प्रत्यक्षात चवीला आंबट नसूनही शरीरामध्ये आंबटपणा निर्माण करणारे व पित्तप्रकोपास कारणीभूत होणारे म्हणजे आंबवलेले पदार्थ. वाईट गोष्ट ही की ज्याला पित्तप्रकोपजन्य (अतिउष्णताजन्य) आजारांचा त्रास होतो,तो अनुभवाअंती तिखट पदार्थ टाळतो, समजावून सांगितले तर आंबट-खारट पदार्थसुद्धा टाळतो, मात्र आंबवलेले पदार्थ सुद्धा आपल्याला त्रासदायक होत आहेत, हे काही त्याला समजत नाही. कसे कळणार?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आंबवलेले पदार्थ नेहमीच चवीला आंबट लागतील असे नाही, फारच आंबवलेले असले तरच ते आंबट लागतात. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे तुम्हा-आम्हांला सकाळ सायंकाळ खायला उपलब्ध होणारे बरेचसे पदार्थ हे आंबवलेले असतात आणि ही परिस्थिती फ़क्त शहरांमध्येच आहे असे नाही, तर लहान शहरे व गावांमध्येसुद्धा आता आपल्या निरोगी मराठी खाद्यपदार्थांची जागा या आंबवलेल्या पदार्थांनी घेतली आहे.

हेही वाचा : Health Special : डायबेटिसवरच्या सल्ल्यांचं काय करायचं?

आपल्या सभोवतालचे हवामान बहुधा दमट-उष्ण असताना आपण सगळे , लाखोंच्या संख्येने अशा आंबवलेल्या पदार्थांचे सेवन का करत असतो? कधीतरी खाण्याचे हे आंबवलेले पदार्थ रोजच्यारोज खाऊन शरीरामध्ये उष्णता का वाढवत असतो? सकाळच्या नाश्त्याला आंबवलेले पदार्थ आणि सायंकाळची न्याहारी सुद्धा आंबवलेल्या पदार्थांचीच करुन आपण पित्तप्रकोप का वाढवत असतो? बरं असं नसतं, तर वेगवेगळ्या पित्तविकारांवर सर्वसाधारण औषधांचा उपयोग होत नसताना आंबवलेले पदार्थ टाळल्यानंतर त्या तक्रारींपासून आराम मिळताना दिसतो,तो कसा? याचाच अर्थ आंबवलेले पदार्थ पित्तप्रकोपक आहेत.

आता विचारू नका,कोणते आंबवलेले खाद्यपदार्थ आम्ही रोज खातो म्हणून? काय इडली, डोसा, उत्तप्पा, मेदुवडा, ढोकळा, खमण हे पदार्थ रोज तुमच्या खाण्यात येत नाहीत? आणि चीज -पावाचं काय? पाव तर अधूनमधून (काही घरांमध्ये तर रोज) खाल्ला जातोच ना! अनेक दिवस आंबवण्याची प्रक्रिया करुन तयार होणारे चीज तर तीस-चाळीस वर्षांआधी आपल्याला माहीतही नव्हते. त्याच चीजचे सेवन सुद्धा आजकाल मोठ्या प्रमाणात लोक करु लागले आहेत. याचे नित्यनेमाने सेवन आरोग्यासाठी योग्य नाही हे सुद्धा लोकांना माहीत नाही आणि या पदार्थांमुळे आपल्या आरोग्याबरोबर काही गैर होत आहे हे सुद्धा लक्षात येत नाही. अशा घरांमधील लोक पित्तप्रकोपजन्य रोगांनी ग्रस्त असतील,तर त्यात आश्चर्य ते काय?

हेही वाचा : खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी नवीन सुपर डाएट? ‘या’ डाएटमुळे हृदयविकाराचा धोका कसा कमी होतो? जाणून घ्या…

शिळी चपाती चालत नाही,मग शिळा पाव कसा चालतो?

मी लोकांना एक प्रश्न नेहमी विचारतो की तुम्ही दोन-तीन दिवसांपूर्वी बनवलेली चपाती खाल का?नाहीच. आरोग्याची काळजी घेणारे आपण सहसा आदल्या दिवशीची शिळी पोळी दुसर्‍या दिवशीसुद्धा खात नाही, मग आपल्याला शिळा पाव कसा काय चालतो? दोन ते तीन दिवसांपुर्वीचा पाव खाणं योग्य कसं? पिझ्झा,बर्गर साठी दुकानात मिळणारा गोलाकार पाव तर नेमका किती दिवस आधी तयार केलेला आहे आणि प्रत्यक्षात त्यांच्या वेष्टनावर लिहितात ती तारीख योग्य असते काय? असे शिळे पाव खाऊन पित्तप्रकोप तर होईल,त्याचबरोबर इतर अनेक आजारांनी लोक ग्रस्त होतील.

जो पाव आपण कधीकाळी निषिद्ध समजला होता त्याच पावाशिवाय आज १०० वर्षांतच लोकांचे पान हलत नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. घराघरातून लोक पाव खात असतात,पावाचे हे नित्य सेवन संपूर्ण समाजाला रोगी बनवत आहे. या सर्व घातक आहारसवयींचा  भुर्दंड तर आपल्याला द्यावा लागणारच, नव्हे तो आपण देतच आहोत. कोणता भुर्दंड विचारताय? जगातले सर्वाधिक मधुमेही आपल्या देशात, तरुण मुलींमध्ये पीसीओडीचा त्रास प्रचंड प्रमाणात वाढलेला, प्रत्येक घरामध्ये निदान एक स्थूल व्यक्ती,उच्चरक्तदाब जणू सखाच बनलाय, हार्ट अटॅक तर घरोघरी, कॅन्सरचे प्रमाण भयावहरित्या वाढत चालले आहे….हाच तो भुर्दंड!

