सकाळपासून रात्रीपर्यंत आपल्या दिनक्रमातल्या अनेक गोष्टी आपण आपल्या नकळत सहजपणे करत असतो. उठल्यावर चूळ भरणे, दात घासणे अशी जी आपल्या दिवसाची सुरुवात होते ते दिवस संपेपर्यंत, म्हणजे घरातले दिवे बंद करेपर्यंत अनेक क्रिया, प्रतिक्षिप्त क्रिया असाव्यात इतक्या सहजपणे आपल्याकडून होतात. ही कामे करताना आपल्या मनात चलबिचल होत नाही, किंबहुना हातून कृती होत राहते आणि आपले मन इतर ठिकाणी गुंतते. जसे अंघोळ करताना किंवा प्रवास करताना अनेक जण आपल्या दिवसाचे नियोजन करतात, मनातल्यामनात दिवसाच्या कामांचा अग्रक्रम ठरवतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कधी कधी, काही जणांना मात्र आपल्या वागण्यातली सहजता संपल्याचा अनुभव येतो. अनेक कृती करताना मनावर दडपण येते. माझ्यासमोर समीर बसला होता. त्याचे हात त्याने एकमेकांत गुंतवले होते आणि टेबलाला स्पर्श होणार नाही याची काळजी घेत मांडीवर ठेवले होते. बोलताना एकदा चुकून टेबलाला हात लागला तर त्याने लगेच सॅनिटायझर काढून ते खसाखसा एकमेकांवर चोळले, एकदा दोनदा नाही तर बरोब्बर पाच वेळा. तो सांगत होता, “बारावीत गेलो, सी.ए. करायचेच असे माझे ध्येय होते. जिद्दीने अभ्यासाला लागलो. क्लासलाही जात होतो. हळू हळू मनात टेन्शन वाढायला लागले. एक ओळ वाचली की वाटायचे की प्रत्येक शब्द माझ्या लक्षात राहिला पाहिजे. मग पुन्हा तीच ओळ वाचायचो. मग पुन्हा एकदा… जोपर्यंत मनात असे वाटायचे नाही की, माझ्या लक्षात आहे आता, तोपर्यंत वाचायचो. या सगळ्यात फार वेळ जायचा. एक- दीड तास फक्त एक परिच्छेद!

हेही वाचा… Health Special: पावसाळ्याच्या सुरुवातीस आरोग्य बिघडण्याचे प्रमाण वर्षात सर्वाधिक का असते?

मग मनात प्रचंड भीती निर्माण व्हायची. आई बाबा दोघेही नोकरी करणारे. क्लासनंतर मी घरात एकटाच असायचो. अचानक वाटायचे, घरी येताना आईला काही बरे- वाईट झाले तर, बाबांना अपघात झाला तर… मग माझे नियमच बनून गेले. रोज संध्याकाळी देवाची पूजा करायची. सतत नमस्कार करायचा, जो पर्यंत दोघेही सुखरूप घरी येत नाहीत, तोपर्यंत हात जोडणे सुरूच राहायचे आणि जर त्यांना यायला उशीर झाला तर मी देवाला वाईट शब्दांत दूषणे द्यायचो. मग खूप अपराधी वाटायचे. केव्हातरी टेबलावर धूळ होती ती माझ्या लक्षात आली. आईला मी रागावलो. म्हणालो,’मला काही आजार झाला तर किती वेळ जाईल माझा! स्वच्छ कर आधी टेबल’. आईकडून दहा वेळा तरी मी ते पुसून घेतले. मग प्रत्येक गोष्टीलाच हात लावताना ही शंका मनात यायची, हे स्वच्छ आहे? इथे कोणते रोगजंतू तर नाहीत? माझ्या हाताला तर ते लागले नाहीत? पुन्हा पुन्हा हात धुतल्याशिवाय समाधानच व्हायचे नाही. डॉक्टर, गेली दोन वर्षे झगडतो आहे मी या सगळ्याशी. बारावी पूर्ण केली कशीबशी, पण असेच नाही जगायचे मला! उपाय आहे का यावर काही?”

