Health Special भाद्रपद महिन्याच्या चतुर्थीला सुरू होणारा गणेशोत्सव हा पावसाळ्यातील महत्त्वाच्या सणांपैकी एक. गणेशोत्सवात  मोदकांचा प्रसाद गणपती बाप्पाला अर्पण केला जातो. अर्थात ते मोदक खोबर्‍यापासुन बनवलेले उकडीचे मोदक अपेक्षित आहेत, शरीराला रोगी बनवणारे माव्या-मिठाईचे नाहीत. हे खोबर्‍याचे मोदक इतके स्वादिष्ट लागतात की, त्यांची चव काय वर्णावी? खोबरे हाच या मोदकांचा महत्त्वाचा घटक असल्याने त्याचे आरोग्याच्या दृष्टिने काय महत्त्व आहे हे समजून घेऊ. आणि त्यातही पावसाळ्यात खोबरे किती उपयुक्त तेही!

पावसाळ्यात पोषक खोबरे

चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात आवश्यक असणारी गोडव्याची ऊर्जा व शक्ती देते. खोबरे पचायला जड आहे. त्याचसाठी खोबरे भाजून मगच त्याचे सारण तयार करतात, त्यात पुन्हा मोदक उकडवले जातात, जेणेकरुन खोबरे पचायला जड जाऊ नये. खोबरं शरीरामध्ये थंडावा वाढवते. खोबर्‍याला दिलेली गुळाची जोड मोदकांना रुचकर तर करतेच आणि गुळाचा उष्ण गुण खोबर्‍याचा थंडावा नियंत्रणात ठेवतो. खोबरं स्निग्ध आहे. मात्र मोदक करण्याच्या प्रक्रियेमध्ये आणि मुख्यत्वे भाजलेल्या खोबर्‍यामुळे मोदक कोरडे होऊ शकतात. या कोरडेपणावर मात करण्यासाठी मोदक खाताना त्यावर गरमगरम साजूक तुपाची धार सोडली जाते. एखादा पदार्थ तयार करताना आणि त्याचे सेवन करताना आपल्या परंपरेने किती सूक्ष्म विचार केलेला आहे, हे  इथे वाचकांच्या इथे लक्षात येईल.

हेही वाचा >>> अतितणावामुळे पुण्यात तरुणीचा मृत्यू? अतिताणाचा एखाद्या व्यक्तीवर कसा परिणाम होऊ शकतो?

वातशामक नारळ

नारळ वातशामक आहे. त्याची गुणवैशिष्ट्ये याप्रमाणे-

१) साहजिकच पावसाळ्यात प्रकुपित होणार्‍या वाताला व अस्थी- सांधे- स्नायु- नसा- कंडरा संबंधित विविध वातविकारांना नियंत्रणात ठेवण्यात खोबरे निश्चितच उपयुक्त सिद्ध होते. त्यातही जे अशक्त, कृश व वातप्रकृतीचे आहेत त्यांना आवश्य़क असणारी उर्जा (energy) ओल्या खोबर्‍यामधुन मुबलक म्हणजे ४४४ ग्रॅम इतकी मिळते. पावसाळ्यात विविध वातविकारांनी त्रस्त असणार्‍यांना हाडांना पोषण देणारा फॉस्फ़रस ओल्या खोबर्‍यामधुन २४० मिलिग्रॅम इतका मिळतो. ओल्या खोबर्‍यामधुन कॅल्शियम कमी मिळते, मात्र सुक्या खोबर्‍यामधुन भरपूर (४००मिग्रॅ) मिळते.

