आयुष्य कसं हवं? असा प्रश्न विचारला तर तुम्ही लगेच सांगाल आनंदी व एकदम मजा असलेलं हवं. आता, तुमचं आयुष्य कसं आहे? असा प्रश्न विचारला तर तुम्ही सांगू शकाल का, की मी खूप सुखात आहे, आनंदात आहे.. मला काहीच प्रॉब्लेम नाहीत म्हणून? फार कमी लोक सांगू शकतील की आमचं आयुष्य अगदी तसंच आहे, जसं आम्हाला हवंय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा: Health special: नेटफ्लिक्सवरील मालिकांचा आणि डोपामिन व व्यसनाचा …

यामागचं खरं कारण आहे की, मूळात हे आयुष्य सोपं नी छान नाहीये. आयुष्य कठीण आहे, ही वस्तुस्थिती आहे. जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत ज्या सगळ्या प्रसंगांना आपण सामोरे जातो, त्यामध्ये त्रास हा ओतप्रोत भरलेला आहे. जन्माला आल्यानंतरचा अनेक वर्षांचा परावलंबित्वाचा काळ, इच्छेविरुद्ध लादलेला शिक्षणाचा काळ, स्पर्धा- तुलना-विविध आव्हानांना सामोरे जाणारा तारुण्यातला काळ, नंतर कौटुंबिक जबाबदाऱ्या, घर चालवण्यासाठी करावी लागणारी अथक मेहनत, वेगवेगळ्या बऱ्यावाईट लोकांशी येणारा संपर्क व इच्छा असो वा नसो त्याला तोंड द्यावं लागणारी परिस्थिती, केवळ नातेवाईकच नाहीत तर समाज तुमच्याकडून करत असलेल्या अपेक्षांची पूर्तता करताना होणारी यातायात, दैनंदिन जीवनात पेलावे लागणारे असंख्य लहानमोठे निराशेचे क्षण… या सगळ्याचा विचार केला तर आयुष्य हे मूलत:च सोपं आहे असं कोणीही म्हणणार नाही.

आणखी वाचा: हेल्थ स्पेशल: विद्यार्थी आत्महत्या का करतात? | Health Special: Why …

गौतम बुद्धांनीदेखील जी चार सत्य सांगितली आहेत, त्यातलं पहिलं सत्य आहे, ‘संसार म्हणजे दु:ख’ किंवा ‘जीवन म्हणजे त्रास’ किंवा ‘आयुष्य म्हणजे खडतर प्रसंगांची मालिका’. एकदा का आयुष्य खडतर आहे, हे सत्य आपण स्वीकारलं तर त्यावर मात करण्याचा प्रयत्न करता येतो, मार्ग शोधता येतो, कुठल्या दिशेने प्रयत्न करायचेत याचा अंदाज येतो.

आणखी वाचा: आपले मन कुठे आहे? ते कसे चालते? | Lets know about our mind | Loksatta

याउलट आयुष्य म्हणजे एकदम सोप्पं, आयुष्य म्हणजे फक्त मजा अशी धारणा असेल तर मात्र पदरी निराशा येण्याची शक्यता असते. कारण, आयुष्य सोपं आहे अशीच धारणा असेल तर येणारी प्रत्येक समस्या ओझं वाटायला लागते, परिस्थितीला, संकटाला सामोरे जाण्यापेक्षा संकटांना टाळण्याकडे कल होतो आणि संकटं कमी तर होत नाहीतच, उलट ती आणखी क्लिष्ट होतात, जास्त त्रास देतात. आपण बघतो, संकट आल्यावर काही व्यक्ती हताश होतात, गळून जातात. काहीजण तर आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलायला उद्युक्त होतात. तर काही व्यक्ती मात्र संकटाला सामोरे जातात. काहीजण तर चक्क संकटांकडे संधी म्हणून पाहतात. आपल्या मनाला सतत सकारात्मक संदेश देत आणखी कष्ट करण्यासाठी, प्रयत्न करण्यासाठी उद्युक्त करतात. काहीवेळा संकटावर मात करतात, काही वेळा संकट एवढं मोठं असतं की, त्यावर मात करता येत नाही. पण या व्यक्ती हार नाही मानत, वेगळा मार्ग शोधतात, आपल्याला काय हवंय, आपलं ध्येय काय याची नव्यानं मांडणी करतात आणि पुन्हा नव्या जोमानं आपल्या ध्येयप्राप्तीसाठी झटायला लागतात.

