वैद्य अश्विन सावंत

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आयुर्वेदानुसार हेमंत ऋतूमधल्या या सुस्वास्थ्याचा संबंध मानवी देहबलाशी आहे. मानवी शरीराला बल कसे प्राप्त होते, याचा विचार करताना आयुर्वेदाने देहबलाचे तीन प्रकार सांगितले आहेत. त्यामधील कालज बल हे ऋतूशी संबंधित असल्याने देहबलाविषयी समजून घेऊया.

मानवी देहबलाचे तीन प्रकार (अष्टाङ्गहृदय २.३.७७)

सहज बल
कालज बल
युक्तिकृत बल

सहज बल

शरीराला जे बळ जन्मासह म्हणजे निसर्गतः प्राप्त होते ते सहज बल. सहज बल हे त्या व्यक्तीचे प्राकृत बळ असते. ज्याचा संबंध अर्थातच तुमच्या अनुवंशिकतेशी जुळलेला आहे. तुमचे आईवडील, आजी-आजोबा आणि आधीच्या पिढ्यांमधील माणसे यांच्या शरीराची ठेवण व सुदृढता, ते कोणत्या प्रदेशात राहात होते, तिथल्या प्रदेशामधील हवामान, त्यांची जीवनशैली, त्यांच्या शरीराला होणारे परिश्रम वा त्यांच्याकडून केला जाणारा व्यायाम, महत्त्वाचे म्हणजे त्यांना मिळणारा आहार, त्या आहाराची पोषकता आणि त्यांना असलेले वा नसलेले आजार आणि तुमच्या मात्यापित्याची जीवनशैली व आहार, तुम्ही आईच्या गर्भाशयात असताना तिने सेवन केलेला आहार आदी अनेक गोष्टींचा प्रभाव यानुसार निसर्गतः तुमचे (तुमच्या शरीराचे) बल कसे असेल हे ठरते.

हेही वाचा : गर्भनिरोधक गोळ्यांमुळे १६ वर्षीय मुलीचा मृत्यू; या गोळ्या वाढवतायत हार्ट अटॅक, स्ट्रोकचा धोका? डॉक्टर सांगतात…

कालज बल

काळानुसार शरीराला प्राप्त होणारे ते कालज बल. याचा अर्थ होतो जन्म झाल्यावर जसजसा काळ पुढे सरकतो, वय वाढत जाते व शरीर आकाराने मोठे होत जाते तसतसे शरीराचे बळ वाढत जाते. कालज बल याचाअर्थ ऋतूनुसार प्राप्त होणारे बळ असा सुद्धा होतो. त्यातही विसर्गकाळ हा निसर्गतः शरीराला बळ देणारा काळ आहे. वर्षभरामधील हेमंत व शिशिर या हिवाळ्याच्या ऋतूंमध्ये शरीराचे बल वाढते. अर्थात हा काही नियम नाही. ज्यांची प्रकृती शीत असते व ज्यांना थंडावा बाधतो, त्यांना काही हेमंत व शिशीर हे हिवाळ्याचे ऋतू (त्यातही कडक हिवाळा) अनुकूल होत नाहीत. अशा शीत प्रकृती व्यक्तींना वसंतापासून वाढत जाणारी उष्णता स्वास्थ्याला अनुकूल होत असल्याने त्यांच्यासाठी वसंत व ग्रीष्म हे उन्हाळ्याचे ऋतू आरोग्याला पोषक होतात, कारण या दिवसांमध्ये त्यांचा अग्नी भूक व पचनशक्ती व चयापचय) उत्तम असतो व त्यामुळे शरीराचे बळ वाढते.

युक्तिकृत बल

योग्य प्रयत्नांनी, योजनाबद्ध रीतीने मिळवलेले ते युक्तिकृत बल. मनुष्याला अनुवंशिकतः प्राप्त होणारे सहज बल योग्य नसेल किंवा वयानुसार व ऋतूनुसार मिळणारे बल सुद्धा मिळाले नसेल तरी प्रयत्नपूर्वक बळ मिळवता येते. योग्य व्यायाम, पोषक आहार, स्वस्थ जीवनशैली आणि रसायन व वाजीकरण औषधे व उपचार यांच्या साहाय्याने युक्ति (योजना) पूर्वक असे बळ मिळवता येते.

हेही वाचा : मधुमेह, हृदय अन् डोळ्यांच्या आरोग्यासाठी ‘ही’ भाजी ठरतेय गुणकारी; आहारात करा समावेश

हेमंत ऋतु : सर्वोत्तम देहबल

हेमंत ऋतू अर्थात थंडीचा काळ हा संपूर्ण वर्षामधील एक असा ऋतू आहे जेव्हा देहबल सर्वोत्तम असते. संपूर्ण वर्षाच्या ऋतुमानाचा विचार करता वर्षाचा पहिला ऋतू म्हणजे वसंत (मार्च-एप्रिलचा काल) तेव्हा देहबल मध्यम असते, वसंतानंतरच्या ग्रीष्म ऋतूमध्ये (मे-जूनच्या कडक उन्हाळ्यामध्ये) देहबल चांगले नसते किंबहुना दुर्बल असते. त्यानंतरच्या वर्षा ऋतूमध्ये (पावसाळ्या) मध्ये तर अग्निमांद्य, पित्तसंचय, वातप्रकोप व वातप्रकोपजन्य विविध वातविकार यामुळे देहबल सर्वाधिक निकृष्ट असते. पावसाळ्यानंतर येणार्‍या शरद ऋतूमध्ये (ऑक्टोबर हिटच्या दिवसांमध्ये) देहबल पावसाळ्यापेक्षा बरे असले तरी उत्कृष्ट म्हणावे असे नसतेच, कारण पित्तप्रकोप व पित्तप्रकोपजन्य विविध पित्तविकार.

हेही वाचा : Health Special : अष्टपैलू राजगिरा

त्या तुलनेमध्ये हेमंत-शिशिर ऋतू अर्थात थंडीचे दिवस हा वर्षभरातला एकच मोसम असा आहे जेव्हा देहबल उत्तम असते. या काळामध्ये देहबल कमी करणार्‍या तीव्र सूर्यकिरणांचा अभाव असल्याने आणि देहबल वाढवणार्‍या चंद्र-जल या तत्त्वांचा प्रभाव वाढल्याने शरीराचे बल वाढत जाते, असे आयुर्वेदशास्त्र सांगते.

एकंदर पाहता हिवाळ्यातले निरोगी वातावरण, थंड-कोरडी हवा, वाढलेली भूक, उत्तम पचनशक्ती, विविध अन्नपदार्थांची उपलब्धी, आजारांचा अभाव, शरीराचे बल कमी करणार्‍या उन्हाचा व त्यामुळे घामाचा अभाव आणि देहबल वाढवणार्‍या मधुर- स्निग्ध रसाचा प्रभाव या सर्व गोष्टी आरोग्याला पोषक ठरतात आणि हेमंत ऋतूमध्ये देहबल उत्तम राहते.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In which season the best fitness of human body as per ayurveda hldc css
Show comments