Heat Stroke, Heat Exhaustion and Heat Cramps दिल्लीसह अनेक राज्यांत उष्णतेच्या लाटेने कहर केला आहे. गावखेड्यांच्या तुलनेत शहरांमध्ये उष्णता दुप्पट वेगाने वाढतेय. अशा परिस्थितीत दुपारच्या वेळी लोकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. सततच्या वाढत्या तापमानामुळे आरोग्यालाही धोका निर्माण होत आहे. दिल्लीत उष्णतेच्या तीव्र लाटेमुळे अनेकांना विविध आजारांचा सामना करावा लागतोय, उष्माघाताने तर अनेकांचे बळीही घेतले आहेत. अशातच उन्हामुळे जाणवणाऱ्या अनेक आजारांविषयी चर्चा केली जात आहे. उन्हाळ्यात बहुतांश लोक उष्माघात, उष्णतेमुळे जाणवणारा थकवा व स्नायूंमध्ये पेटके येणे अशा अनेक समस्यांचा सामना करीत आहेत. पण या आजारांविषयी अनेकांच्या मनात विविध प्रश्न निर्माण होत आहेत. हे आजार जरी तीव्र स्वरूपाच्या उष्णतेमुळे होत असले प्रत्येक आजाराच्या लक्षणांमध्ये काही फरक आहे; जो जाणून घेणे फार महत्त्वाचे आहे. याचविषयी नोएडामधील शारदा हॉस्पिटलचे एमडी (इंटर्नल मेडिसिन) डॉ. श्रेय श्रीवास्तव यांनी सविस्तर माहिती दिली आहे. उष्माघात, पेटके व थकवा यांतील फरक त्यांनी सोप्या भाषेत स्पष्ट केला आहे. उष्माघात, पेटके व थकवा यात नेमका फरक काय? डॉ. श्रीवास्तव यांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा दीर्घकाळ तीव्र उष्णतेमुळे शरीराचे तापमान ४० डिग्री फॅरेनहाइटपेक्षा जास्त वाढते तेव्हा उष्णतेमुळे थकवा येतो. यावेळी स्नायूंमध्ये पेटके येणे, निर्जलीकरण, पोटासंबंधित समस्या आणि इलेक्ट्रोलाइट्स असंतुलन यांसारखी लक्षणे जाणवतात. असे प्रामुख्याने शरीरातील द्रवपदार्थ कमी झाल्यामुळे होते. परिणामी शरीराचे कार्य बिघडते. उष्णतेमुळे जाणवणाऱ्या थकव्याच्या तुलनेत उष्माघात अधिक गंभीर असतो; ज्यात त्वरित डॉक्टरी उपचार घेणे गरजेचे असते. त्यात रुग्णाच्या शरीराचे तापमान १४० डिग्री फॅरेनहाइटच्या वर वाढते; ज्यामुळे बेशुद्ध पडणे, चक्कर येणे, आळस येणे, निर्जलीकरण व लघवीला जळजळ होणे, अशी लक्षणे जाणवतात. अशा परिस्थितीत काही रुग्ण कोमातही जाऊ शकतात, असे डॉ. श्रीवास्तव यांनी सांगितले. उष्माघात अनेकदा जीवघेणा ठरतो. अशा स्थितीत आपले शरीर द्रवपदार्थाची कमी झालेली पातळी स्थिर करण्याचा प्रयत्न करीत असते; पण त्यामुळे हृदयाच्या गतीमध्ये चढ-उतार होत राहतो. अनेकदा उष्माघातामुळे रुग्णाची स्थिती फार नाजूक होते. डॉ. श्रीवास्तव यांनी पुढे स्पष्ट केले की, स्नायूंमध्ये पेटके येणे ही उष्णतेमुळे उदभवणारी एक जटिल समस्या आहे. यात शरीरातील स्नायूंमध्ये तीव्र पेटके येतात. थेट सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येत असलेले मजूर, शाळकरी मुले, खेळाडू व वृद्धांमध्ये अशा प्रकारचा त्रास मोठ्या प्रमाणात होतो. उपचार ३० पेक्षा जास्त बीएमआय असलेल्या लठ्ठ व्यक्ती, मधुमेही आणि ज्यांच्या शरीराचे तापमान आणि हृदयाचे ठोके अधिक वेगाने वाढतात अशा व्यक्ती, तसेच गर्भवती महिलांना उष्माघाताचा अधिक धोका असतो. त्यांना अनेकदा रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासू शकते. त्यासाठी त्यांनी नियमितपणे शरीरातील द्रव पदार्थांची पातळी भरून काढण्यासाठी IV द्रवपदार्थ घेतले पाहिजेत, असे डॉक्टरांनी स्पष्ट केले. उष्णतेमुळे जाणवणारा थकवा आणि पेटके यांनी ग्रस्त असलेल्या लोकांनी इलेक्ट्रोलाइट पदार्थांचे सेवन करावे. त्यात ते नारळाचे पाणी, ओरल रिहायड्रेशन सोल्युशन व केळी यांसारख्या पदार्थांचा समावेश करू शकतात. अशा आजारांमधून ठीक होण्यासाठी सहा ते आठ तास लागू शकतात. त्यामुळे विश्रांती आणि द्रवपदार्थाच्या सेवनाला प्राधान्य द्या, अशी शिफारस डॉ. श्रीवास्तव करतात. इतकेच नव्हे, तर उन्हाळ्यात सैल, हलक्या रंगाचे कपडे वापरा. तसेच. त्वचेवर ब्रॉड-स्पेक्ट्रम एसपीएफ सनस्क्रीन वापरा, दुपारी १२ ते ३ या वेळेत थेट उन्हात जाणे टाळा, नेहमी पाण्याची बाटली बरोबर ठेवा आणि हायड्रेटेड राहा, असा सल्लाही डॉक्टरांनी दिला आहे.