What Happens If You Don’t Eat Rice For 30 Days: तांदूळ हा जगभरातील अनेक देशांमध्ये आहाराचा एक प्रमुख भाग आहे. मुख्यतः आशियाई घरांमध्ये तर लोक जेवणात किमान एकदा भाताचा समावेश आवर्जून करतात. भात शरीराला आवश्यक कार्ब्स पुरवण्याचे काम करतो हे जरी खरे असले तरी निरोगी राहण्यासाठी पूर्णपणे भातावर अवलंबून राहणे योग्य ठरणार नाही. भातात, स्टार्चचे प्रमाण देखील जास्त असते त्यामुळे अन्य काही पोषक तत्वांचा अभाव असू शकतो. त्याचप्रमाणे पांढर्‍या तांदळाचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते आणि वजन वाढण्याचा सुद्धा धोका असतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आता हे वाचल्यावर, तुम्ही तुमच्या जेवणातून भात पूर्णपणे वगळला पाहिजे का? या प्रश्नाचे उत्तर पाहण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊया. समजा तुम्ही महिनाभर भात खाल्लाच नाही तर.. यामुळे तुमच्या शरीरावर नेमका काय परिणाम होईल हे समजून घेण्यासाठी आता तज्ज्ञांचा सल्ला घेऊया…

श्री बालाजी ऍक्शन मेडिकल इन्स्टिट्यूटच्या मुख्य पोषणतज्ञ प्रिया भरमा यांनी सांगितले की, “जेव्हा तुम्ही एका महिन्यासाठी भात सोडून देता, तेव्हा तुमच्या शरीरात कॅलरी कमी झाल्यामुळे वजन कमी होऊ शकते. तांदळातील उच्च-कार्बोहायड्रेट शरीरात जाण्याचे प्रमाण कमी झाल्याने रक्तातील साखरेची पातळी स्थिर होऊ शकते.”

वरिष्ठ आहारतज्ञ, वोक्हार्ट हॉस्पिटल्स, मीरा रोड रिया देसाई यांनी सुद्धा अनोमोदन देत सांगितले की, “एका महिन्यासाठी तांदूळ पूर्णपणे सोडून दिल्यास काही प्रमाणात वजन कमी होऊ शकते परंतु तांदळाच्या ऐवजी दुस-या तृणधान्याचा समावेश आहारात करणे अत्यंत आवश्यक आहे. रक्तातील ग्लुकोजची पातळी अधिक असल्यास तुम्हाला भात खाणे सोडून देण्याची मोठी मदत होऊ शकते.”

मात्र आता आपण हे लक्षात घेणे आवश्यक आहे की जेव्हा तुम्ही आहारातून तांदूळ काढून टाकता केवळ त्याच कालावधीसाठी रक्तातील साखरेची पातळी कमी होऊ शकते. “एखाद्या व्यक्तीने भात पुन्हा खायला सुरुवात केली की, ग्लुकोजच्या पातळीत पुन्हा चढ-उतार होऊ लागतात,”

दुसरीकडे भात न खाल्ल्याने होणाऱ्या नुकसानाविषयी तज्ज्ञ सांगतात की,”तांदळाच्या अभावाने फायबरचे प्रमाण कमी झाल्यामुळे पचनक्रियेवरही परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे आतड्याच्या हालचालींमध्ये बदल होण्याची शक्यता असते. उर्जा उत्पादनासाठी कार्ब्स अत्यंत आवश्यक आहेत आणि ते पूर्णपणे काढून टाकणे हे शरीराला केवळ कमकुवत बनवते. कार्ब्सच्या अभावी शरीर उर्जा निर्माण करण्यासाठी स्नायूंमधील प्रथिने वापरण्यास सुरवात करते. यामुळे शरीराच्या अन्य गरजांसाठी भरपूर जीवनसत्त्वे आणि खनिजांची कमतरता देखील जाणवते. त्यामुळे अनेकदा भात खाणे बंद केल्याने कमी झालेले वजन हे चरबी नसून स्नायू कमकुवत होण्याचा परिणाम असू शकतात.”

रिया देसाई यांनी पुढे सांगितले की, “तांदूळ हे कार्ब्स, बी जीवनसत्त्वे आणि खनिजे यांचा स्रोत असल्याने पौष्टिक ठरू शकतात. एक लहान वाटी भात योग्य पद्धतीने खाल्ल्याने शरीराला कोणतीही हानी होत नाही, आहारातून तांदूळ पूर्णपणे काढून टाकण्याचा निर्णय घेणाऱ्या किंवा भात खाणे हेल्थ साठी पूर्ण चुकीचे आहे असे मानणाऱ्या व्यक्तींनी मुळात भात कसा खाणे योग्य आहे हे समजून घेणे आवश्यक आहे.

भात खाताना लक्षात ठेवण्याच्या काही टिप्स:

  1. पोर्शन कंट्रोल: मर्यादित प्रमाणात खा आणि एका वेळी एक धान्य खाणे कधीही उत्तम.
  2. कार्ब्ससह फायबर व प्रथिने जोडा: भाज्या, बिया आणि सुक्यामेव्याच्या स्वरूपात फायबर तसेच विविध डाळींच्या रूपात प्रथिने आहारात जोडल्याने कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण व ग्लुकोज नियंत्रित केले जाऊ शकते. फायबर पचण्यास अधिक वेळ लागतो आणि परिणामी पोट भरलेले वाटून भूक नियंत्रणात राहते.
  3. क्रम: नेहमी आपल्या जेवणाची सुरुवात एक कप सॅलड (फायबर) ने करा, त्यानंतर प्रथिने आणि कार्ब्सचे सेवन करा.

हे ही वाचा<< आठ तास लॅपटॉपसमोर असताना चेहऱ्यावर सनस्क्रीन लावली असेल तर काय होईल? तज्ज्ञांचं उत्तर वाचा

मात्र आता हे ही लक्षात घ्या, काही विशिष्ट कारणांनी तुम्हाला भात पूर्णपणे टाळण्यास सांगितले असल्यास त्याचे पालन करणे आवश्यक आहे. अशावेळी आपण तांदळाच्या आरोग्यदायी पर्यायांमध्ये प्रथिने आणि फायबरचे प्रमाण जास्त असलेले क्विनोआ, कमी कार्बोहायड्रेट असलेले तांदूळ, बल्गुर किंवा बार्ली, शेंगा आणि रताळ्याचा समावेश करू शकता. तुमच्या आहाराच्या गरजा आणि प्राधान्यांशी जुळणारे पर्याय निवडा.”

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: If you stop eating rice for 30 days what will happen to body know benefits and loss perfect way to eat rice everyday health svs
Show comments