डॉ. जाह्नवी केदारे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सकाळी चहाच्या पहिल्या घोटाबरोबर आपल्याला ताजे वर्तमानपत्र लागते. सगळे मथळे वाचून मग आपण रोजच्या कामाला लागतो. त्यात जर एखाद्या विमान अपघाताची, दहशतवादी हल्ल्याची, सामूहिक बलात्काराची किंवा आत्महत्येची बातमी मुखपृष्ठावर असेल तर चर्चेला विषय मिळतो. तरुण तरुणी रस्त्यावर पहिले पाऊल टाकताच कानात इअर फोन घालतात आणि गाणी सुरू होतात. एफएमवरची खुमासदार वर्णने, जाहिराती आणि गाणी दिवसभर सुरू असतात. ऑफिसमधून घरी आल्यावर, शाळा कॉलेजमधून घरी आल्याआल्या आपली पहिली कृती टीव्हीचा रिमोट हातात घेण्याची असते. दर काही दिवसांनी पॉपकोर्न आणि कोल्ड ड्रिंकचा आस्वाद घेत चित्रपट बघण्यातली मजा काही औरच असते.

ही सगळी माध्यमे आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाची झालेली आहेत. पण या सगळ्यांवर कडी करणारे मध्यम म्हणजे अर्थातच ‘सोशल मीडिया’! व्हॉटसअप, ट्वीटर, फेसबुक, instagram या सगळ्यांनी तर आपल्या मनावर गारुड केले आहे.

माध्यमांनी जग जवळ आणले यात शंका नाही. केवळ देशविदेशाच्या बातम्या आपल्यापर्यंत पोहोचवण्याचेच काम माध्यमे करतात असे नाही, तर अनेक व्यक्तींशी आपली ओळख समाज माध्यमांद्वारे (social media) होऊ शकते. जगभरातले आपले नातेवाईक आपल्या सतत संपर्कात असतात. परदेशात शिकायला गेलेल्या आपल्या मुलाला किंवा मुलीला स्काइप, फेसटाईमच्या सहाय्याने आपण प्रत्यक्ष पाहू शकतो आणि आपोआपच दुरावा नाहीसा होतो. सर्जनशील व्यक्तीसाठी तर आपला ब्लॉग असणे, त्यावर आपल्या कविता, लेख, कथा मांडणे यातून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी सहजपणे प्राप्त होते. स्वभावाने संकोची, लाजाळू असलेला मुलगा किंवा मुलगी प्रत्यक्ष भेटीत कदाचित स्वतःचे विचार व्यक्त करणार नाही, परंतु फेसबुकवरच्या गप्पांमध्ये मात्र मोकळेपणाने व्यक्त होईल. इतरांशी नातेसंबंध जोडण्यासाठी त्याला अशा माध्यमाचा नक्कीच उपयोग होतो.

आणखी वाचा-Health Special: आध्यात्मिकतेने खरंच किती मानसिक बळ मिळते?

निरीक्षणातून माणूस शिकतो हे तर आपल्याला ठाऊकच आहे. दृकश्राव्य माध्यमांचा वापर करून मुलांना विज्ञानातील संकल्पना, इतिहासातील प्रसंग किंवा भूगोल शिकवला तर तो मनावर ठसतो. सलग ४५ मिनिटे भाषण ऐकण्याऐवजी स्लाईड्स असतील तर लक्ष केंद्रित होते. इतकी सतत आणि सर्वत्र आपल्याला माध्यमांची सवय झाली आहे. माध्यमांचे फायदे अनेक आहेत पण त्याबरोबरच त्यांचा आपल्या मानसिकतेवर विपरीत परिणाम होतानाही दिसून येतो आहे.

एकदा एका ५-६ वर्षांच्या मुलाला घेऊन त्याचे आई- वडील ओपीडीत आले. ‘हल्ली हा रात्री नीट झोपत नाही. अनेकदा दचकून उठतो, रडत रडत उठतो.’ आईने काळजीने सांगितले. त्याला भीती वाटत होती हे दिसतच होते, पण कारण काय ते लक्षात येत नव्हते. त्याच्याशी सहज त्याच्या दिनक्रमाविषयी गप्पा मारल्या. गेले दोन महिने तो ‘आहट’ ही भयावह (horror) मालिका पाहायला लागला होता. बघताना त्याला खूप मजा वाटायची पण खरे तर मनात एक भीती बसली होती. त्यामुळेच झोपेच्या तक्रारी सुरू झाल्या. रात्री झोप पूर्ण झाली नाही की शाळेत झोप यायची, लक्ष लागायचे नाही. त्याला ती मालिका ना पाहण्याविषयी समजावून सांगावे लागले. काही दिवसांनी त्याचा त्रास बंद झाला.

लहान मुले आणि किशोरावस्थेतील मुले यांच्यावर माध्यमांचे असे अनेक दुष्परिणाम दिसून येऊ लागले आहेत. टीव्हीवरील कार्टूनमधूनसुद्धा अनेकदा हिंसा, आक्रमकता दाखवली जाते. व्हीडिओ गेम्स तर मुलांना जास्तीत जास्त अपघात घडवा, जास्तीत जास्त शत्रूंना मारा असे आव्हानच देतात. यातून मुलांमधील आक्रमकता वाढते आहे. सहजपणे अपशब्द वापरणे, हमरीतुमरीवर येणे यात कही गैर आहे असे वाटेनासे होते. जीवनमूल्ये त्यातून ठरत जातात.

