डॉ. अश्विन सावंत

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोकणचा मेवा म्हणून प्रसिद्ध असलेले एक फळ म्हणजे करवंद. कोकणात फिरताना या करवंदाचे एखादे लहान झुडुप दिसते, याला कोकणात करवंदाची जाळी म्हणतात. एप्रिल-मेमध्ये या करवंदाच्या हिरव्या जाळ्या करवंदांनी लगडल्यामुळे काळ्या दिसू लागतात. आंबटगोड चवीची ती करवंदे इतकी स्वादिष्ट लागतात की त्यांच्या चवीची गोडी स्वतः अनुभवल्याशिवाय कळणार नाही.

करवंदे आधी हिरवट रंगाची असतात, तेव्हा आंबट लागतात. त्या आंबट करवंदांची रुचकर चटणी करतात.जी प्रत्यक्षात तोंडाला रुची आणण्यामध्ये व खाल्लेल्या अन्नाचे पचन होण्यासाठी उपयोगी पडते. पिकलेल्या करवंदांमधून शरीराला चांगले पोषण मिळते. १०० ग्रॅम करवंदे शरीराला ४२ उष्मांक पुरवतात आणि त्यांमधून २.९ ग्रॅम कर्बोदके, २.९ चरबी (अर्थातच शरीर उपकारक वनस्पतीज चरबी) आणि १.१ ग्रॅम प्रथिने मिळतात. करवंदांमधून २१ एमजी कॅल्शियम, २८ एमजी फॉस्फरस व ०.६ ग्रॅम खनिजेसुद्धा मिळतात. तुलनेने हे पोषण फार चांगले म्हणता येणार नाही, हे मान्य. परंतु जाता-येता सहज गंमत म्हणून खाल्ली जाणारी करवंदेही इतके पोषण देतात, हे काही कमी नाही. आता समजून घेऊ करवंदांच्या एका अलौकिक गुणाबद्दल!

सुकी करवंदे : लोहाचे आगार !

पिकलेली करवंदे सुकवल्यानंतर इतकी छान लागतात की यंव रे यंव! ज्याने सुकी करवंदे खाल्ली आहेत, त्यालाच त्याचा स्वाद माहीत! दुर्दैवाने कोकणच्या या मेव्याला जगात मात्र फारशी मागणी नाही. मात्र या सुक्या करवंदांमध्ये एक असा अलौकिक गुण आहे, ज्यामुळे संपूर्ण जगाचे लक्ष आपण करवंदांकडे वळवू शकतो. तो गुण म्हणजे करवंदांमधील लोहाचे प्रचंड प्रमाण.

हेही वाचा… Monsoon Health : पावसाळ्यात आजारांपासून दूर राहण्यासाठी काय करावे? तज्ज्ञांनी सांगितल्या सोप्या टिप्स!

ज्या देशामधील जवळजवळ प्रत्येक स्त्रीच्या शरीरामध्ये हिमोग्लोबिनचे व पर्यायाने लोहाचे प्रमाण कमी असते, ज्या देशामध्ये कुटुंबामधील निदान एका व्यक्तीला रक्तवाढीच्या औषधांची गरज असते, त्या देशासाठी करवंदे म्हणजे निसर्गाने दिलेले वरदान आहे. १०० ग्रॅम सुक्या करवंदांमधून तब्बल ३९.१ एमजी इतके लोह मिळते. ते प्रमाण किती जास्त आहे, हे समजण्यासाठी इतर अन्नपदार्थांमधून मिळणार्‍या लोहाची जरा तुलना करून पाहा.

ज्या दोन पदार्थांना आधुनिक आहारतज्ज्ञ डोक्यावर घेतात, त्या बदामांमधून मिळते ५.०९ इतके लोह आणि सफरचंदांमधून मिळते ०.६६ इतके अत्यल्प लोह. त्यात पुन्हा बदामांबाबत हा प्रश्न आहेच की तितके लोह मिळण्यासाठी तुम्ही १०० ग्रॅम बदाम एकाच वेळी कसे खाणार व पचवणार? इतक्या प्रमाणात त्यांचे सेवन करता येणे शक्यच नाही. मूठभर सुकी करवंदे सहज खाता येतात. बरं, सुक्या करवंदांमधून मिळणारे पोषण लोहापर्यंतच थांबत नाही, तर त्यामधून इतर पोषक घटकसुद्धा मिळतात. प्रथिने मिळतात २.३ ग्रॅम, कर्बोदके ६७.१ ग्रॅम, एकंदर ऊर्जा ३६४ उष्मांक, कॅल्शियम मिळते १६० एमजी व फॉस्फरस ६० एमजी. सुक्या करवंदांमधून शरीराला अत्यवाश्यक अशी उपकारक चरबी खूप जास्त प्रमाणात मिळते, ९.६ ग्रॅम इतक्या प्रमाणात. ही प्राणिज चरबी नाही तर वनस्पतिज चरबी आहे.

