देशभरातील ३० ते ५० वर्ष वयोगटातील अनेक लोक रक्तदाबाच्या (बीपी) त्रासाने त्रस्त आहेत. अशातच आता ३० वर्षीय रोहित सिंग नावाच्या तरुणामध्ये अलीकडेच असे आढळून आले आहे की, उच्च रक्तदाबाची समस्या असूनही त्याला याबाबतची माहिती नव्हती. तसेच जवळपास १५ रुग्णांमध्ये उच्च रक्तदाबाच्या जागरुकतेचा अभाव आढळून आला, जो अनियंत्रित राहिल्यामुळे त्यांना हृदयविकार, स्ट्रोक किंवा किडनी बिघडण्यासारख्या आजारांचा सामना करावा लागला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तर उच्च रक्तदाबाच्या WHO (जागतिक आरोग्य संघटना) अहवालात म्हटले आहे की, देशाच्या लोकसंख्येपैकी ३० टक्के लोकं सध्या या स्थितीत जगत आहेत. शिवाय ज्यांची तपासणी केली नाही अशा लोकांची संख्याही मोठी असू शकते आणि त्यांना भविष्यातील प्रतिकूल आरोग्या संबंधित धोका उद्भवू शकतो. तसेच ३७ टक्के भारतीयांमध्ये उच्च रक्तदाबाच्या समस्येचे निदान होते आणि त्यातील केवळ ३० टक्के लोकं उपचार घेतात, तर १५ टक्के लोकं त्यावर नियंत्रण ठेवण्यात यशस्वी होतात. परंतु, रेडलाइन आकडेवारीनुसार हृदयविकाराशी संबंधित सर्व मृत्यूंपैकी ५२ टक्के मृत्यू उच्च रक्तदाबामुळे होतात.

रोहित नावाचा दक्षिण दिल्लीतील तरुण ज्याला खाण्याची आवड असून त्याला श्वास घेण्यास त्रास सुरू झाला, तसेच तो सतत चिंताग्रस्त व्हायचा आणि ज्यामुळे त्याला रात्री झोपही येत नव्हती, म्हणून त्याने तपासणी केली. डॉक्टरांनी त्याचा रक्तदाब तपासला तेव्हा तो १५९/९० mmHg होता. तपासणीचा अहवाल वाचल्यानंतर रोहित आश्चर्यचकित झाला. तो म्हणाला, “मी धूम्रपान करत नाही, मद्यपान करत नाही किंवा कामाचा ताणही घेत नाही. पण डॉक्टरांनी मला सांगितले की, माझी जीवनशैली आणि आहारात बदल करणे आवश्यक आहे; कारण माझे जीवन गतिहीन झाले आहे. तसेच त्यानंतरच ते औषध लिहून देतील.” दरम्यान, रोहितने मिठाचे सेवन कमी केले, लोणचे, स्नॅक्स असे आवडणारे पदार्थ खाणेही त्याने बंद केलं आणि त्याने आहारात पोटॅशियम युक्त भाज्यांचा समावेश केला. तसेच ध्यान, व्यायाम आणि दररोज तीन किमी चालणे सुरू केले. या उपायांमुळे त्याने रक्तदाब नियंत्रित केला असला तरीही तो अधूनमधून वाढतो. शरीरातील औषधाची पातळी जास्त आहे की कमी हे तपासून कमी – जास्त होणारी शरीरातील औषधांची पातळी समतोल करण्याची गरज आहे. यासाठी रोहितला दीर्घकाळ औषधोपचार आणि चाचण्यांमधून देखरेख करावी लागणार आहे.

हेही वाचा- मधुमेहाचा तुमच्या किडनीवर परिणाम होत आहे की नाही, हे कसं ओळखाल? कोणते पदार्थ खाणे टाळावेत? डाॅक्टर सांगतात…