आपल्या सगळ्यांना बॉलीवूडमधला प्रसिद्ध अभिनेता मनोज बाजपेयी माहिती असेल. सत्या ते फॅमिली मॅन या प्रवासानं तो घरोघरी परिचित आहे. बिहारमधल्या गावामधून राष्ट्रीय नाट्य अकादमीमध्ये शिक्षणासाठी दिल्लीला आला. दोन वेळच्या जेवणांची भ्रांत असलेल्या स्थितीत अकादमीमध्ये प्रवेश मिळावा म्हणून प्रयत्न करत राहिला. अनेकजणांकडे अभिनयाचे धडे गिरवले, अनेक नाटकांमध्ये काम केलं, नावाजलेल्या दिग्गजांनी मनोजच्या अभिनयाचं कौतुकही केलं. बॅरी जॉन यांच्यासारख्या दिग्गज शिक्षकाकडे नाटकाचे धडे गिरवलेल्या व कौतुकास पात्र ठरलेल्या मनोजला राष्ट्रीय नाट्य अकादमीनं एकदा नव्हे सलग तीन वर्षे प्रवेश दिला नाही. एखाद्या दुसऱ्या व्यक्तीनं हार मारली असती, पण मनोज बाजपेयीनं चंगच बांधला होता, की मी अभिनेता होणार. आपला फोकस, आपलं लक्ष्य निश्चित असेल तर प्रतिकूल परिस्थितीनं डगमगून न जाता अथक परीश्रम करत राहण्याला मनोज बाजपेईनं प्राधान्य दिलं. मग वेगवेगळ्या नाट्यसंस्थांमध्ये काम करत करत त्यांनं इतकी उंच भरारी मारली की, ज्या राष्ट्रीय नाटक अकादमीनं त्याला प्रवेश नाकारला होता, तिथंच पुढच्या पिढीतील विद्यार्थ्यांना अभिनयाचे धडे देण्यासाठी त्याला आमंत्रण देण्यात आलं.

हा प्रवास इतका सोपा नसतो. त्यामागे केवळ अखंड परीश्रम, आप्तांची मदत, कोणा ना कोणाचा आसरा, नशिबाची थोडी का होईना साथ किंवा अशासारख्या बाबी पुरेशा नसतात. त्यासाठी आणखी एक महत्त्वाची गोष्ट कुठली असेल तर ती असते सक्षम निरोगी मन. सकारात्मक दृष्टीकोन अंगीकारणारं मन. आता या मनाची मशागत किंवा ज्याला आपल्या पारंपरिक पद्धतीत संस्कार म्हणतात, ते लहानपणापासून घडत असतात. परंतु, सगळ्याच लहान मुलांच्या वाट्याला चांगले संस्कार येतातच असं नाही.

संपूर्णपणे परावलंबी असलेल्या बालमनावर झालेले संस्कार चांगले असतील, मुलांना आईवडिलांचं, कुटुंबाचं, आप्तेष्टांचं भरभरून प्रेम मिळालं असेल तर अशी मुलं मानसिकदृष्ट्या सकारामत्क घडतात, कारण त्यांना जगाचा अनुभव चांगला असतो. जग हे सुरक्षित आहे, आपण इथं सहज निभावू शकतो ही भावना मनानं अनुभवलेली असते, ज्यामुळे नंतरच्या काळात ही मुलं जगातली आव्हानं पेलायला सज्ज असतात. येणाऱ्या सगळ्या संकटांना, परिस्थितीला, मोहजालांना, फसव्या गोष्टींना सामोरे जायला सज्ज असतात. पण हे संस्कार योग्य झाले नसतील. आईवडिलांचं प्रेम मिळालं नसेल, तुसडेपणाची वागणूक मिळाली असेल, वेळेचं-शिस्तीचं महत्त्व पटलेलं नसेल तर अशी मुलं मोठेपणी अल्पशा यशानं हुरळून जाऊ शकतात, यश न मिळाल्यास हिंसक होऊ शकतात, यशा-अपयशाच्या हिंदोळ्यावर झुलताना व्यसनांना बळी पडू शकतात. मनाचा पुरेसा विकास न झाल्यामुळे सुखापासून, आनंदी जीवनापासून वंचित राहू शकतात. त्यामुळे लहान मूल घडत असताना, त्याच्या मनावर सगळीकडून काय संस्कार होतायत हे बघणं महत्त्वाचं असतं.