हेही वाचा… Health Special: शिबे टाळण्यासाठी काय कराल?

तुमच्या लक्षात आले असेल की आंबटगोड चवीच्या ताज्या करवंदांमधून मिळणार्‍या पोषक तत्त्वांमध्ये, तीच करवंदे सुकवल्यानंतर जमीन-अस्मानाचा फरक पडतो. करवंदे सुकल्यानंतर त्यातल्या पोषक तत्त्वांमध्ये बरीच वाढ होते. लोह तर ताज्या करवंदांमध्ये नगण्य मात्रेमध्ये असते, तेच सुकवलेल्या करवंदांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढते, हे आश्चर्यजनक आहे. हा झाला ताज्या करवंदांवर केलेला शोषणाचा (सुकवण्याचा) संस्कार आणि काळाचा प्रभाव!

हेही वाचा… Health Special: सगळं संपवून टाकावं वाटतं तेव्हा काय विचार करायला हवा? दुःखाचे ढग कसे दूर साराल?

इथे मुद्दामहून सुचवायचे आहे की, आपल्या फळांना जगभर मागणी वाढावी असे वाटत असेल तर सर्वप्रथम आपल्याकडे त्याची मागणी वाढली पाहिजे. तुम्ही म्हणाल बाजारात सुकी करवंदे सहज उपलब्ध होत नाहीत. पण त्याला जबाबदार कोण ? आपणच नाही का? आपण कधी बाजारात करवंदांची मागणी करतो का? सुकी सोडा, ताजी करवंदे तरी हल्ली बाजारात दिसतात काय? नाही, कारण आपण करवंदांसारख्या फळांची मागणीच करत नाही. आपण मागे असतो ॲपल, चेरी आणि बेरीजच्या. जी एक तर आपल्या फळांच्या तुलनेमध्ये फार चांगले पोषण देत नाहीत आणि मुळात ती आपल्या मातीतली फळे नाहीत. करवंदाची बी कुठेही टाकली तरी त्याचे झाड उगवते, तसे सफरचंद व चेरीबेरीजचे नाही. त्यांची बी टाकून बघा, रुजते का? नाही ना? अहो, निसर्गच तुम्हाला सांगतोय की ती फळे तुमच्यासाठी नाहीत म्हणून, तरी आपण त्यांना अकारण महत्त्व देतो आणि तळी भरतो बाहेरच्यांची. आता तरी हे थांबवा!

आपल्या फळांचे महत्त्व समजून घ्या. बरं,असं नाही की ही फळे आपल्या मातीतली आहेत, म्हणून फक्त ती खाण्याचा आग्रह मी करत आहे. त्या फळांमधून आपल्या शरीराला उत्तम पोषणसुद्धा मिळतेच की. तेव्हा आपण सगळ्यांनी मिळून आपल्या फळांची मागणी वाढवू या. मागणी वाढली की पुरवठा सुरू होतो, हे तर अर्थशास्त्रातले साधे गणित आहे. शासन-प्रशासन, व्यापारी व नागरिक या सर्वांनी मिळून हे गणित जुळवून आणले तर आपल्या मातीतल्या फळांची कीर्ती जगभर पसरेल आणि आपल्या गावातल्या अनेकांचे आर्थिक गणित सुधारेल. सुकी करवंदे हा भारताकडून जगाला पुरवला जाणारा एक अतिशय स्वादिष्ट असा सुक्या मेव्याचा पदार्थ म्हणून आणि रक्तक्षयावर (ॲनिमिया) वर प्रभावी असा नैसर्गिक पदार्थ म्हणून संपूर्ण जगात प्रसिद्ध होऊ शकतो.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Health special compare to other foods iron is available much more in conkerberry hldc asj
Show comments