विगन, नैसर्गिक आणि केवळ फलाहार करून जगणार्‍या सोशल मीडिया सेलेब्रिटीचा वयाच्या ३९व्या वर्षी कुपोषणामुळे मृत्यू झाल्याची बातमी दोनच दिवसांपूर्वी व्हायरल झाली आणि विगन अर्थात वनस्पतीजन्य आहारशैलीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. गेली अनेक वर्ष केवळ शाकाहार त्यात देखील फक्त वनस्पतिजन्य आहाराची अनेक तत्त्वे समाज माध्यमांत वारंवार अधोरेखित केली जात आहेत. त्याला कधी क्लिन्सिंग, कधी हरित आहार, नैसर्गिक आहार, प्रकियारहित आहार अशी वेगवेगळी नावे दिली जातात. आणि हीच आहारशैली कशी योग्य आहे याबद्दल अनुभवांतून मार्गदर्शन असे याचे स्वरूप लोकप्रियता पावते आहे, पण वास्तव नेमके आहे तरी काय?

आणखी वाचा: Health Special: गूळ केव्हा वापरावा? केव्हा वापरू नये?

परवा घडलेल्या या मृत्यूमुळे समाजमाध्यमांवर देखील खळबळ उडालेली आहे. मुळात विगण आणि फलाहार करून जगल्यास किंवा केवळ प्रक्रियारहित भाज्या आणि फलाहारावर अवलंबून राहण्यास राहिल्यास काय होते, हे जाणून घेणे खूप आवश्यक आहे. या बातमीमधील तथ्य हे की, ही व्यक्ती अनेक महिने केवळ ऋतुमानानुसार उपलब्ध असणारी फळे खात होती, त्याव्यतिरिक्त काहीच नाही. त्यामुळे आहारात भले कर्बोदकांचे आणि ऊर्जेचे प्रमाण मुबलक होते, मात्र प्रथिनांचे प्रमाण अत्यंत कमी होते.

आणखी वाचा: Health Special: तांबे, पितळ, स्टील-कशातून खावंप्यावं?

वनस्पतीजन्य आहारामध्ये प्रथिनांचे असणारे प्रमाण आणि हे पदार्थ खाल्ल्यावर त्यातून शरीराला मिळणारी प्रथिने यात खूप तफावत आहे. शिवाय ज्या वनस्पतीजन्य पदार्थांमध्ये प्रथिने असतात, त्यात कर्बोदके आणि स्निग्ध पदार्थ प्रथिनापेक्षा जास्त असतात. कच्च्या भाज्यांमधून मिळणारी अनेक पोषणमूल्ये पूर्णपणे शरीरात शोषली जावीत यासाठी, त्यावर योग्य आहार संस्कार करणे आवश्यक असते. उदा. टॉमेटोमधील लाकोपिन शरीरात योग्य प्रकारे मिळण्यासाठी त्याला तेल किंवा तूप सोबत असणे आवश्यक असते. केवळ कच्चे पदार्थ खाल्ले गेल्यास पोटाचे आरोग्य सुधारते, बद्धकोष्ठापासून आराम मिळतो हे जरी खरे असले तरी पोट अतिसाफ झाल्याने आवश्यक जीवनसत्त्वेदेखील शरीरातून बाहेर फेकली जातात.

आणखी वाचा: Health Special: आरोग्यदायी केशर

विगनचे दुष्परिणाम

या पद्धतीमध्ये दूध आणि दुग्धजन्य पदार्थ देखील वर्ज्य केल्यामुळे किमान प्रमाणात मिळणारे जीवनसत्त्व आणि कॅल्शिअम यांचे प्रमाणदेखील अत्यल्प असते. विगन आहारनियमन करताना योग्य प्रमाणात सप्लिमेंटेशन म्हणजे जीवनसत्व आणि पोषणमूल्य असणारी औषधे घेणे आवश्यक असते. शिवाय तेलबिया आणि सुकामेवा यांचे प्रमाण आहारात योग्य प्रमाणे राखणे अत्यंत आवश्यक असते. आवश्यकतेपेक्षा जास्त दिवस प्रथिनांचे प्रमाण आहारात शून्य केल्यानंतर किंवा प्रथिनांचे प्रमाण अतिशय कमी केल्यास रोगप्रतिकार शक्ती कमी होणे, स्नायूंची झीज होणे, झोप न लागणे, पोषणतत्त्वांचे प्रमाण कमी होणे, स्नायूंची झीज होणे, हृदयावर अतिताण येणे असे दुष्परिणाम होऊ लागतात.

