Intermittent Fasting: अधूनमधून उपवास करणे किंवा वेळेवर मर्यादित आहार घेणे विशेषतः १२ ते १४ तास अन्न न घेण्याचा कालावधी, सामान्य आरोग्य स्थिती असलेल्या लोकांमध्ये फायदेशीर परिणाम दर्शवितो. १४ तास उपवास केल्याने शरीराला अनेक फायदे होतात. अभ्यासातून असे दिसून आले आहे की, ठरावीक कालावधीत सातत्याने उपवास केल्याने शरीराचे वजन, रक्तदाब, चरबी, रक्तातील साखर व कोलेस्ट्रॉल कमी होते. परंतु, ही दिनचर्या पूर्वीपासून वैद्यकीय समस्या असलेल्यांनी किंवा डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय अजिबात अवलंबू नये.
उपवास केल्याने तुमच्या शरीरावर काय परिणाम होतो?
कमी खाण्याच्या वेळेमुळे कॅलरीजचे सेवन मर्यादित राहते. तुमचे शरीर ऊर्जेसाठी चरबीच्या साठ्यात जाते आणि केटोन्स नावाचे फॅटी अॅसिड रक्तप्रवाहात सोडले जाते. हे कार्बोहायड्रेट्सऐवजी शरीरासाठी पर्यायी इंधन स्रोत आहेत. कालांतराने तुमचे वजन कमी होऊ शकते आणि काही अभ्यासांतून असे दिसून आले आहे की, सहभागींनी ८ ते २६ आठवड्यांनंतर त्यांच्या सुरुवातीच्या शरीराच्या वजनाच्या किमान ५% वजन कमी केले.
या पद्धतीमुळे इन्सुलिन संवेदनशीलता सुधारते, रक्तातील साखरेचे नियंत्रण चांगले होते आणि जळजळ कमी होते. उपवास केल्याने ऑटोफॅजी नावाची पेशीय प्रक्रिया सुरू होते, जिथे खराब झालेले किंवा अकार्यक्षम घटक पुनर्वापर केले जातात, ज्यामुळे वयाशी संबंधित रोगांचा धोका कमी होतो आणि पेशीय नूतनीकरणाला चालना मिळते. उष्मांक प्रतिबंधामुळे वजन कमी होऊ शकते, विशेषतः जास्त वजन असलेल्या किंवा लठ्ठ व्यक्तींमध्ये, जर त्यांनी उपवास न ठेवता संतुलित आहार घेतला, तर ही पद्धत रोगप्रतिकार शक्ती वाढवते, कोलेस्ट्रॉल व रक्तदाब कमी करते आणि आतड्यांतील सूक्ष्म जंतू आणि संप्रेरकांचे संतुलन सुधारते.
सर्वोत्तम निकालांसाठी या नियमावलीचे अनुसरण करा
१) उपवासाच्या काळात पाण्याचे प्रमाण चांगले ठेवा.
२) तुमच्या शरीराचे ऐका आणि गरजेनुसार कालावधी किंवा वारंवारता समायोजित करा.
३) आहारात संतुलित आहार घ्या.
४) तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घ्या.
५) तळलेले पदार्थ, साखरेचे पदार्थ आणि जास्त प्रक्रिया केलेले पदार्थ टाळा. कारण- त्यामुळे अस्वस्थता, आळस व रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू शकते.