Health Special रोज फिरायला येणारे शरदराव भेटले, वय वर्षे ७५. त्यांच्या कॉलनीतल्या एका कार्यक्रमाचे त्यांनी निमंत्रण दिले. या वेळेस त्यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या खेळांच्या आणि गाण्याच्या स्पर्धा आयोजित केल्या होत्या. बक्षीस समारंभाला एका समाजसेवी कार्यकर्त्याला बोलावून त्याचा सत्कार करायचा अशी त्यांची योजना होती. त्यांचा उत्साह पाहून मी थक्क झाले. म्हातारपणाच्या सर्वसाधारण कल्पनेला छेद देणारे असे अनेक जण आज आपल्याला भेटतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

म्हातारपण म्हटले की, विविध आजारपणे! उच्च रक्तदाब (बीपी), मधुमेह, संधिवात, अर्धांगवायूचा झटका असे अनेक विकार म्हातारपणी जडतात.

म्हातारपणातही आयुष्यातल्या अनेक घटनांना सामोरे जावे लागते. मुख्य म्हणजे आपल्या नोकरी व्यवसायातून सेवानिवृत्त व्हावे लागते. त्याचबरोबर आजी- आजोबा होण्याचा आनंद काही वेगळाच असतो. कधी कधी मुले दूर राहत असल्यामुळे वृद्ध पती- पत्नीला एकटेच राहावे लागते, तर दूर राहणाऱ्या मुलाबरोबर राहायचे तर म्हातारपणी नवीन ठिकाणी पुनः एकदा नव्याने आयुष्य सुरू करावे लागते. सगळ्यात कठीण गोष्ट म्हणजे आपल्या जवळच्या व्यक्तींच्या मृत्यूचे दुःख सोसावे लागते.

हेही वाचा…६३ किलो वजन कमी करताना महिलेने काय खाल्लं? डॉक्टरांनीही सांगितलं रोजच्या जेवणातील ‘या’ घटकाचं महत्त्व

एकटेपणा, परावलंबित्व, आजारपणे अशा गोष्टींमुळे म्हातारपणातही ताणतणाव निर्माण होतो आणि कधी कधी निद्रानाश, निराशा, उदासीनता, अतिचिंता असे मानसिक विकार होऊ शकतात. ह्या पार्श्वभूमीवर जेव्हा शरदरावांसारखे उत्साही ‘तरुण’ वृद्ध भेटतात, तेव्हा त्यांच्या उत्साहाची आणि आनंदाची गुरुकिल्ली काय अशी उत्सुकता निर्माण होते.

शरदरावांना विचारले तर ते म्हणतात, ‘तरुणपणी वयात येताना जशी आपण आपल्या सौंदर्याची काळजी घेतो, तशीच काळजी आपल्या शारीरिक आणि मानसिक सौंदर्याची म्हातारपणीही घ्यावी लागते. त्याविषयी जागरूक असावे लागते.’ विविध क्रीम, लोशन लावून, केसाला रंग लावूनच आपले सौंदर्य वाढत नाही; तर मुख्य म्हणजे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने आपल्या सवयींमध्ये बदल करणे आवश्यक ठरते. अतिस्थूलपणा असेल तर वजन आटोक्यात आणणे, ज्या योगे संधिवाताचा त्रास कमी होईल, डायबिटीस असेल तर योग्य पथ्यपाणी करणे अशा गोष्टी महत्त्वाच्या असतात. म्हातारपणी मला काही होणारच नाही असा फाजील विश्वास न बाळगता जी आजारपणे होऊ शकतात, त्यांचा प्रतिबंध करण्याचे प्रयत्न करणे आणि काही आजारपण आले तर ते स्वीकारून त्यावर योग्य आणि लवकर उपाय करणे महत्त्वाचे.

हेही वाचा…रोज सकाळी लिंबासह नारळपाणी सेवनाने तुमच्या शरीरावर काय परिणाम होणार? एकदा समजून घ्या फायदे व तोटे

तरुणपणी आपल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण व्हाव्या म्हणून आपण योजना करतो. वृद्धापकाळ सुखात जाण्यासाठीही अशी योजना आवश्यक ठरते. आर्थिक परावलंबित्व खूप अवघड वाटते. आपली आजारपणे, औषधे यांचा खर्च मुलांना करावा लागला की, आपण त्यांच्यावर ओझे झालो आहोत असे वाटते आणि निराशा येते. आपल्या नियोजनातून आपणच आपली व्यवस्था करून ठेवलेली असली की मनात अपराधीपणाची भावना निर्माण होत नाही. आर्थिक नियोजनामुळे आपल्या आवडीच्या अनेक गोष्टी करता येतात. एक निवृत्त शिक्षिका दरवर्षी जगभरातल्या विविध सफरींना जातात.

