दोषांचा संचय-प्रकोप-प्रशम- प्राकृत असताना शरीराचे संचालन करणार्‍या आणि विकृत झाल्यावर शरीरामध्ये विकृती-रोग निर्माण करणार्‍या (आणि म्हणूनच दोष म्हणून ओळखले जाणार्‍या) वात, पित्त व कफ या मूलभूत तत्त्वांचा वर्षभरातील बारा महिन्यांच्या विशिष्ट तीन ऋतूंमध्ये संचय-प्रकोप व प्रशम होत असतो. त्या त्या ऋतूमध्ये निसर्गात, वातावरणात होणारे बदल, त्या त्या ऋतूमध्ये हवा, पाणी, माती, आकाश या मूलभूत तत्त्वांवर होणारा परिणाम, त्यांच्या परिणामी वनस्पती व प्राणी जगतावर होणारा परिणाम, मनुष्याच्या आहार-विहाराचे शरीरावर होणारे परिणाम, आणि या सर्वांचा मनुष्य-शरीरावर होणारा एकत्रित परिणाम; यांमुळे मानवी शरीराचे संचालन करणार्‍या वात-पित्त व कफ या मूलभूत तत्त्वांवरसुद्धा परिणाम होतो, जो आयुर्वेदाने ’संचय-प्रकोप-प्रशम’ या परिभाषेत मांडला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संचय म्हणजे त्या-त्या दोषासमान गुणांची शरीरात वाढ झाल्याने त्या दोषाची शरीरामध्ये वाढ होणे किंवा जमणे ज्याला ’संचय’ म्हटले. जसे- वर्षा ऋतूमधल्या पावसाळ्यात पाणी अम्लविपाकी (शरीरावर आंबट परिणाम करणारे) झाल्याने आंबट गुणांच्या पित्ताचा शरीरामध्ये संचय होतो (म्हणजे पित्त शरीरामध्ये जमत जाते). त्यानंतर पुढच्याच शरद ऋतूमध्ये उष्मा वाढताच शरीरात जमलेले ते पित्त उसळते, पसरते व विविध रोगांना कारणीभूत होते, हा झाला पित्ताचा शरद ऋतूमध्ये होणारा प्रकोप आणि त्यानंतरच्या हेमंत ऋतूमध्ये हिवाळा सुरु होताच पित्त आपसूक शमते, हा झाला पित्ताचा ’प्रशम’.

हेही वाचा – Mental Health Special : स्क्रीनशॉटमुळे तुमची फसवणूक होऊ शकते का?

थंडीमधील नैसर्गिक पित्तशमन (सुश्रुतसंहिता १.६.१३)

थंडीआधीच्या शरद ऋतूमध्ये (ऑक्टोबर-हिटच्या दिवसांमध्ये) जो पित्तप्रकोप झाला होता, त्या पित्ताचे या थंडीमध्ये (हेमंत ऋतुमध्ये) निसर्गतः शमन झालेले दिसते. वर्षा ऋतूमध्ये (पावसाळ्यामध्ये) शरीरामध्ये पित्त जमते, शरद ऋतूमध्ये (ऑक्टोबरच्या उष्ण काळामध्ये) ते पित्त उसळते तर या थंडीमध्ये त्या पित्ताचे स्वाभाविकरित्या शमन होते.

साहजिकच जे जे पित्तप्रकोपजन्य आजार वर्षा, विशेषतः शरद ऋतूमध्ये शरीराला त्रस्त करत होते, ते या थंडीमध्ये स्वाभाविकरीत्या बरे होतात. त्यामुळे तोंड येण्यापासून अम्लपित्तापर्यंत, गुदावाटे रक्तस्त्राव होण्यापासून चक्कर येण्यापर्यंत आणि अंगावर लालसर पुळ्या उठून खाज येण्यापासून कांजिण्या-गोवरपर्यंत, अर्धशिशीपासून ते अंगाचा दाह होण्यापर्यंत जे अनेक पित्तविकार या आधीच्या शरद ऋतूजन्य पित्तप्रकोपामुळे उद्भवलेले असतात, त्यामध्ये थंडी पडली की आपसूकच आराम पडलेला दिसतो.

हेही वाचा – Health Special : थंडीत अळिवाचे लाडू का खातात?

मात्र ज्यांचे पित्तविकार दीर्घकाळापासून असतात (जे केवळ या शरद ऋतूमध्ये नाही तर वर्षभरातल्या कोणत्याही ऋतूमध्ये होऊ शकतात), त्या आजारांमध्ये मात्र थंडी आली म्हणून थोडा आराम पडला असे होते, मात्र ते बरे होत नाहीत. योग्य तो उपचार घेतल्यानंतरच आराम मिळतो, कारण मुळात ते आजार ऋतूकाळ-प्रभावजन्य नसून आपल्या आहार-विहारातील चुकांमुळे झालेले असतात. अन्यथा ऋतूकाळामुळे झालेले पित्तरोग थंडीमध्ये आपसूक शमतात, कारण पित्तशमन हा हेमंत ऋतूमधला एक स्वाभाविक बदल आहे.

हेमंत ऋतु : दोषांची साम्यावस्था

हेमंत ऋतुमध्ये सुरुवातीचे काही दिवस जोवर गुलाबी थंडीचे दिवस असतात अर्थात सुखकर हिवाळा असतो, तोवर शरीरामध्ये कफाचा संचय होत नसल्याने तो काळ असा असतो जेव्हा शरीरात तीनही दोष प्राकृत असतात. ना एखाद्या दोषाचा संचय, ना प्रकोप. हेमंत ऋतूचा हा एकच काळ असा आहे, जेव्हा तीनही दोष सम अवस्थेमध्ये असतात. वात-पित्त-कफ या तीन दोषांची साम्यावस्था म्हणजेच स्वास्थ्य अशी आयुर्वेदाने आरोग्याची व्याख्या केली असल्याने हेमंत ऋतू हा सर्वोत्तम स्वास्थ्याचा काळ समजला जातो. आयुर्वेदानुसार शरीरामध्ये वात पित्त कफ हे तीनही दोष साम्यावस्थेमध्ये असतात व त्यामुळे हेमंत ऋतूमध्येसुद्धा देहबल सर्वोत्तम असते.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Health special dosha condition in winter hldc ssb
Show comments