‘वर्तमानपत्र उघडूच नये असे हल्ली वाटते. पहिले पान उघडले की मथळेच इतके भयंकर असतात की अंगावर काटा येतो.’ काका मनातल्या मनात म्हणत होते. “अत्यंत अमानुषपणे केलेला बलात्कार, त्यानंतर केलेली निर्घृण हत्या, ऑनर किलिंगसारख्या धक्कादायक घटना, बेछूटपणे केलेला गोळीबार, त्यात काही मुलांचा प्राण जाणे, दंगली उसळणे, दहशतवादी हल्ले होणे आणि अर्थातच जगाच्या पाठीवर विविध ठिकाणी चाललेली युद्धे! दररोज अशा बातम्या वाचून, टीव्हीवर त्याच बातम्या ऐकून आणि सोशल मीडियावर येणारे व्हिडीओ, आणि मेसेजेस सगळ्यांनी मन अस्वस्थ होते. कुठे चालला आहे समाज?” काकांनी सुस्कारा सोडला.

लोकल ट्रेनमध्ये चढताना रोज बाचाबाची होते. रस्त्याने चालताना कुणाला धक्का लागला तर लगेच शिवीगाळ करणारे लोक असतात. वस्तीतल्या नळावर पाणी भरताना रोज भांडणे होताना दिसतात. एखादा तरुण प्रेमभंगातून अ‍ॅसिड हल्ला करतो. कुटुंब कलहांमध्ये खून करणारेही आढळून येतात. समाजात अशा आक्रमकतेच्या घटना रोज घडत असतात. एकट्यादुकट्याच्या अशा आक्रमक कृतीबरोबरच मोठ्या समूहामध्येसुद्धा हिंसाचाराच्या अनेक घटना घडत असतात. उत्सवांमध्ये छोट्याशा कारणावरून दोन गट हमरीतुमरीवर येतात. छोट्याशा कारणावरून अचानक दंगल सुरू होते आणि जीवित आणि वित्तहानी होते. आत्मघातकी बॉम्ब हल्ल्यात शेकडो माणसे दरवर्षी बळी पडतात. इतकेच काय तर देशादेशांमध्ये जी युद्धे सुरू असतात, त्यामुळे असुरक्षितता निर्माण होते.

हेही वाचा – Health Special : पावसाळ्यानंतर उकाडा सुरु होताना काय काळजी घ्यावी?

जगात हिंसाचार वाढत चालला आहे आणि जणू काही तो सर्वमान्य होत आहे. कदाचित हिंसाचाराच्या बातम्यांचा सतत भडीमार होत असल्याने आपल्याही संवेदना बोथट होत चालल्या आहेत आणि आपण हिंसाचार ही स्वीकारार्ह गोष्ट मानू लागलो आहोत की काय असे वाटते.

हिंसाचार म्हणजे जाणून बुजून दुसऱ्याला किंवा स्वतःला शारीरिक किंवा मानसिक इजा होईल अशी वर्तणूक. स्वतःला इजा करून घेणे आणि आत्महत्त्येचा प्रयत्न ही हिंसा आहे. केवळ शब्दांनीसुद्धा समोरच्या व्यक्तीला दुखावता येते. शिवीगाळ करणे, बिनबुडाचे आरोप करणे, इतकेच काय पण एखाद्याविषयी अफवा पसरवणे हे सगळे आक्रमकतेचे किंवा हिंसेचेच प्रकार ठरतात. हाताने किंवा शस्त्राच्या सहाय्याने हल्ला करण्याने प्रत्यक्ष शारीरिक दुखापत होते. एखाद्या व्यक्तीला त्याच्या आवडत्या गोष्टीपासून मुद्दाम दूर ठेवणे, जवळच्या नातलगांपासून त्याची ताटातूट करणे, अन्न, वस्त्र, निवारा हिरावून घेणे, किंवा या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष करणे हीदेखील एक प्रकारची हिंसाच आहे. या हिंसेमध्ये मानसिक आणि भावनिक इजा पोहोचते. बलात्कारासारख्या घटनांमध्ये लैंगिक हिंसाचार असतो.

हिंसाचार घराघरामध्ये दिसून येतो. नवऱ्याने बायकोला मारणे, वडिलांनी मुलाच्या किंवा मुलाने वृद्ध वडिलांच्या अंगावर हात टाकणे सर्वसाधारण झाले आहे. हिंसाचार वस्त्यावस्त्यांमध्ये, समूहामध्ये दिसून येतो. हल्ली सर्व वयोगटांमध्ये हिंसेचे प्रमाण वाढत चाललेले दिसते; त्यातही युवकांमध्ये हे प्रमाण अधिक असते. पुरुषांमध्ये हिंसाचार जास्त असतो.

हिंसाचाराची कारणमीमांसा करताना जीवशास्त्रीय घटकही काही वेळा महत्त्वाचे असतात. विशेषतः महिलांमध्ये दिसणारा हिंसाचार अनुवांशिक असू शकतो. हिंसाचारी व्यक्तीच्या नातेवाईकांमध्ये हिंसाचाराचे प्रमाण जास्त असते. आपल्या मेंदूतील विशिष्ट भाग आक्रमकतेला प्रोत्साहन देणारे, तसेच आक्रमकता नियंत्रणाखाली ठेवणारे असतात. काही कारणाने या भागांना दुखापत झाली तर मनाची हिंसक प्रवृत्ती वाढते. काही वेळेस फिट किंवा आकडी येणाऱ्या व्यक्तीमध्ये हिंसक वृत्ती बळावते. मेंदूतील सिरोटोनिन सारख्या रासायनिक द्रव्याचे प्रमाण कमी असले तर माणूस हिंसक बनू शकतो. तारुण्यावस्था प्राप्त होताना आपल्या भावनांवर नियंत्रण मिळवून त्याप्रमाणे आपली वागणूक बदलण्याचे कौशल्य प्राप्त होते. ही भावनिक वाढ नीट झाली नाही तरी हिंसेचे प्रमाण वाढते.

