Health Special: पावसाळ्यामध्ये पाणी साचल्यामुळे डेंग्यू, मलेरिया, लेप्टोस्पिरोसिस, पोटाचे विकार इत्यादी आजार होऊ शकतात. म्हणूनच पावसाळ्यात आहारावर विशेष लक्ष देणे आवश्यक असते. जाणून घेऊया पावसाळ्यात आरोग्याची काळजी कशी घ्यावी…

पाणी

पावसाळ्यात पाणी उकळून प्यावे. कारण, नदी, नाले विहिरी, तळी यांच्यात येणारे पाणी बऱ्याच घाणीतून प्रवास करुन येत असते. पण बऱ्याच जणांना उकळलेल्या पाण्याची चव आवडत नाही. आजकाल सर्वांच्या घरी फिल्टर किंवा आर ओ (Reverse Osmosis) चे मशीन असते. परंतु ज्यांना ते शक्य नाही त्यांनी पावसाळ्याच्या वेळी नगरपलिकेकडून क्लोरिनच्या गोळ्या/ थेंब मिळतात, ते प्यायच्या पाण्यात टाकल्याने पाणी शुद्ध होण्यास मदत होते.

हेही वाचा – Health Special: पावसाळ्यात थंडी असूनही हिवाळ्याप्रमाणे भूक का लागत नाही?

पाण्यात सुंठेचा तुकडा वापरावा

विकत मिळणाऱ्या पाण्याच्या बाटल्या चांगल्या असतात. परंतु हल्ली तिथेही कधी कधी भेसळ असते. पावसाळ्यातील नवे पाणी बाधते. लोकांना सर्दी-पडसे याचा त्रास होत राहतो. तो टाळण्यासाठी म्हणून पाण्यात (पिंपात) सुंठेचा एक तुकडा घालावा, तो दर तीन-चार दिवसांनी बदलावा.

अन्न

पावसाळ्यात पचायला हलका व प्रमाणशीर असाच आहार असावा. अधिक प्रमाणात घेतलेला आहार जो पचायला कितीही हलका असला तरी अयोग्यच! पचायला हलका आहार म्हणजे अग्निसंस्कार केलेला आहार. लाह्या, भाकरी, चपाती, दूध-भात, पिठले असा आहार. नुसत्या पावापेक्षा त्याचा टोस्ट बनवून खावा. पावसाळ्याच्या सुरुवातीला शरीरात अग्नी कमी प्रमाणात असतो, जो अन्नपचनासाठी आवश्यक असतो. त्यामुळे या ऋतूत पक्वान्ने टाळावीत. मात्र स्वयंपाकाचे पदार्थ तेल- तुपाने मसाल्याचे चमचमीत बनवलेत तरी चालेल. आपण स्वयंपाकात हिंग- मिरी, आलं, लसूण, कडीपत्ता, कोथिंबीर, पुदीना इ. वापरतो, ही सर्व द्रव्ये दीपन-पचन करणारी आहेत. थोडक्यात, म्हणजे अन्नपचनाला मदत करणारी आहेत.

माफक तेल

माफक तेल वात कमी करणारे आहे तर साजुक तूप, वात व पित्त दोन्ही कमी करणारं आहे. पावसाळ्यात वात व पित्त दोन्ही वाढलेले असते म्हणून जमल्यास अन्नपदार्थ साजुक तुपात करावेत, वनस्पती तुपात नव्हे! तेलातील विशिष्ट घटकामुळे पित्त वाढते आणि वर्षा ऋतू म्हणजे पित्तसंचयाचा ऋतू ! म्हणून तेलात तळलेले पदार्थ या दिवसात खाऊ नयेत. पावसाळ्याच्या सुरुवातीला गरम भजी, बटाटेवडे खावेसे वाटले तरी, प्रमाणात खाल्लेले बरे. अन्यथा असे पदार्थ जास्त खाणे म्हणजे आजारांना निमंत्रणच.

दही टाळावे, ताक वापरावे

या ऋतूत दही कमी खावे. दह्यामुळे शरीरातील अग्नी मंदावतो, पण ताक याच्या विरुद्ध गुणधर्माचे आहे. म्हणून या दिवसात ताक प्यावे. सुंठ, आलं व सैंधव मीठ घातलेले ताक व दह्याच्या वरचे पाणी नियमित प्यावे. पालेभाज्यांमध्ये माठाची भाजी योग्य. शिवाय दुधी, दोडका, पडवळ, भेंडी अशा वातशामक भाज्या अधिक प्रमाणात घ्याव्यात.

हेही वाचा – Health Special: पावसाळ्यात अपचनाचा त्रास अधिक का होतो?

जुनी धान्ये उत्तम

जुने धान्य पचावयास हलके असते. त्यामुळे या ऋतूत जुने गहू, जुने तांदूळ, जुनी धान्ये (मूग, मटकी, चवळी) वापरावीत. आवळा, लिंबू यांची सरबते उत्तम. ओवा, हळद, मिरी, सुंठ यांची पावडर करुन भाकरी, चपातीत वापरल्यास उत्तम.

मांस टाळा, सूप प्या

मांसाहारी व्यक्तीने मांस खाण्यापेक्षा त्याचे सूप करुन प्यावे. यातही सुंठ, मिरी, पुदीना इ. चा सढळ हाताने वापर करावा.

पावसाळ्यात आहाराची काळजी आवश्यक

आपल्या संस्कृतीत आषाढी ते कार्तिकी एकादशीपर्यंत ‘चातुर्मास’ पाळला जातो. यामध्ये मांसाहारी आहार बंद असतो व उपवास जास्त असतात. उपवासाच्या पदार्थांत पिष्टमय पदार्थ जास्त असतात व ते पचण्यास सोपे असतात. उपवासात पोटास आराम मिळतो. म्हणून चातुर्मासाचे धार्मिक निमित्त असले तरी, त्यामागे वैज्ञानिक कारणही असण्याची शक्यता अधिक आहे.