मांसवर्धक नारळ

२) नारळाला आयुर्वेदाने मांसप्रद (मांसवर्धक) सांगितले आहे आणि प्रत्यक्षातही स्नायुंचे बल वाढवण्यासाठी नारळ उपयोगी पडतो, कारण ओले खोबरे ४.५% प्रथिने पुरवते. वाताच्या रुक्षत्वाला (कोरडेपणाला) कमी करण्यास आवश्यक स्नेह (चरबी) खोबरे शरीराला तब्बल ४१.६ ग्रॅम इतक्या प्रमाणात देते. खोबरेल तेलाचा उपयोग करणार्‍यांना सहसा वातविकार त्रास देत नाहीत यामागील महत्त्वाचे कारण त्यामधील वातविरोधी स्नेहाचे मुबलक प्रमाण हे आहे. रक्तवर्धक लोह (iron) ओल्या खोबर्‍यामधून १.७ तर सुक्या खोबर्‍यामधुन ७.८ मिग्रॅ इतके मिळते.

हेही वाचा >>> झोप नाही तर गाढ झोप घेणं आहे गरजेचं; नाईट शिफ्टमध्ये काम करत असाल तर डॉक्टरांनी दिलेला सल्ला एकदा पाहा

बलवर्धक खोबरे

३) खोबरे शरीरावर मांस वाढवणारे, शुक्रवर्धक (वीर्य व कामेच्छावर्धक), बलवर्धक असल्याचे आयुर्वेदाने सांगितलेले आहे. एकंदर पाहता चवीला रुचकर-गोड असणारे खोबरे अतिशय पौष्टीक आहे. ओले खोबरे शरीराला ३६.३ ग्रॅम इतका ओलावा (moisture) पुरवते. हा गुण असला तरी पावसाळ्याच्या आरंभी अर्थात प्रावृट्‌ ऋतुमध्ये शरीरातला ओलावा आधीच वाढलेला असताना खोबर्‍याचे सेवन योग्य नाही. मुसळधार पाऊस पडत असताना,सभोवतालचे वातावरण ओलसर असताना ज्यांना सर्दी,कफ आदी विकार होतात त्यांनी त्या स्थितिमध्ये ओले खोबरे टाळावे. सुके खोबरे वापरायला हरकत नाही. कारण त्यामध्ये ओलाव्याचे प्रमाण केवळ ४.३ ग्रॅम असते. मात्र सुके खोबरे पचायला जड आहे हे विसरु नये. तसेही खोबरे ओले असो वा सुके पचायला जडच असते.

खोबरे कुणी टाळावे?

साहजिकच ज्यांचा अग्नी मंद आहे त्यांनी खोबरे टाळावे किंवा तारतम्याने खावे. याच कारणासाठी पावसाळ्यात उशिराने म्हणजे श्रावणात (नारळी पौर्णिमेला) आणि भाद्रपदामध्ये (गणेश चतुर्थीला) नारळ खाण्याचे मार्गदर्शन सण-संस्कृतीने केले आहे. खोबर्‍याचा एक दोष सुद्धा वाचकांना सांगितला पाहिजे. घशाला सूज असल्यामुळे जर तुम्हाला घसादुखी, बोलण्यास त्रास, कोरडा खोकला किंवा श्वसनास त्रास वगैरे तक्रारींचा त्रास असेल तर तो त्रास खोबरे खाल्ल्यामुळे वाढू शकतो. त्यातही जे मुळातच या आजारांचे रुग्ण आहेत, त्यांना खोबरे खाल्ल्यानंतर वरील त्रास सुरु झाल्याचा अनुभव येतो. सहसा हा त्रास सुक्या खोबर्‍यामुळे होतो. त्यामुळे खोबर्‍याची वडी, खोबर्‍याची बर्फ़ी, सुके खोबर्‍याचे सारण घातलेल्या करंज्या असे पदार्थ घशाचा, कोरड्या खोकल्याचा त्रास होणार्‍यांनी टाळावे, विशेषतः पावसाळ्यातल्या वातप्रकोपक काळामध्ये. खोबरे मलाला घट्ट करते हा सुद्धा खोबर्‍याचा एक दोष आहे. घशाला होणारी बाधा व मलाचा घट्टपणा या उभय दोषांवर मात करण्यासाठीच मोदक तुपासोबत खाल्ले जातात!