अर्थात आजूबाजूच्या वातावरणाचा मोठा परिणाम माणसाच्या मनावर होतो. घरात हिंसा पहिली, आपल्या वस्तीतील सतत चालणारी भांडणे आणि मारामाऱ्या लहानपणापासून पाहिल्या तर कोणत्याही प्रश्नावर हाच तोडगा असे मुले शिकू लागतात. शाळेतच दादागिरी करू लागतात. प्राण्यांना त्रास द्यायला शिकतात. त्यांच्यात वर्तणुकीचे दोष निर्माण होतात. आजूबाजूला व्यसनाधीनता असेल तर युवक व्यसनांच्या आणि त्यातून हिंसेच्या आहारी जातो.

घरात प्रतिकूल परिस्थिती असेल, दारिद्र्य असेल, पालकांच्या शिस्त लावण्यामध्ये सातत्य नसेल तर मूल लवकर हिंसेचे धडे घेते. नेहमीच सुदृढ नातेसंबंध हिंसेपासून वाचवतात. संगत बिघडली की सवयी बिघडतात आणि त्यातच शालेय वयापासून हिंसा शिकवली जाते. शाळेत आणि कुटुंबात वागणुकीचे योग्य आदर्श घालून दिले तर हिंसेची वृत्ती बळावत नाही.

टीव्ही, सिनेमांमधून हिंसेचे सर्रास चित्रण असते आणि लहानपणापासून एवढ्या मोठ्या प्रमाणावर हिंसा पाहून हिंसक प्रवृत्ती बळावते. बरेचसे व्हीडिओ गेम्ससुद्धा मारामाऱ्या आणि बंदुका यावरच आधारित असतात. मुलांची संवेदनक्षमताच त्यामुळे कमी होते. हिंसेला सामाजिक मान्यता आहे असेच यातून शिक्षण मिळते. सोशल मीडिया वर हिंसेचा भडिमार असतो!

आज समाजात दैनंदिन जीवनात खूप संघर्ष करावा लागतो. सतत घाई असते. गर्दीला तोंड द्यावे लागते. कामाचा ताण असतो. बेकारी, दारिद्र्य, लोकसंख्या, अपुऱ्या व्यवस्था अशा अनेक संकटांना सामोरे जावे लागते. त्यातून धीर धरण्याची वृत्ती संपते आणि माणसे पटकन रागावतात, चिडतात आणि मग भांडणे, मारामाऱ्या होतात. आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी आक्रमकता वापरली जाते. स्पर्धेतूनही आक्रमकता येते. कधी कधी भीतीमधून हिंसा वाढते.

एखादे ध्येय गाठण्यासाठी हिंसाचार हाच उत्तम मार्ग असे मानणारे दहशतवादाचा मार्ग स्वीकारतात. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मानसिक विकार अनेकदा हिंसेला जबाबदार असतात. उदासीनता, स्किझोफ्रेनिया, लहान मुलांमधील उतावीळपणा आणि लक्ष केंद्रित न करता येणे अशा आजारांमध्ये आक्रमकता दिसून येते. तसेच खूप वेळा हिंसाचारी माणसाची बौद्धिक क्षमता कमी असते.

हिंसेचे बळी ठरलेल्या व्यक्तीवरसुद्धा मानसिक परिणाम होतो. मनात भीती बसते. सतत हिंसाचाराचे उदा. मारामारीचे, दंगलीचे दृश्य डोळ्यासमोर येत राहते. पटकन दचकायला होते. इतरांमध्ये मिसळू नये असे वाटते. एक प्रकारचा भावनांना बधीरपणा येतो. याला post traumatic stress disorder म्हणतात. उदासीनतेचा किंवा अतिचिंतेचा आजार जडतो.

हेही वाचा – पित्ताशयातील खडे शस्त्रक्रियेशिवाय नैसर्गिकरित्या काढता येतात का? वाचा डॉक्टरांचे मत

हिंसाचाराचा अनुभव घेतल्यावर त्यावर उपाय करावेच लागतात. पण हिंसाचार वाढू नये यासाठीही मोठ्या प्रमाणावर प्रयत्नांची आवश्यकता आहे. समाजातल्या अनेक अपप्रवृत्तींची मानसिकता समजून घेताना आणि त्यांच्या प्रतिबंधात्मक उपायांची चर्चा करताना कुटुंब आणि शाळा यांची भूमिका नेहमीच महत्त्वाची ठरते. तसेच सरकारी निर्बंध, कायदेकानून यांचे महत्त्व कमी होत नाही.

मारामारी करून आपली ऊर्जा वाया घालवणाऱ्या व्यक्तीपेक्षा समाजोपयोगी कामे करणाऱ्या, आपल्या कला क्रीडा क्षेत्रातील प्रगतीच्या आधारे आनंद मिळवणाऱ्या, आपल्या कार्यक्षेत्रासाठी झटणाऱ्या व्यक्तींचा समाज आपल्याला निर्माण करायला हवा.