डॉ. चारुता गोखले

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोव्हिडोत्तर काळात समाज म्हणून आपलं सार्वजनिक आरोग्याविषयीचं भान कधी नव्हे ते वाढलं. या भानाबरोबर त्याचं ज्ञानही वाढावं हा या नव्या लेखमालिकेचा उद्देश आहे. सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने महत्वाच्या आजारांच्या, विकारांच्या बाबतीत जागतिक किंवा देशस्तरावर नेमकं काय नवीन घडत आहे याची तोंडओळख करून द्यायचा प्रयत्न या लेखांद्वारे केला जाईल.

सुरुवात सगळ्यात जुन्या टीबीच्या आजाराने करुया. सरकारी आकडेवारीनुसार २०२२ मध्ये भारतात एकूण २५.२ लाख रुग्णाची नोंद झाली. जागतिक आरोग्य संघटनेच्या २०२३ च्या अहवालानुसार २०२२ वर्षात जगभरात नोंद झालेल्या टीबीच्या रूग्णांमधील २७% रुग्ण हे भारतातील होते. यावरून देशापुढील टीबीच्या महाकाय संकटाचा आवाका लक्षात येऊ शकेल. या रोगावर मात करण्यासाठी सगळ्यात प्राचीन उपाय म्हणजे बीसीज लस. भारतातल्या ९०% पेक्षा अधिक नवजात बालकांना जन्मानंतर २४ तासाच्या आत ही लस टोचली जाते. पहिल्यांदा डोळे उघडल्यावर बाळ आपल्या आईआधी BCG ची सिरींज बघत असेल असे म्हणणेही अतिशयोक्तीचे ठरणार नाही. तर या लसीमुळे नेमके काय होते?

हेही वाचा… Health Special : स्क्रीन टाइम मॅनेजमेंट कसं करायचं?

BCG च्या लसीमुळे मुलांना टीबी होण्याची शक्यता कमी होते. या लसीचा प्रभाव साधारण १० ते १५ वर्ष टिकून राहतो. त्यानंतर तो हळूहळू कमी होऊ लागतो. सहज कुणाच्याही मनात येणारा प्रश्न- १५ वर्षानंतर BCG ची अजून एक लस टोचली तर एकूण ३० वर्षापर्यंत संरक्षण मिळू शकेल का? कमी मिळेल की याहून जास्त मिळेल? तुम्हा आम्हाला पडणारा हा प्रश्न भारत सरकारलाही अनेक वर्ष सतावत होता. भारतातील गरिबी हटवण्याचे प्रयत्न झाले, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका, हवेत शिंकू नकाचे नारे देऊन झाले, देशव्यापी स्वच्छता मोहिमा निघाल्या, टीबीविषयीच्या जागृतीसाठी अमिताभ बच्चन यांना पाचारण करून झाले, त्वरित निदानासाठी नवनवीन तंत्रज्ञान आणले, कमी मुदतीची औषधे आणली. तरीही टीबीची रुग्णसंख्या घटण्याचा दर दरवर्षी १.५ % ते २% पेक्षा कमी होत नाहीये हे सरकारच्या लक्षात आले. ही मंदगती आपल्याला परवडणारी नाही कारण पंतप्रधानांच्या घोषणेनुसार आपल्याला २०२५ पर्यंत टीबीची रुग्णसंख्या २०१५ च्या तुलनेने ८०% कमी करायची आहे.

आत्तापर्यंत जगात ज्या रोगांचे उच्चाटन शक्य झाले आहे त्याला लसीकरण कारणीभूत होते हे आपण जाणतोच. उदा. देवी, रिंडरपेस्ट. त्यामुळे टीबीच्या निर्मुलनासाठीही लस हवी. संपूर्णत: नवीन लस बाजारात यायला अजून काही वर्ष लागू शकतात आणि त्यामुळे पूर्वापार चालत आलेल्या, अत्यंत सुरक्षित, स्वस्त अशा BCG चा वापर प्रौढांमध्ये करायचा विचार भारत सरकार गेल्या काही वर्षांपासून करू लागले. ICMR सारख्या संस्थांबरोबर उपलब्ध पुराव्यांचा अभ्यास केला गेला. इतर देशांमध्ये BCG लस लहान मुलांव्यतिरिक्त कुणाला दिली जाते का हेही तपासले गेले. याचा प्रभाव मोजण्यासाठी अभ्यास करायचा तर त्याची व्याप्ती किती हवी, कुणाकुणाला देण्यात यावे यावर अनेक वर्ष सविस्तर चर्चा करण्यात आली. यासंबंधीचे काही महत्वाचे पुरावे आपल्याला उपलब्ध झाले. तामिळनाडूमध्ये चिंगलपुट येथे झालेल्या एका अभ्यासात साडेतीन लाख प्रौढांना BCG लस देण्यात आली. आणि पंधरा वर्ष त्यांचा पाठपुरावा केल्यावर लस दिलेल्यांमध्ये टीबीचे प्रमाण लस न घेतलेल्यांच्या तुलनेत ३६% ने कमी झाल्याचे लक्षात आले. सध्याची नवीन औषधे आणि लसीकरण यांच्या एकत्रित वापराने आपण टीबीची रुग्णसंख्या १७% ने कमी करू शकतो हेही एका modelling अभ्यासातून स्पष्ट झाले. १६ देशांमध्ये एकापेक्षा अधिक BCG डोस दिले जातात. शिवाय BCG ही सगळ्या लसींमधील सर्वात सुरक्षित लस मानली जाते. प्रत्येक आई आपल्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला अक्षरशः डोळे झाकून ही लस देते. या सर्व पुराव्यांमुळे प्रौढांमध्ये ही लस प्रभावी ठरते का हे पाहण्यासाठी अजून मोठ्या प्रमाणावर अभ्यास करण्याचे बळ भारताला मिळाले.

