Can Betel Leaf Help Weight Loss: अनेकांना जेवणानंतर सुपारी किंवा पान चघळणे आवडते, या दोन्ही गोष्टींमध्ये पाचक गुणधर्म असतात शिवाय ते तोंडाच्या स्वच्छतेसाठी सुद्धा योगदान देतात. जेवणानंतर पान चघळल्याने वजन कमी करण्यास सुद्धाही मदत होऊ शकते. दुर्दैवाने अनेकदा पानाचे सेवन चुना व तंबाखूसह केले जात असल्याने घातक परिणामांविषयीच लोकांना माहिती आहे व परिणामी पानाचे सेवन हे घातकच मानले जाते. आज आपण चुना व तंबाखू ऐवजी पानामध्ये बडीशेप, काळी मिरी, आणि सुक्या मेव्यातील एक पदार्थ घालून खाण्याचे काही फायदे पाहणार आहोत.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका पोस्टनुसार, दुपारी जेवणाच्या नंतर बडीशेप, काळी मिरी आणि दोन काळे मनुके,सुपारी घालून पान खाल्ल्यास अतिरिक्त वजन कमी होण्यास मदत होऊ शकते. जर तुम्हाला अपचनाचा त्रास असेल, वारंवार गोड खाण्याची इच्छा होत असेल तर त्यावर उपाय म्हणून सुद्धा हा कॉम्बो उत्तम काम करू शकतो. अर्थात सोशल मीडियावर व्हायरल होणारी प्रत्येक गोष्ट खरी असेलच असे नाही त्यामुळे या दाव्याची पडताळणी आपण आता थेट डॉक्टरांकडूनच करून घेणार आहोत.

डॉ संगीता तिवारी, क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट, आर्टेमिस लाइट, एनएफसी, नवी दिल्ली यांनी इंडियन एक्सस्प्रेसला दिलेल्या माहितीनुसार, सुपारीचे औषधी गुणधर्म सर्वश्रुत आहेत. सुपारी चघळल्याने पचनाला मदत होऊ शकते, चयापचयाचा वेग वाढू शकतो या दोन्ही गोष्टींमुळे आपल्याला वजन कमी करण्याच्या प्रवासात मोठी मदत होऊ शकते. तर बडीशेपेत लघवीचे प्रमाण वाढवणारे गुणधर्म असतात. यामुळे वरच्या वर लागणारी भूक कमी होते तसेच चयापचय क्षमता सुद्धा सुधारते. काळ्या मिरीतील पाइपरिन हा घटक सुद्धा समान फायदे देऊन शरीरातील चरबी बर्न करण्याचा वेग वाढवू शकतो. या तीन वस्तूंसह आपल्याला खायच्या पानात दोन काळे मनुके घालायचे आहेत. मनुक्यात फायबरचे प्रमाण अधिक असते जे तुम्हाला पोट भरल्याची जाणीव करून देते.

हे फायदे मान्य करताना, डॉ. तिवारी यांनी हे ही नमूद केले की अमुक एका गोष्टीची मदत होते म्हणजे तीच गोष्ट तुमच्यासाठी एकमेव उपाय कधीच ठरू शकणार नाही. मुळात वजन कमी करणे ही जटिल प्रक्रिया आहे व त्यात यशस्वी होण्यासाठी आपल्याला सर्वांगीण दृष्टिकोन बाळगण्याची गरज आहे. खाण्याच्या/ विड्याच्या पानावर अवलंबून संतुलित आहार व जीवनशैलीकडे दुर्लक्ष करणे हे अजिबातच फायद्याचे ठरणार नाही.

लक्षात काय ठेवावं?

डॉ तिवारी यांनी अधोरेखित केले की, वजन व्यवस्थापनासाठी कोणताही एक बेस्ट उपाय नाही हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. वजन कमी करण्यासाठी, संतुलित आहार, नियमित शारीरिक व्यायाम आणि जीवनशैलीत बदल यांचा समावेश असलेला एक व्यापक दृष्टिकोन महत्त्वाचा आहे. शिवाय वर नमूद केलेल्या घटकांसह पानाचा आहारात समावेश करणे विवेकीपणे केले पाहिजे, कारण जास्त प्रमाणात सेवन केल्याने कॅलरीज वाढू शकतात. विशेषतः मनुक्याच्या अतिसेवनामुळे हा धोका संभवतो.

हे ही वाचा<< तोंडाच्या कर्करोगाची लक्षणे असतात ‘हे’ ८ लहानसे बदल; दात घासताना ‘असा’ करा तपास; ‘या’ अवयवांना सुद्धा होतात वेदना

सुपारीचे पान, बडीशेप , मिरी आणि काळ्या मनुका यांचे मिश्रण वजन कमी करण्याच्या प्रयत्नांना मदत करू शकतात परंतु हा वजन व्यवस्थापन करण्यासाठी अन्य प्रयत्नांना जोडून केलेला अतिरिक्त उपाय असायला हवा भाग म्हणून एकत्रित करणे आवश्यक आहे.