अन्नावरील प्रक्रिया महत्त्वाची

परवाच कुपोषणाची बळी ठरलेल्या या इन्फ्लुएन्सरचे गेल्या काही दिवसातले फोटो आपण पाहिले तर आपल्या लक्षात येईल की तिला पूरक आहाराची जास्त आवश्यकता होती. केवळ इन्स्टाग्रामेबल जगण्याच्या आहारी जात रंगीबेरंगी पदार्थ तयार करून त्याचे एक भासमान जग तयार करण्यापेक्षा आहाराबाबत सजग विचार करणे, वेळीच रक्ततपासणी करणे आणि योग्य आहारतज्ज्ञांच्या सल्ल्यानेच कोणतीही आहारपद्धती अवलंबिणे आवश्यक आहे. केवळ आहार पद्धतीच नव्हे तर स्वयंपाक करताना शिजवणे, उकडणे, उकळणे, वाफेवर शिजवणे, रस तयार करणे यासारख्या संस्करणावर लक्ष देणे महत्वाचे आहे. विगन आणि वनस्पतीजन्य आहारासोबत कोणतेही फॅट्स किंवा स्निग्ध पदार्थरहित आहार पद्धतीचे समर्थन करणार एक वर्ग मोठ्या प्रमाणात आढळतो. तेलबिया वापरणे किंवा एखाद्या भाजीसाठी फोडणी देणे या छोट्याशा क्रियेमुळे त्यातील अनेक अन्नघटक आपल्या शरीराला योग्य फायदे करून देऊ शकतात. उदाहरणार्थ फोडणीसाठी वापरले जाणारे तेल मसाल्यातील स्निग्धांश सहज पदार्थामध्ये एकरूप होऊन त्याचे योग्य विघटन करण्यासाठी कारणीभूत ठरतात.
काही फळं कच्च्या स्वरूपात असताना म्हणजे ती पिकण्याआधी त्यांच्यावर विविध प्रक्रिया करून देखील आहारात समाविष्ट करू शकतो. हे जाणून घेऊन आहारात त्यांचा योग्य प्रमाणात समावेश करणे आवश्यक आहे.

आता तुम्हाला हा देखील प्रश्न पडला असेल की, कच्च्या भाज्या खाण्यासाठी तुम्हीच नेहमी आग्रही असता त्याने आतड्याच्या आरोग्यासाठी होणारे फायदे नेहमी सांगितले जातात त्याच काय?

…तर कच्च्या भाज्यांचे सलाड किंवा दिवसभरात १-२ फळे खाण्यासोबत पूरक आहार घेणेदेखील तितकेच आवश्यक आहे. शिवाय आतड्याचे आरोग्य राखताना पूरक भाज्या आणि फळे यांचे मिश्रण आहारात समाविष्ट करणे तितकेच महत्वाचे आहे.

आहारातील कर्बोदके (कार्ब्स ), प्रथिने (प्रोटिन्स) आणि फॅट्स (स्निग्ध पदार्थ) यांचा समतोल राखताना आपण आपल्या शारीरिक घडणीनुसार, जीवनशैलीनुसार आहार नियमन करणे आवश्यक आहे. समाजमाध्यमांवर भासवले जाणारे जग दिसते तितके रंजक किंवा रम्य असेलच असे नाही. विशेषतः आहारविषयक कोणताही सल्ला किंवा अनुभव स्वतःच्या आहारात अवलंबताना याची जाणीव असणे महत्वाचे आहे. विगन, फलाहार, नो फॅट, नो कुकिंग असे अनेक आहार प्रकार आणि ट्रेण्ड्स सातत्याने येत राहणार आहेत यात आपले स्वास्थ्य जपणे ही आपली जबाबदारी आहे!