हेही वाचा : नियमित अंडी खाणे आपल्या आरोग्यासाठी चांगले आहे का? आठवड्यातून किती अंडी खावीत? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात….

मराठी खाद्यपदार्थ गेले कुठे?

आपण आंबवलेल्या पदार्थांचा शरीरामध्ये पित्त (उष्णता) वाढवणारा दोष बघितला. आंबवलेले खाद्यपदार्थ तुमच्या-आमच्या रोजच्या खाण्यामध्ये असतात, जसे- इडली,दोसा, मेदुवडा,उत्तप्पा, ढोकळा आणी महत्त्वाचं म्हणजे पाव!यातल्या इडली, डोसा वगैरे दाक्षिणात्य खाद्यपदार्थांनी आपल्या उपमा, शिरा, पोहे वगैरे पदार्थांची जागा कधी घेतली,ते आपल्याला समजलंसुद्धा नाही.

हे दाक्षिणात्य पदार्थ  दक्षिणेमधील वातावरण व त्या भूमीमध्ये  जन्मलेल्यांसाठी उपकारक असतील, परंतु आपल्यासाठी या भूमीमध्ये, या हवामानामध्ये हे नित्यसेवनाचे पदार्थ होऊ शकत नाहीत. ज्या मुंबईमध्ये हवामान सदानकदा दमट असते, अंगातून घामाच्या धारा वाहात असतात आणि त्याच्या परिणामी अग्नी मंद असतो, भूक कडकडीत लागत नाही, सहसा पचनशक्ती चांगली नसते, जिथले शेकडा नव्वद लोक पित्तप्रकोपाच्या या नाही तर त्या रोगाने त्रस्त  असतात, अशा मुंबईमध्ये पचायला मांसाप्रमाणे जड असणाऱ्या उडदाचे पदार्थ  नित्यनेमाने खाणे आरोग्याला बाधक होणार नाही काय? त्यात इडलीमध्ये उडदाचे प्रमाण कमी असते व निदान वाफवलेली असते, पण मेदूवड्यांचे काय? उडदाचे ओले कच्चे गोळे,ते पुन्हा तेलामध्ये तळलेले, जे पचायला दुष्कर होतात, ते आपल्याला कसे काय पचणार?

बरं,हे आपलं-तुपलं राहू दे,आपल्याला विचार करायचा आहे तो आरोग्याचा.जे पदार्थ आरोग्याला सर्वार्थाने पोषक नाहीत,सहज पाच्य नाहीत ते समाजाने रोजच्या खाण्यासाठी स्वीकारले कसे? पित्तप्रकोप हा तर या पदार्थांचा एक दोष झाला. उडीद हे आयुर्वेदाने मांसाप्रमाणे सांगितले आहेत अर्थात उडीद हे मांसासमान पौष्टिक आणि साहजिकच पचायलाही मांसासारखे जड आहेत. आपण सकाळ-सायंकाळ जाता-येता कोपर्‍यातल्या हॉटेलात खाऊन मांसाचे तळलेले तुकडे खाऊ का? नाहीच, मग उडदाचे पदार्थ का खायचे आणि खाल्ले तरी ते पचायचे कसे? पौष्टिक गुणांचे उडीद आयुर्वेदाने केवळ हिवाळ्यात खायला सांगितले आहेत. उडीद हा बारा महिने खाण्याचा पदार्थ नाहीच मुळी.

हेही वाचा : Sad Eating: रागात, दुःखात, तणावात पोट दुखेपर्यंत खाण्याची सवय लागलीये? ‘हे’ ३ पदार्थ व ‘या’ ३ सवयी ठरू शकतात वरदान

आयुर्वेदाने  उडदाची गणना निकृष्ट धान्यात करुन तो नित्य सेवनाचा पदार्थ नसल्याचे स्पष्ट सांगितले आहे आणि तरीही आपण त्यांचे नेहमी सेवन करत असतो. त्या तुलनेमध्ये कांदेपोहे, उपीट (उपमा), शिरा, अळूवडी, मेथी वडी, कोथिंबीर वडी वगैरे आपले  पदार्थ  आरोग्यदायी आहेत, ते हॉटेल्समध्ये का मिळत नाहीत? पोह्यांचे,भेळीचे इतके विविध खाद्यपदार्थ तयार होऊ शकतात,की त्यांनीच मेनू कार्ड भरुन जाईल. अनेक धान्यांनी तयार होणारा थालीपीठासारखा सर्वांकरीता  पोषक व सहज खाण्याजोगा असा पदार्थ   हॉटेलमध्ये सर्वत्र का उपलब्ध होत नाही?

आपल्या शेकडो पिढ्या ज्या झुणका-भाकरीवर पोसल्या गेल्या तो निरोगी आहार सहजी का मिळत नाही? बरं,हे पदार्थ स्वादिष्टसुद्धा आहेत. अहो, जगातला सर्वात रुचकर तिखट पदार्थ म्हणून आपली ’मिसळ’ निवडली गेलीय. ज्या मिसळीची जगभर प्रशंसा होतेय, ती इथल्या सर्व हॉटेलांमध्ये मिळत नाही, असे का?कुठेतरी-काहीतरी चुकलं आहे,चुकतं आहे! यात बदल व्हायला हवा आणि आपण सर्वांनी त्यासाठी मिळून प्रयत्न करायला हवे.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fermented foods are reason of pitta prakop hldc css
Show comments