Ayurvedic medicine for cold and cough: अनेक जण सर्दी आणि खोकला यांसारख्या आजारांवर उपचार करण्यासाठी घरगुती उपचारांना प्राधान्य देतात. त्यामुळे सोशल मीडियावरील कन्टेंट क्रिएटरने हंगामी आजारांपासून बचाव करण्यासाठी आणि रोगप्रतिकार शक्ती सुधारण्यासाठी एक सोपी रेसिपी शेअर केली आहे. या कन्टेंट क्रिएटरच्या मते, “सर्दी, खोकला झाल्यावर तुम्हाला फक्त एक कांदा आणि थोडा मध घ्यायचा आहे. त्यासाठी कांदा बारीक चिरून घ्या. नंतर एका हवाबंद डब्यात कांदा टाकून, त्यात मधही टाका आणि हे मिश्रण मिक्स करून डबा बंद करा. काही तासांनंतर या मिश्रणाचा एक चमचा सेवन करा.”

हा उपाय फायदेशीर आहे?

“कांदा-मधाचे सेवन हा एक लोकप्रिय घरगुती उपाय आहे. जो शतकानुशतके घसा खवखवणे, खोकला व सर्दी यांसाठी केला जातो,” असे डॉ. चारू दत्त अरोरा, संसर्गजन्य रोग विशेषज्ञ, सल्लागार फिजिशियन, अमेरीहेल्थ, एशिया यांनी सांगितले.

डॉ. सचिन, बीएएमएस आणि वैद्यकीय सल्लागार, रसायनम यांनी या गोष्टीला सहमती दर्शवली आणि सांगितले की, कांदा-मधाचे औषध हा घसा खवखवणे, खोकला व सर्दी टाळण्यासाठी आयुर्वेदातील एक सुप्रसिद्ध उपाय आहे. “सर्दी, खोकल्यची लक्षणे सुरू असतानाच आराम मिळण्यासाठी दिवसातून दोनदा एक चमचा या मिश्रणाचे सेवन करा. हा सोपा; पण प्रभावी उपाय मोसमी आजारांचा सामना करण्यासाठी प्रभावी आहे,” असे. डॉ. सचिन म्हणाले.

पण, या मिश्रणावर मर्यादित वैज्ञानिक संशोधन असतानाही, डॉ. अरोरा म्हणाल्या, “कांदा आणि मध या दोन्हींमध्ये वैयक्तिक गुणधर्म आहेत, जे सर्दी, खोकल्याची लक्षणे कमी करण्यास मदत करू शकतात.”

डॉ. अरोरा यांनी सांगितले, “कांद्याचा रस मधामध्ये मिसळल्याने एक सिरप तयार होऊ शकते, जे घसा खवखवणे, खोकला कमी करू शकते आणि त्यामुळे अंतर्निहित संक्रमणाशी लढण्यास मदत मिळू शकते.”

डॉ. अरोरा यांच्या मते, कांद्यामध्ये प्रतिजैविक आणि दाहकविरोधी गुणधर्म असलेली संयुगे असतात, ज्यामुळे संक्रमणाचा सामना करण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे घशाची जळजळही कमी होते. “मधामध्ये प्रतिजैविक गुणधर्म असतात, जे घशाची खवखव थांबवतात आणि खोकला कमी करण्यासाठी फायदेशीर ठरू शकतात,” असे डॉ. अरोरा म्हणाल्या.

कांद्यामध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि सल्फर संयुगे असतात, जे जळजळ व कफ कमी करण्यास मदत करतात आणि रोगप्रतिकार शक्तीदेखील वाढवतात. “तसेच, मध एक शक्तिशाली अँटीबॅक्टेरियल व अँटीव्हायरल एजंट आहे, जो त्याच्या गुणधर्मांसाठी ओळखला जातो,” असे. डॉ. सचिन यांनी दी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले .

परंतु, हा उपाय खूप प्रभावी असला तरीही तुमची समस्या बरी होत नसल्यास योग्य निदान आणि काळजी घेण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या, असे डॉ. अरोरा यांनी सांगितले.