गेल्या काही दिवसांपासून हृदयविकाराच्या घटना वाढताना दिसत आहेत. चुकीची जीवनशैली, अयोग्य खाण्याच्या सवयी, धूम्रपान आणि मद्यपान यामुळे हृदयविकाराच्या झटक्यांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. आता नुकतंच केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी कोविड-१९ च्या गंभीर संसर्गाशी लढा दिला असणाऱ्या व्यक्तींना हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण काहीसे अधिक असल्याचे सांगितलं आहे. हृदयविकाराचा झटका टाळण्यासाठी अशा लोकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन त्यांनी केलं आहे.
शारदीय नवरात्रीत गुजरातमध्ये गरबा खेळताना काही लोकांना हार्ट अटॅक आल्याच्या घटनांमुळे हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूचा करोनाशी काही संबंध आहे का? हे प्रश्न निर्माण झाले आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) च्या अभ्यासाचा हवाला देत मांडविया म्हणाले की, करोना संसर्ग झालेल्या लोकांनी किमान दोन वर्षे जड काम करणे आणि आणि अधिक तीव्रतेचा व्यायाम करणे टाळणे आवश्यक आहे. गुजरातमध्ये सातत्याने हृदयविकाराच्या झटक्याची नोंद होत आहे. अपोलो हार्ट इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. समीर दाणी यांनी करोना संसर्ग आणि हृदयविकाराने मृत्यू याचा काही संबंध आहे का, याच विषयावर इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना आपली मतं मांडली आहेत.
(हे ही वाचा : डॅश डाएटने रक्तवाहिन्यांमधील वाढलेला रक्तदाब झपाट्याने कमी होऊ शकतो? आहार तज्ज्ञांनी दिलं उत्तर… )
हृदयरोगतज्ज्ञ म्हणतात, आतापर्यंत अशी घटना तीन रुग्णांमध्ये आढळून आली आहे. कोविड-१९ झालेला बायपास रुग्ण बरे झाल्यानंतर सहा महिन्यांनी त्याने हृदयविकाराची तक्रार केली होती. तेव्हा डॉक्टरांना सुरुवातीला वाटले की त्याचे बायपास ग्राफ्ट्स निकामी झाले आहेत. जेव्हा त्यांनी अँजिओग्राफी पाहिली तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, बायपास ग्राफ्ट ठीक आहेत; परंतु नवीन ब्लॉकेजेस आणि गुठळ्या तयार झाल्या आहेत, जे शस्त्रक्रियेनंतरच्या रुग्णांमध्ये खूप असामान्य आहेत, असे ते सांगतात.
जगभरातील हृदयरोगतज्ज्ञांना अद्यापही कोविड-१९ आणि हृदयरोग यांच्यातील नेमका दुवा निश्चित करता आला नसल्याचे ते म्हणाले. डॉ. दानी यांच्या म्हणण्यानुसार, कोविड-१९ मुळे तणाव आणि मधुमेह यांसारख्या हृदयविकाराच्या इतर घटनांमध्ये वाढ झाली आहे. डॉक्टर म्हणतात, “तुम्ही व्यायामाची कोणतीही पद्धत सुरू करण्यापूर्वी, तुमच्या हृदयाची अगोदर तपासणी करा, जेणे करून तुम्हाला तुमच्या हृदयाच्या आरोग्याच्या स्थितीबद्दल माहिती असेल.
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल सायन्सेस (ICMR) च्या अभ्यासात ज्या लोकांना करोना विषाणूचा संसर्ग झाला आहे त्यांना हृदयविकाराचा धोका जास्त आहे, असा दावा करण्यात आला आहे. याच अभ्यासाचा हवाला देत मांडविया म्हणाले की, अशा लोकांनी किमान दोन वर्षे फार जास्त मेहनतीची कामं करणं आणि अति जास्त व्यायाम करणं टाळणे आवश्यक आहे. त्यावर डॉक्टरांनी आपलं मत मांडलं आहे. ते म्हणतात, “गेल्या २५ वर्षांत तरुणांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण जास्त आहे आणि दरवर्षी त्यांचे प्रमाण वाढत आहे”, त्यामुळे आपल्याला आपल्या हृदयाला बळकट आणि निरोगी ठेवायचे असल्यास, कमी चरबी आणि कमी साखरयुक्त आहार घ्या. तसेच जास्तीत जास्त फळे आणि भाज्या खा आणि नियमित व्यायाम करण्याचा ते सल्ला देतात.