घरात खूप गर्दी जमली होती. माझे काका निवर्तले होते. जशी माणसे जमू लागली, तसे माझी काकू म्हणू लागली, “अगं, अचानक इतके सगळे पाहुणे आपल्या घरी कसे काय आले आहेत? तुझे काका आले का परत गावाहून?’ मी आश्चर्याने तिच्याकडे बघतच राहिले. काका आता ‘आपल्यात राहिले
नाहीत’ असे अनेक प्रकारे सांगून पहिले, पण तरी तिला काही ते पटेना. दोन दिवसांनी तिने काका वारले हे मान्य तर केले, पण सारखे म्हणू लागली, ‘ते माझ्याशी बोलतात. मला दिसतात.’
आपल्या जवळच्या माणसाचा मृत्यू स्वीकारताना मन वेगवेगळ्या स्थितीतून जाते. काही जणांना सत्य स्वीकारणे खूप जड जाते. मन ते पूर्णपणे नाकारते आणि मग काकूंना वाटले तसे वाटू लागते. हळूहळू खरी परिस्थिती लक्षात येते, आपली जवळची व्यक्ती खरोखरच मृत्यू पावली हे लक्षात येते. अनेक विचार मनात येतात, भावनांचा कल्लोळ उडतो. महेश कॉलेजमध्ये जाणारा विद्यार्थी. त्याच्या परीक्षेच्या दिवशी आईला बरे नाहीसे झाले आणि त्याच्या भावाने आईला हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केले. काही दिवसातच त्याच्या आईचे देहावसान झाले. त्याला खूप धक्का बसला. “मी स्वतः आईला हॉस्पिटलमध्ये नेले नाही, माझ्याकडून काहीतरी राहून गेले. आईची नीट काळजी घेतली गेली का? मी तिथे जास्त वेळ नव्हतो आणि मी गेलो, तर आईच गेली. मी जर गेलो नसतो, तर माझी वाट पाहत तरी ती थांबली असती आणि कदाचित असे काही घडलेच नसते”. जणू दरी आलेल्या मृत्यूशी त्याला सौदा करून आईला परत मिळवायचे होते.
आणखी वाचा: Health Special: वेदना आपल्या संरक्षणासाठी असते, म्हणजे काय?
सगळ्या जगाचा त्याला खूप राग आला. आलेले नातेवाईक उगाचच आणि खोटी खोटी सहानुभूती दाखवताहेत असे त्याला वाटू लागले. सगळ्यांपासून दूर जावे असेही वाटू लागले. खूप चिडचिडा झाला तो. धड काही खाईना. सतत एका कोपऱ्यात बसून राहू लागला. मन उदास असे, पटकन रडू येई. रिझल्ट लागला. चांगले मार्क मिळाले. भावाने त्याला समजावले. म्हणाला, “आईसाठी भरपूर शीक,आयुष्य मार्गी लाव”. महेशने अखेरीस आई नसल्याचे सत्य स्वीकारले. आयुष्याला शिस्त आणली, केवळ दुःख न करता, आईच्या चांगल्या आठवणींचा खजिना आपल्याकडे आहे असे त्याच्या लक्षात आले.
आपल्या जवळची व्यक्ती मरण पावली, की अर्थातच खूप दुःख होते. त्या दुःखाला वेगवेगळे पदर असतात. कधी मृत्यू जणू घडलाच नाही अशा प्रकारे नाकारला जातो, कधी मनात खूप अपराधी वाटते, कधी खूप राग मनात निर्माण होतो; पण बहुतेकवेळा या टप्प्यांमधून गेल्यावर मृत्यूचे वास्तव स्वीकारणे शक्य होते.
समाजातही ही दुःख सहन करण्याची, त्यातून बाहेर पडण्याची प्रक्रिया सुकर व्हावी अशा अनेक रीती, पद्धती पडलेल्या असतात. अंत्यविधीसाठी अनेक जण जमतात. नातेवाईक, शेजारी पाजारी, मित्र परिवार हे अंत्यसंस्काराच्या वेळेस आवर्जून उपस्थित राहतात. दुःखात बुडालेल्या कुटुंबाला मदतही होते.
आणखी वाचा: Health Special: कुठेतरी दूर पळून जावेसे वाटते आहे? मला काय झालंय?
आणि एकटेपणा वाटत नाही. सगळे जण आपल्या सोबत आहेत हे जाणवते. दुसऱ्या बाजूने आलेल्या मंडळींनाही आपले दुःख दर्शवण्याची संधी मिळते. एका अर्थी एका नात्याला पूर्णविराम देण्याची ती वेळ असते आणि बाकीचे नातेसंबंध कायम ठेवण्याची सुद्धा. सुतकाचा एक विशिष्ट कालावधी, काही धार्मिक विधी, कधी कधी प्रार्थना सभा, काही वेळेस श्रद्धांजली सभा अशा सगळ्या गोष्टींचा दुःख हलके होण्यासठी उपयोग होतो. अनेक जण घरी भेटायला येतात. बऱ्याच जणांना ते त्रासाचे वाटते.
परंतु, भेटायला आलेल्यांशी मरण पावलेल्या व्यक्तीबद्दल बोलून, त्याच्या/तिच्या अखेरच्या प्रवासाविषयी सांगून मनात साचलेल्या भावनांचा निचरा व्हायला मदत होते. आठवणी एकमेकांना सांगून आपोआप ओठांवर हसू येते. ‘आता आपला दिनक्रम सुरू करा, आयुष्य पुढे पुढे जातच राहते’ असे एखादी ज्येष्ठ व्यक्ती किंवा आपले कोणी जीवाभावाचे सांगते आणि कुटुंबातले सगळे जण आपापल्या कामाला सुरुवात करतात. दुःखावर काळ हे सगळ्यात चांगले उत्तर आहे, असे म्हणतात, ते खरेच आहे. आपल्या आईला आवडायचे म्हणून रश्मी रोज घरात गजरा आणायची. फुलांच्या सुगंधाने आईची आठवणही सुगंधित व्हायची. दर वर्षी दिवाळीत वडील उत्साहाने साफसफाई करत, ते आठवून प्रकाशही घर लख्ख करायला लागला. चांगल्या प्रसंगी, आपल्या अडचणीच्या प्रसंगी आपल्या प्रिय व्यक्तीची आठवण येतेच येते.
मात्र कधी कधी आपल्या निकटतम व्यक्तीचा मृत्यू सहन होत नाही. आयुष्याची घडी परत नीट बसत नाही. आपला पती/ पत्नी, आपले अपत्य असे मृत्यू स्वीकारणे खूप कठीण जाते. डिप्रेशन येऊ शकते. एक वर्षापेक्षा अधिक काळपर्यंत दुःख कायम राहिले तर मात्र मनोविकारतज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ यांची
मदत घ्यावी लागते. मृत्यू स्वीकारणे सोपे नाहीच, पण आपल्या लाडक्या माणसाच्या सुंदर आठवणी, त्या व्यक्तीचे चांगले गुणधर्म मनात साठवणे, आठवणीने मनात आनंद वाटणे, आपले आयुष्य मार्गी लावणे यातून दुःख स्वीकारणे शक्य होते.