आणखी वाचा-Health Special : इयरएन्डला डाएट सोडताय? मग हे वाचाच

विशेषतः चित्रपटांमध्ये हिंसेबरोबरच लैंगिक अत्याचारही सहजपणे दाखवले जातात. त्यातून आपोआपच आपली ‘नजर मरते’. हिंसा आणि बलात्कारासारख्या घटना जणू ‘नॉर्मल’ आहेत आणि म्हणून समाजमान्य आहेत असे वाटू लागले. आपल्या गर्लफ्रेंडवर जबरदस्ती करताना ‘त्यात काय विशेष’ असे वाटण्याची शक्यता जास्त असते. मग स्त्रीविषयी आदर, समान वागणूक या गोष्टी तर दूरच. मालिकांमधील ‘पती पत्नी और वोह’ अशी नाती इतक्या मोठ्या प्रमाणात पाहून तीच मूल्ये आता समाजमान्य आहेत अशी शिकवण मिळते. मनातल्या निराशेला, अपयशी असल्याच्या भावनेला हिंसेद्वारे वाट करून दिली जाते.

एखाद्या अपघातानानंतर किंवा आपत्तीनंतर त्याची सतत दृश्ये बातम्यांमधून पाहून अनेकांना मनात अनामिक भीती निर्माण होते. आपल्याही जीवनात अनिश्चितता आहे असे सारखे वाटू लागते. अतिचिंतेचे विकार जडतात आणि मानसोपचाराची गरज भासते.

एखाद्या लोकप्रिय सिनेमात आपला आवडता हिरो किंवा हिरोईन येताजाता मद्याचे पेले हातात घेताहेत असे पाहताना असे वाटते की जगातले पाणी संपून केवळ दारूच उरली आहे की काय! उपचारार्थ सुरुवातीला दारू, तंबाखू यांच्याविषयीची सूचना दाखवून चित्रपटभर दारू पिताना हिरो दाखवला तर मनावर प्रभाव जास्त कसला पडणार? मुलामुलींना अर्थातच सिगरेट, दारू यांचे आकर्षण वाटते. वाढत्या व्यसनाधीनतेचे एक महत्त्वाचे कारण माध्यमांचा प्रभाव हे आहे. मनातील उदासीनता, नैराश्य संपवण्याचा मार्ग म्हणून या साधनांकडे पाहिले जाते.

आत्महत्येच्या बातम्या साधारणतः पहिल्या पानावर असतात. त्यात घटनेचे सविस्तर वर्णन लिहिलेले असते. कधी कधी आत्महत्येसाठी वापरलेल्या साधनाचेही वर्णन येते. निराश मनःस्थितीतल्या एखाद्याला अशा बातमीनेच आत्महत्या यशस्वीपणे करता येते असे वाटू शकते. अनेकदा सिनेमातल्या नायकनायिकेप्रमाणे आत्महत्या करणारी प्रेमी युगुले असतात हे माहीतच आहे.

आणखी वाचा-Health Special: अंगदुखीसाठी काय करावं?

माध्यमांच्या कोणत्याही प्रतिनिधीशी बोलले तर अर्थातच ते म्हणतात,’जबाबदारीने पाहणाऱ्याने निवड करावी.’ खरेच आहे. विशेषतः आपल्या मुलांनी किती हिंसा पाहावी, खेळण्यात वापरावी, किती उद्दीपित करणारी दृश्ये त्यांनी कुठल्या वयात पाहावीत हे पालकांनीच ठरवले पाहिजे. तेच असेल सुजाण पालकत्व. नाहीतर तीन वर्षाची मुलगी ‘वाजले की बारा’ किंवा ‘चिकनी चमेली’ वर नाच करते आणि सगळे कौतुकाने टाळ्या वाजवतात!

ज्या माध्यमांनी करमणूक होते त्याच माध्यमांनी ज्ञानही मिळते. त्यासाठी त्यांचा वापर करणे आपल्याच हातात असते. चांगले चित्रपट, चांगले कार्यक्रम, चांगले संगीत याची आपली मुलांची ओळख आपणच करून द्यायला हवी. परंतु माध्यमांनीही आपली जबाबदारी ओळखणे आवश्यक आहे. बातम्या सनसनाटी ना करता आवश्यक ती खरी माहिती पोहोचवणे हे त्यांची जबाबदारी आहे. आत्महत्येच्या बातम्या देताना त्या पहिल्या पानावर ना छापणे, अनावश्यक तपशील न देणे अशा बरोबरच आत्महत्येला प्रतिबंध करण्याचे उपाय सुचवणे असेही केले पाहिजे. किंबहुना जागतिक आरोग्य संघटनेने याविषयी माध्यमांना मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.

माध्यमे प्रभावी आहेत. माहिती आणि ज्ञानाचे भांडार आहेत. त्यांचा आपल्या सर्वांच्या मनावर परिणाम होतो. त्यामुळे आपण जबाबदारीने त्यांचा वापर करून आपले मानःस्वास्थ्य टिकवून ठेवूया.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Human mind and importance of social media in life hldc mrj
Show comments