरचंदाचा रस आणि मद्य ही दोन्ही पेये अतिप्रमाणात सेवन केल्याने त्यांचा वजनावर परिणाम होतो. सफरचंद रसातील साखरेचे उच्च कॅलरीजमध्ये रूपांतर होते. द्रव पदार्थातील कॅलरीजचे प्रमाण हे अन्नपदार्थांमधील कॅलरीजच्या तुलनेत कमी असते; त्यामुळे अशा द्रव कॅलरीजचे सेवन सहजतेने अतिप्रमाणात होते.
  • मद्य असणाऱ्या पेयांमध्येही कॅलरीजचे प्रमाण अधिक असून, अशी पेये भूक वाढविण्याचे काम करतात. त्यामुळे अतिखाण्याने वजन वाढण्याची समस्या उदभवते, अशी माहिती दी इंडियन एक्स्प्रेसच्या एका लेखावरून मिळते.