एकट्याच जातात, पण परतताना अनेक नवीन मित्र- मैत्रिणी मिळवतात. आपले हास्य, उत्साह यातून मनाचे सौंदर्य म्हणजेच मनातला आनंद प्रतीत होतो. निवृत्तीनंतर आपले छंद जोपासणारे अनेक जण असतात. कुणी नव्याने गाणे शिकू लागते तर कुणी चित्रकला व हस्तकला शिकू लागते. नवीन छंद जोपासताना पुन्हा एकदा मित्र-मैत्रिणींचा गट तयार होतो. वयाचे बंधन नसलेली ही मैत्री आबालवृद्धांना एकत्र आणते आणि जगण्याचा नवीन उत्साह निर्माण करते.

हेही वाचा…Weightloss Exercise: वजन कमी करण्यासाठी व्यायाम करताय? सकाळी करावा की संध्याकाळी? घ्या जाणून…

म्हातारपणी रिकामपण खायला उठते असे म्हणतात. एक विशिष्ट दिनक्रम ठरवून घेतला तर असा रिकामा वेळच उरत नाही. वृद्धांवर नातवंडांना सांभाळणे, शाळेत ने-आण करणे, घरातली कामे करणे अशा अनेक कौटुंबिक जबाबदाऱ्या असतातच. या शिवाय फिरणे, योग, व्यायाम अशा गोष्टींसाठी वेळ दिला तर आरोग्य टिकून राहते. दिवसाच्या शेवटी आपल्या व्यस्त दिनक्रमानेच मन समाधानी होते. एका कॉलनीत राहणारे वृद्ध, एकत्र फिरायला जाणारे पेन्शनर, कट्ट्यावर बसून गप्पा मारणाऱ्या वृद्धांचा घोळका यातून एकमेकांची सुख-दुःखे वाटली जातात, कठीण प्रसंगामध्ये एकमेकांना मानसिक आधारही मिळतो. सामूहिकतेतून नवीन नातेसंबंध निर्माण होतात.

मानसिक संघर्षाचे या काळातील प्रमुख कारण असते दोन पिढ्यांमधील वाढते अंतर, विचारांची भिन्नता. पुढच्या पिढीशी संवाद साधणे, त्यांचे विचार समजून घेणे, त्यांचा जीवनसंघर्ष जाणून घेणे, यातून एकमेकांची नाती अधिक पक्की होतात. ‘आमच्यावेळेस नव्हते बुवा असे काही!’, किंवा ‘आजकालच्या मंडळींना काही जबाबदाऱ्या नकोत’ अशी विधाने मग मागे पडतात. तरुण पिढीही आधारासाठी आधीच्या पिढीकडे येते.

हेही वाचा…झोपेतून उठताच रिकाम्या पोटी ओव्याचा चहा घेण्याचे फायदे डॉक्टरांनीच सांगितले; फक्त प्रमाण ‘इतकं’ हवं

आपल्या आयुष्यातील जबाबदाऱ्या आपण पार पडल्या, आता आपण समाजाचे काही देणे लागतो ही आयुष्यभर जपून ठेवलेली भावना पुनः एकदा जागृत होते आणि अनेक वयस्क मंडळी वेगवेगळी समाजोपयोगी कामे करताना दिसतात. ज्येष्ठ नागरिकांच्या विविध संघटना आज कार्यरत आहेत. त्यांच्यातर्फेसुद्धा अनेक उपक्रम राबवले जातात. आपल्या स्वतःच्या राहत्या वस्तीपासून ते खेड्यापाड्यातल्या गरजूंपर्यंत अनेक ठिकाणी हे ज्येष्ठ नागरिक आपले योगदान पैसा, वेळ, आपले कौशल्य या स्वरूपात देताना दिसतात.

हेही वाचा…उन्हाळ्यात अंडी खावी की नाही? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात

काही जण अधिक अंतर्मुख होतात आणि त्यांच्यातील आध्यात्मिक वृत्ती वाढते. पंढरपूरची वारी असेल, कीर्तनकाराचे प्रशिक्षण असेल, एखाद्या भजनीमंडळात सामील होणे असेल किंवा एकत्र जमून काही धार्मिक वाचन- विवेचन असेल अशा वेगवेगळ्या पद्धतींनी अनेक जण मनःशांती मिळवतात. लांबच्या प्रवासाला जायचे असले की जास्त तयारी करावी लागते. आता आयुर्मान वाढत चालले आहे. म्हणजेच लांबचा पल्ला गाठायची संधी अनेकांना मिळते. त्यासाठी तसेच नियोजन करणेही महत्त्वाचे ठरते. आपल्या वृद्धापकाळाची तयारी आत्तापासून केली तर स्वस्थ, समाधानी वार्धक्य सहज आपल्या हातात आहे हे लक्षात येईल. यशस्वी जीवनाचा शेवटचा टप्पा म्हणजे अशा प्रकारे यशस्वीपणे वार्धक्य व्यतीत करणे!

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Health special how to keep happy in old age hldc psg
Show comments