एम्समधील कार्डिओलॉजीचे प्रोफेसर डॉ. अंबुज रॉय, जे हायपरटेन्शन क्लिनिक चालवतात. ते म्हणाले, रोहितसारखे अनेक तरुण रुग्ण आहेत, ज्यांना आपणाला उच्च रक्तदाब आहे हेच माहीत नसते आणि नंतर त्यांना अनेक आरोग्याशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे २५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सर्व भारतीयांनी रक्तदाबाची सार्वत्रिक तपासणी करणे अनिवार्य आहे. कारण हृदयविकाराचा धोका आहे की नाही समजून घेण्याचा किंवा कमी करण्याचा हाच एकमेव मार्ग आहे. तसेच स्क्रीनिंगदेखील महत्वाचे आहे, कारण उच्च रक्तदाब हा लक्षणे नसलेली एक भयानक समस्या आहे. शिवाय देशातील लोकसंख्या किती असुरक्षित आहे हे डब्ल्यूएचओच्या अहवालातूनही दिसून आले आहे. त्यानुसार चार प्रौढांपैकी एकाला उच्च रक्तदाबाचा त्रास आहे, असंही डॉक्टर रॉय यांनी सांगितलं.

AIIMS ने उच्च रक्तदाब क्लिनिकची स्थापना केली आहे. ज्यामध्ये उच्च रक्तदाबाची समस्या असलेल्या लोकांची तपासणी आणि त्यांच्यावर उपचार केले जातात. कार्डिओलॉजी ओपीडीमध्ये बहुतेक रुग्णांची उच्च रक्तदाबासाठी तपासणी केली जाते. तुम्ही स्क्रीनिंगशिवाय रक्तदाब मोजू शकत नाही, कारण आमच्या ९५ टक्के हायपरटेन्सिव्ह रुग्णांना कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. बहुतेक लोकांना हृदयविकाराचा झटका किंवा अर्धांगवायू आल्यावरच त्यांना उच्च रक्तदाब असल्याची जाणीव होते. तर रक्तदाबाची उच्च पातळी म्हणजे हृदय तणावाखाली आहे आणि अनियंत्रित पातळी म्हणजे ते हृदय हळूहळू खराब होणे. तेव्हा तुम्हाला हृदयविकाराचा झटका, रक्तस्त्राव, मूत्रपिंड निकामी होणे आणि अंधत्व यांसारख्या अनेक समस्या उद्भवू शकतात, असंही डॉ. रॉय यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा- योगासनामुळे मिळतो संधीवातापासून आराम; जाणून घ्या तज्ज्ञांनी सांगितलेल्या योगासनाच्या खास पद्धती

धोकादायक रक्तदाब पातळी कोणती आहे ज्याबद्दल लोकांना जागरुक असले पाहिजे?

जर एखाद्याने १६०/१०० mmHg रीडिंग नोंदवले असेल तर त्यांना लगेच उपचार सुरू केले पाहिजेत. १४०-१६०/९०-१०० mmHg रक्तदाब फरक असलेल्या व्यक्तींवर आम्ही उपचार सुरू करण्यापूर्वी उच्च रक्तदाबाची पुष्टी करण्यासाठी एक टेस्ट घेतो. काही रुग्णांची रक्तदाब पातळी तेव्हा वाढते, जेव्हा ते हॉस्पिटल किंवा डॉक्टरांना भेट देतात. ही स्थिती व्हाईट कोट सिंड्रोम म्हणून ओळखली जाते. १८०/११० mmHg रीडिंग, डोकेदुखी, चक्कर येणे, अंधूक दिसणे आणि धाप लागणे अशी लक्षणं दिसताच सावधगिरी बाळगणे गरजेचं आहे. तसेच अशा परिस्थितीत रुग्णांना दाखल करावे लागते आणि त्यांची रक्तदाबाची पातळी कमी करण्यासाठी औषधे द्यावी लागतात, असंही डॉक्टर रॉय सांगतात.

असंसर्गजन्य रोग तपासणी योजनेअंतर्गत घरोघरी जाऊन आशा वर्कर मार्फत रक्तदाब तपासणी करणे अवघड नसल्याचे डॉक्टर रॉय म्हणाले. तसेच भारताच्या उच्च रक्तदाब नियंत्रण पुढाकार (IHCI) उपक्रमांतर्गत अशाप्रकारे लाखो लोकांच्या रक्तदाबाची तपासणी करण्यात आली आहे. संयुक्त राष्ट्रानेही या उपक्रमाचे कौतुक केले असल्याचे रॉय यांनी सांगितले.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hypertension one in four people suffer from high blood pressure how does the risk increase without symptoms cardiologist says jap
Show comments