Soaked almonds Benefits on memory and health: भारताचा लोकप्रिय क्रिकेटर विराट कोहली त्याच्या मजेशीर वक्तव्यांमुळे अनेकदा चर्चेत असतो. अलीकडेच भारतीय क्रिकेट टीमचे कोच गौतम गंभीर यांच्याशी संवाद साधताना विराटने हिटमॅन रोहित शर्माबद्दल एक मजेशीर वक्तव्य केलं, जे सध्या गाजतंय.

जेव्हा गौतम गंभीर यांनी विराट कोहलीला विचारलं की, “आता जेव्हा मी रोहित शर्माची मुलाखत घेईन तेव्हा मी त्याला नेमका कोणता प्रश्न विचारावा असं तुला वाटतं?” यावर विराट म्हणाला, “मला असं वाटतं की, एकदम साधा सोपा प्रश्न तुम्ही रोहितला विचारू शकता, तो म्हणजे सकाळी सकाळी भिजत घातलेले बदाम तू खातोस की नाही?

यावर गौतम गंभीर हसला आणि म्हणाला, “हो नक्कीच, यामुळे रोहितच्या हे नक्कीच लक्षात राहील की त्याला सकाळच्या ११ वाजता यायचं आहे, रात्रीच्या नाही.” यावर “रोहित हाच तुझ्यासाठी पहिला प्रश्न आहे”, असं कोहली संवादादरम्यान खिल्ली उडवत म्हणाला.

हेही वाचा… उर्फीने दात पांढरेशुभ्र करण्यासाठी वापरला टॉयलेट क्लिनर, तर मुरूमांसाठी वापरलं हे औषध; तज्ज्ञांनी सांगितले याचे दुष्परिणाम

भारताचा टेस्ट आणि ओडीआयचा कॅप्टन रोहित शर्मा, त्याच्या विस्मरणामुळे अनेकदा चर्चेत असतो. त्याचा हा गुण त्याच्या अनेक सह खेळाडूंनी अनेकदा मस्करीत बोलून दाखवला आहे.

या हलक्याफुलक्या विनोदातून एक संकेत घेऊन, भिजवलेले बदाम खरोखरच स्मरणशक्ती सुधारण्यास मदत करतात का, याचा शोध घेतला.

बदाममध्ये, ज्यात पोषक घटक (फॅट्स, फायबर, प्रथिने आणि अत्यावश्यक सूक्ष्म पोषक घटक) असतात, ते एकूणच निरोगी आहार पद्धतीमध्ये अत्यंत चांगले योगदान देऊ शकतात. तज्ज्ञांनी सांगितले की, बदाममध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड, फायबर, जीवनसत्त्वे आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर असतात. “हे हृदयाचे आरोग्य, सुधारित संज्ञानात्मक कार्य (अशी मानसिक प्रक्रिया जी लोकांना विचार करण्यास, समजून घेण्यास मदत करते), दाहकता (inflammation) कमी करण्यास योगदान देतात. यामध्ये ओमेगा -६ फॅटी ॲसिड्सदेखील असतात,” असे हैदराबाद येथील ग्लेनेगल हॉस्पिटलमधील मुख्य आहारतज्ज्ञ डॉ. भावना पी यांनी सांगितले.

बदाममुळे स्मरणशक्ती सुधारते का?

सल्लागार न्यूरोलॉजिस्ट डॉ. सुधीर कुमार , अपोलो हॉस्पिटल, हैदराबाद, यांच्या मते अभ्यासात असे दिसून आले की, बदाम आणि अक्रोड हे मनुष्याची स्मरणशक्ती सुधारतात. “सहा महिने बदामचे नियमित सेवन केल्याने व्हिज्युओस्पेशिअल वर्किंग मेमरी, व्हिज्युअल मेमरीमध्ये सुधारणा होण्याची शक्यता असते,” असं डॉ. कुमार म्हणाले.

प्रायोगिक अभ्यासात उंदरांच्या स्मरणशक्तीवर बदामचे असेच फायदेशीर परिणाम आढळून आले, असे डॉक्टरांनी निदर्शनास आणून दिले.

बदामचे सेवन किती करावे?

“मानवांसाठी, चांगल्या आरोग्यासाठी बदामचे सेवन रोज ३० ग्रॅम असल्याचे अभ्यासात सुचवले आहे,” असं डॉ. कुमार म्हणाले. दररोज ३० ग्रॅमपेक्षा जास्त सेवन केल्यास अतिरिक्त फायदे मिळत नाहीत, ही गोष्ट डॉ. कुमार यांनी ठळक केली.

हेही वाचा… अनुष्का-विराट लवकर जेवण करतात अन् लवकर झोपतात; जाणून घ्या त्यांचं स्लीप रुटीन अन् त्याचे फायदे

बदाम भिजवणे आवश्यक आहे का?

बदाम भिजवल्याने पचनशक्ती सुधारू शकते आणि काही पोषक तत्वांचे शोषण वाढू शकते, असे डॉ. कुमार म्हणाले. तथापि, आपण ते न भिजवता स्नॅक म्हणूनदेखील घेऊ शकता. “पण ते भाजून खाणेदेखील उत्तम आहे,” असं डॉ. कुमार यांचं म्हणणं आहे.

आणखी काय विचारात घ्यावे?

शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहणे आणि निरोगी आहाराचे पालन करणे हे निरोगी वृद्धत्वाला चालना देण्यासाठी आणि अशक्तपणा टाळण्यासाठी सर्वात महत्त्वाचे जीवनशैली घटक आहेत, असे डॉ. कुमार यांनी सांगितले.

टिप- हा लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे. आहारात किंवा जीवनशैलीत कोणतेही बदल करण्यापूर्वी तुमच्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला घ्या.