सचिन तेंडुलकरच्या समवयस्क क्रिकेटपटूनं सचिनच्या यशाचा दाखला देताना, त्याच्या कौटुंबिक पार्श्वभूमीचं महत्त्व अधोरेखित केलं होतं. आपल्याला जर सचिनसारखं घर नी तसे संस्कार मिळाले असते तर आपणही सचिनसारखे यशस्वी झालो असतो, असा तो रोख होता. यामध्ये तथ्य निश्चितच आहे. लहानपणी, उमलत्या वयात मनाची मशागत योग्य प्रकारे झाली, नी त्याला वय वाढेल तसा योग्य आकार मिळाला तर ते उत्तमच. पण समजा तसं नाही होऊ शकलं तरी आपल्या अपयशाचं किंवा दु:खाचं खापर दुसऱ्यांवर फोडायची काही गरज नाही. कारण, मनाचा शोध घेण्यासाठी, त्याची मशागत करण्यासाठी कधीही सुरुवात करता येते. उत्तम मानसिक संतुलनासाठी सतत प्रयत्न करणं तर आपल्या हाती असतंच. त्यामुळे या क्षेत्रातले तज्ज्ञ सांगतात की, जेव्हा मोठ-मोठी माणसं मानसोपचार तज्ज्ञांकडे जातात, त्यांचं मार्गदर्शन घेतात, तेव्हा ते कमजोर किंवा पळपुटे नसतात. उलट या व्यक्ती सगळ्यात धैर्यशील असतात, ज्या जाणतात की मला उपचारांची गरज आहे, मला बदलण्याची गरज आहे.

साधारणपणे, कॉलेज किंवा तत्सम शिक्षण संपलं की माणसं शिकायचंच बंद करतात. त्यामुळे अनेकवेळा दिसतं, वयानं तर माणसं खूप वाढलेली असतात, पण त्यांचे विचार २०-२२ वर्षांच्या बौद्धिक कुवतीच्या पलीकडे सरकलेले नसतात. ते काळाच्या मागे असतात, जग बदलेल तसं बदललेले नसतात. सुदृढ मनाचं एक वैशिष्ट्य म्हणजे जे कधीच शिकणं थांबवत नाही. शालेय, महाविद्यालयीन शिक्षण संपलं तरी सतत शिकण्याचा ध्यास घेतलेलं मन चिरतरुण नी आनंदीदेखील असतं. एक नव्वदीचा म्हातारा आंब्याचं झाड लावत होता. त्याला शेजारी विचारतो, हे काय करताय. आंब्याचं झाड मोठं व्हायला, आंबे लागायला किती वर्षे लागतील. तो म्हातारा म्हणतो, लागतील ८-१० वर्षे. शेजारी विचारतो, तुमचं वय काय आता… उशीर नाही का झालाय झाड लावायला? म्हातारा म्हणतो, हो तर… खूप उशीर झालाय मला. इतका उशीर झालाय की आता मी एक दिवसही वाया घालवू शकत नाही, म्हणून तर इतक्या तातडीनं हे रोप लावायला घेतलंय. तरुण, आनंदी, सुखी मन हे असं असतं. असं मन मिळवण्यासाठी नी राखण्यासाठी मनाची नित्य मशागत करणं खूप आवश्यक आहे.

मनाची मशागत करायची म्हणजे काय करायचं, मनाला आपल्या स्वत:ला या त्रासदायक आयुष्यातून निर्मळ आनंदाचे झरे कसे मिळवून द्यायचे, सर्व प्रकारच्या संकटांना हसतमुखानं सामोरे जायचं म्हणजे नक्की काय करायचं अशा मनाशी संबंधित अनेक प्रश्नांचा शोध आपण या सदरात घेणार आहोत. यामध्ये मनोविश्वाशी संबंधित अनेक संज्ञा किंवा प्रकार आपण जाणून घेऊ, आपल्या स्वत:ला आपल्या मनावर चांगले संस्कार करणं शक्य आहे, ते कसे करायचे हे समजून घेऊ. सिगमंड फ्रॉइड, कार्ल युंग, एम. स्कॉटपेक, एरिक बर्न, एरिक फ्रॉम, अॅडलर यांसारख्या अनेक दिग्गजांनी मनावर केलेल्या संशोधनाचा, त्यांच्या अनुभवाचा तसेच न्युरोलिंग्विस्टिक प्रोग्रामिंग, बिहेव्हरियल सायन्ससारख्या क्षेत्रातली आधुनिक अभ्यासकांच्या मार्गदर्शनाचा फायदा आपण घेणार आहोत. आपल्या मनाचा विकास करण्यास सहाय्य करतील अशा क्लृप्त्यांची आपण ओळख करून घेणार आहोत!

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mental health special man ki baat psychology happiness human behavior personal relations pains and relief hldc vp
Show comments