हेही वाचा… Health Special: पित्त म्हणजे नेमकं काय? त्याचे प्रकार किती?, जाणून घ्या

बऱ्याच चर्चेअंती अखेर २४ राज्य/ केंद्रशासित प्रदेशांमध्ये randomized controlled trial च्या स्वरूपात हा अभ्यास करण्याचे ठरले. आणि जानेवारी २०२४ मध्ये भारताच्या अतिरिक्त सचिव आणि National Health Mission च्या व्यवस्थापकीय संचालक आणि ICMR चे महासंचालक यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाच्या अंतर्गत अभ्यासाचे अनावरण झाले.

या अभ्यासाचे स्वरूप कसे असेल?

संमती दर्शवललेल्या २४ राज्य/ केंद्रशासित प्रदेशांमधील अर्ध्या जिल्यांमधील १८ वर्षावरील निवडक लोकांना लस दिली जाईल तर बाकीचे जिल्हे कंट्रोल म्हणून ठेवले जातील. हा अभ्यास तीन महिन्याच्या मर्यादित काळासाठी मोहिमेच्या स्वरूपात केला जाईल. सर्वेक्षणातून नोंद केलेल्या आणि संमती दर्शवलेल्या सर्व व्यक्तींना मोफत लस दिली जाईल. पुढील ३६ महिने या व्यक्तींचा पाठपुरावा केला जाईल आणि यातील टीबी झालेल्या लोकांचे प्रमाण आणि कंट्रोल जिल्ह्यामध्ये टीबी झालेल्या लोकांचे प्रमाण यांची तुलना केली जाईल. यावर BCG लस किती प्रभावी आहे हे लक्षात येईल. टीबी होण्याचा धोका १८ वर्षावरील सर्व लोकांना समान नसतो. शास्त्रीय आकडेवारीनुसार ज्या व्यक्तींना पूर्वी टीबी होऊन गेलेला आहे, जे टीबी रुग्णांच्या संपर्कात आले आहेत, ज्यांना मधुमेह आहे, जे सध्या किंवा पूर्वी धूम्रपान करत होते, जे कुपोषित आहेत (BMI १८ पेक्षा कमी) आणि ज्येष्ठ नागरिक (६० वर्षांपेक्षा अधिक) यांना टीबी होण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे या ६ श्रेणीत मोडणाऱ्या लोकांना लसीकरण केले जाईल.

हेही वाचा… Health Special : अ‍ॅलर्जी नेमकी का सुरू होते? ती कशी टाळता येईल?

या २४ राज्यांपैकी महाराष्ट्राचाही समावेश असून एकूण ४० जिल्हे (यात मुंबईच्या निवडक प्रभागांचाही समावेश आहे) आणि महानगरपालिकांमध्ये हा अभ्यास राबवला जाईल. अभ्यासाचे sample जितके जास्त तितका अभ्यासाअंती निघणारा निष्कर्ष शास्त्रीयदृष्ट्या भक्कम. त्यामुळे महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यात अधिकाधिक लोकांनी लस घ्यावी यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. या अभ्यासाविषयी लोकांपर्यंत उपलब्ध शास्त्रीय माहिती पोचावी, ही लस घेण्यास लोक आपणहून पुढे यावेत यासाठी राज्यसरकार शक्य त्या सर्व माध्यमांतून लोकजागृती करत आहे.

एक ख्यातनाम लसतज्ज्ञांनी म्हणून ठेवले आहे- निव्वळ ‘लस’ नाही तर ‘लसीकरण’ प्रभावी असते. त्यामुळे अधिकाधिक लोकांनी ही ‘लस’ घेऊन ‘लसीकरण’ अभ्यास यशस्वी केल्यास ही लस प्रौढांसाठी उपयुक्त ठरत आहे का हे ठरवण्यासाठी आवश्यक असणारे ठोस पुरावे सादर करणारा भारत हा जगातील पहिला देश ठरेल.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Health special why new study of bcg vaccination on tb started hldc asj
Show comments