Vitamin C Side Effects: आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी रोगप्रतिकार शक्ती उत्तम असणे आवश्यक आहे. रोगप्रतिकार शक्ती उत्तम असली, तर कोणतेच विषाणूजन्य आजार होऊ शकत नाहीत. शरीर सुदृढ, ठणठणीत व आरोग्यसंपन्न ठेवायचे असल्यास योग्य आहार, वेळेत व पुरेशी झोप घेण्याचा सल्ला डॉक्टर देतात. निरोगी शरीर ठेवण्यासाठी जीवनसत्त्वे सर्वांत महत्त्वाची भूमिका बजावतात. आपल्या शरीराला प्रत्येक जीवनसत्त्वाची गरज असते. त्यापैकी क जीवनसत्त्व (व्हिटॅमिन सी) आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचे आहे. कारण- त्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढते आणि कोणत्याही प्रकारचे व्हायरल इन्फेक्शन टाळण्यास मदत होते.

आता पावसाळी आजारांपासून संरक्षण करण्यासाठीही प्रयत्न केले जातात. निरोगी राहण्यासाठी व्यायाम करण्याबरोबरच पोषक पदार्थांचा आहारात समावेश करणेही महत्त्वाचे असते. क जीवनसत्त्वाने समृद्ध असलेली फळे आणि भाज्यांचा आहारात आवर्जून समावेश करावा. त्यामुळे तुमच्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. त्याचबरोबर पावसाळी हंगामात होणार्‍या विषाणूजन्य आजारांचे संक्रमणदेखील टाळता येते. क जीवनसत्त्व अनेकदा फायदेशीर सूक्ष्म पोषक घटक म्हणून ओळखले जाते; जे वाढ, विकास व लोह शोषण्यासाठी मदत करते. परंतु, या जीवनसत्त्वाच्या फायद्यामुळे अतिसेवन करू नका, असे तज्ज्ञ सांगत असतात. परंतु, आपणास माहीत आहे की, क जीवनसत्त्वयुक्त पूरक आहाराचे जास्त सेवनदेखील आपल्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते, अशी माहिती तज्ज्ञांनी दी इंडियन एक्स्प्रेसला दिली आहे. त्याबद्दल जाणून घेऊ.

आजकाल लोक रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय क जीवनसत्त्व मिळविण्यासाठी पूरक आहार घेतात. काही जण आंबट फळे खाऊन क जीवनसत्त्वाची गरज भागवीत आहेत. तर, त्याच्याबरोबरीने क जीवनसत्त्वयुक्त पूरक आहारही घेतात. मात्र, क जीवनसत्त्वाच्या अतिरिक्त सेवनाने आपल्या शरीरावर वाईट परिणामही होऊ शकतो. जर हे जीवनसत्त्व प्रमाणात खाल्ले, तर याचे अनेक फायदे आहेत. परंतु, जर याचे अतिसेवन केले गेले, तर त्याचे अनेक तोटेही आहेत.

(हे ही वाचा: झटपट वजन कमी करण्यासाठी उच्च तीव्रतेचा व्यायाम केल्यामुळेही वाढू शकतं वजन? तज्ज्ञ काय सांगतात…)

जास्त प्रमाणात क जीवनसत्त्व घेतल्याने दुष्परिणाम

१. क जीवनसत्त्वयुक्त पूरक आहार जास्त प्रमाणात घेतल्याचा तत्काळ होणारा दुष्परिणाम म्हणजे अतिसारासह गॅस्ट्रोइंटेस्टायनल त्रास. दररोज सुमारे २,००० मिलिग्रॅमच्या पातळीवर क जीवनसत्त्वाचे सेवन केल्यास ऑस्मोटिक डायरिया होऊ शकतो.

२. जास्त प्रमाणात क जीवनसत्त्व घेतल्याने मूत्रपिंडावर दुष्परिणाम होण्याचा धोका असतो. त्यामुळे किडनी स्टोन तयार होण्याची शक्यता असते. किडनी स्टोनचा पूर्वीचा इतिहास नसलेल्या व्यक्तींनीही क जीवनसत्त्वाचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास त्यांना हा त्रास तयार होण्याचा धोका संभवू शकतो.

३. जास्त प्रमाणात क जीवनसत्त्व घेतल्यास छातीत जळजळ होऊ शकते. त्यामुळे आपल्याला छातीच्या खालच्या आणि वरच्या भागात तसेच, घशातही जळजळ होण्याचा त्रास होऊ शकतो.

४. क जीवनसत्त्व जास्त प्रमाणात घेतल्यामुळे पोटात जळजळ होणे, पोट खेचल्यासारखे वाटणे, पोट फुगण्याचा त्रासही होऊ शकतो. त्यामुळे पोटदुखीही होऊ शकते.

५. अपचन, उलट्या, पोटदुखी, छातीत जळजळ या समस्यांचा त्रास क जीवनसत्त्वाच्या अतिसेवनाने होतो.

लक्षात ठेवा की, क जीवनसत्त्वाचा पूरक आहार सहसा आवश्यक नसतो. कारण- बहुतेक लोक ताजे पदार्थ, विशेषतः फळे आणि भाज्यांद्वारे हे जीवनसत्त्व पुरेशा प्रमाणात मिळवू शकतात. जर तुम्हाला क जीवनसत्त्वाच्या पूरक आहार घेण्याची गरज वाटत असेल, तर आधी तुमच्या डाॅक्टरांचा सल्ला घ्या.