डॉ. अश्विन सावंत
Health Special : मागील काही वर्षांपासून ग्रीष्मातल्या उन्हाळ्यात उष्णता कहर करु लागली आहे. पुण्या- मुंबईमध्ये तापमानाचा पारा ३५- ३६ अंश सेल्सियसपर्यंत पोहोचला की, अंगाची काहिली होते, मग जिथे तापमान ४० अंशाच्या वर जात असेल तिथे लोकांची काय अवस्था होत असेल. दुर्दैवाने महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तापमान ४० अंश सेल्सियसच्या आसपास जावू लागले आहे, अगदी मुंबईलगतच्या ठाण्यामध्येसुद्धा. “पृथ्वी केवळ आपल्याच मालकीची आहे, या स्वार्थी व चंगळवादी वृत्तीने निसर्गाचे लचके तोडणार्‍या मानवाच्या कृतींचा हा परिणाम आहे” हे तर खरेच. साहजिकच त्याचे परिणाम सुद्धा मानवाला म्हणजेच आपल्याला भोगावे लागतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

निसर्गचक्रात झालेल्या बिघाडामुळे अनुभवास येणार्‍या अतिरेकी उष्म्याचा शरीरावर होणारा एक महत्त्वाचा परिणाम म्हणजे उष्माघात आणि उष्माघात होण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे शरीरामधील द्रवहानी, अर्थात पाणी कमी होणे. शरीरातले पाणी कमी झाल्यानेच उन्हाळ्यात उष्माघाताचा धोका बळावतो. कारण आपल्या शरीराचा ६६% भाग हा पाण्याचा आहे व शरीरामधून घटणार्‍या पाण्याची पूर्ती आपल्याला सातत्याने करावी लागते.

आणखी वाचा-Health Special: रजोनिवृत्तीमुळे होणारे त्रास कोणते? काळजी कशी घ्याल?

पाण्याची कमतरता

पाण्याच्या कमतरतेची जाणीव तहानेने होते, हे तर अनुभवजन्य सत्य आहे. त्यामुळे तुम्हाला ज्या प्रमाणात पाण्याची गरज असेल तितक्या मात्रेमध्ये पाण्याचे प्राशन वाढवायला हवे. तहान ही एक नैसर्गिक संवेदना आहे. मात्र ही तहानेची जाणीव काही जणांमध्ये व्यवस्थित काम करत नाही. विशेषकरुन ज्यांना तहान लागल्याचे बोलून सांगता येत नाही, त्या लहान मुलांना, ज्यांच्या भूक -तहान या नैसर्गिक संवेदना वयानुसार क्षीण होत जातात त्या वृद्धांमध्ये; इतकंच नव्हे तर दीर्घकाळापासून तहानेकडे दुर्लक्ष करण्याची आणि पाणी न पिण्याची सवय लागलेल्यांमध्ये सुद्धा. त्यामुळे यांच्याकडून पाणी कमी प्यायले जाते आणि शरीरातले पाणी घटण्याचा धोका बळावतो. याशिवाय कोणत्याही कारणाने उघड्यावर उन्हातान्हांत काम करणारे, खेळणारे आणि बंदिस्त जागेत उष्णतेजवळ काम करणारे यांनाही. या सर्वांच्या शरीरामध्ये उष्माघातामुळे शरीरामधील पाणी घटण्याचा धोका बळावतो.

शरीरातले पाणी घटत आहे, हे कसे ओळखावे?

सर्वसाधारण वातावरणामध्ये शरीरामधून पाऊण लीटर पाणी घामावाटे बाहेर फेकले जाते, मात्र आपण जो उन्हाळा अनुभवत आहोत, त्यामध्ये घामाचे प्रमाण कैकपटींनी वाढते व शरीरामधून पाण्याचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये घटते. भरपूर घाम हा एकीकडे शरीराला थंडावा देतो, तर दुसरीकडे शरीरामधील पाणी व क्षार यांचे प्रमाण घटवतो. अतिघाम व त्यामुळे येणारा थकवा व लागणारी तहान ही उष्माघाताची लक्षणे आहेत, हे ओळखून त्वरित नारळ पाणी, लिंबू सरबत, फळांचे रस यांचे प्राशन करावे. मात्र हल्ली अनेक जण दिवसभर एसीच्या थंड वातावरणात असतात, ज्यांना घाम असा येतच नाही. त्यांनी आपल्या शरीराला पाणी कमी पडत आहे ,हे कसे ओळखावे?

आणखी वाचा-उन्हाळ्यात घरच्या घरी तयार केलेले दही का खावे? जाणून घ्या, घट्ट दही घरी कसे बनवावे?

एसीत बसणाऱ्यांनी शरीरातील पाण्याची कमतरता कशी ओळखावी?

शरीरामध्ये पाणी कमी होत असल्याची परिक्षा म्हणजे मूत्राचा बदलणारा वर्ण! लघवीचा रंग पिवळसर, पिवळा,गडद पिवळा किंवा तपकिरी (ब्राऊनिश) होऊ लागला की, त्या रंगाच्या गडदपणानुसार शरीरामध्ये अधिकाधिक पाणी कमी होत चालले आहे, हे समजावे. मूत्राचा रंग जितका गडद (डार्क) तितके शरीराला पाणी कमी पडत आहे हे निश्चित, हे ओळखून पाणी, नारळपाणी व इतर द्रवपदार्थांचे प्रमाण वाढवावे (चहा, कॉफी, मद्य मात्र कटाक्षाने वर्ज्य) (बी- कॉप्लेक्स घेत असताना सुद्धा मूत्राचा रंग पिवळा येतो आणि काविळीमध्ये सुद्धा मूत्रवर्ण पिवळा- तपकिरी होतो, मात्र सोबत भूक न लागणे, मळमळ, अन्नाप्रति द्वेष, ताप वगैरे अन्य लक्षणेही असतात, हे विसरु नये.)

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to recognize that body water is decreasing in summer and how do you care hldc mrj
Show comments