Obsessive compulsive disorder (OCD- मंत्रचळ) हा शब्द आपल्यापैकी अनेकांना माहीत असतो आणि वेगवेगळ्या संदर्भात तो वापरलाही जातो. ‘ते त्याचे ऑब्सेशन आहे,’ असे आपण म्हणतो. जरा कोणी जास्त साफसफाई करताना दिसले तर तुला काय ‘ओसीडी’ झालाय का, असे चेष्टेत म्हटले जाते. ‘As good as it gets’ किंवा ‘Aviator’ सारख्या चित्रपटांमधून आपली ओसीडीशी ओळख होते. तरीही खूप वेळा प्रत्यक्ष उपचार सुरू होईपर्यंत काही वर्षे निघून जातात. पेशंटच्या मनात एकच विचार पुन्हा पुन्हा येतो, बाकी काहीही मनात चालले असले तरी हा एकाच विचार सगळ्यावर कुरघोडी करतो. आपल्या मनात येणारा विचार कितीही निरर्थक असला तरी आपल्या नियंत्रणाबाहेर आहे असे त्याच्या लक्षात येते, पण त्याला असे निरर्थक विचार इतरांना सांगण्याची लाज वाटू लागते.

हेही वाचा… Health Special: पावसाळी वातावरणाचा आणि शरीरातील हार्मोन्सचा काय संबंध?

मनातला विचार खूप बेचैनी, अस्वस्थता निर्माण करतो. मनात सतत भीती, चिंता असते. ती कमी व्हावी आणि तो विचार येणे कमी व्हावे यासाठी काही कृती परत परत केल्या जातात. कधी कसलातरी संसर्ग होईल असे वाटून हात परत परत स्वच्छ करावेसे वाटतात, कधी प्रत्येक कृती विशिष्ट वेळा मोजून, उदा. दहा वेळा, अकरा वेळा, कृती करावी असे वाटते; तर कधी मनात सारखी शंका आल्यामुळे परत परत तपासून पाहावेसे वाटते, म्हणजे दार नीट बंद केले की नाही, दिव्याचे बटण बंद केले की नाही इत्यादी. सुरुवातीला तर आपले आपणच आपल्या विचारांवर आणि वागण्यावर ताबा मिळवू शकू असे पेशंटला वाटते. ते जमत नाही, पण आपले विचार, वागणे बालिश आहे का, खूपच विचित्र नाही ना या कल्पनेने इलाज करणे लांबणीवर पडते.

खरे तर जितक्या लवकर मनोविकारतज्ज्ञ आणि मानसोपचारतज्ज्ञाकडे पेशंट जाईल तितक्या लवकर त्याला बरे वाटू लागते. जितक्या उशीरा इलाज सुरू होतो, तितकी उपचारांची परिणामकारकता कमी होते, हे लक्षात घेतले पाहिजे. मनातली शरमेची, कलंक असल्याची भावना काढून टाकली तर मदतीची दारे उघडतात आणि आपल्या मनाची कवाडेही उघडतात. चिंतेच्या, भीतीच्या छायेमधून बाहेर पडता येते. सिरोटोनिन या रसायनाच्या संतुलनात झालेला बिघाड दुरुस्त करणारी औषधे देता येतात, त्याच बरोबर बेचैनी कमी करण्यासाठीही औषधे दिली जातात. औषधे दीर्घकाळ चालतात, कारण हा आजारही दीर्घकाळ चालणारा आहे आणि मानसिक ताणताणाव वाढला की आजार पुन्हा बळावण्याची शक्यता
असते.

हेही वाचा… Health Special: कोड असलेल्या व्यक्तीने काय काळजी घ्यावी? (उत्तरार्ध)

मनातल्या विचारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी विचारनिष्ठ मानसोपचार अतिशय परिणामकारक ठरतो. मनातल्या विचारांची शक्याशक्यता तपासून पाहायला मानसोपचार तज्ज्ञाच्या मदतीने शिकता येते. मनातला पुन्हा पुन्हा येणारा विचार स्वीकारून, त्याला पर्यायी वास्तववादी, व्यवहारी असा विचार कोणता याचे पर्याय शोधता येतात. विचारांमध्ये परिवर्तन आणण्याबरोबरच वर्तणुकीवर उपचाराची गरज असते. मनातली बेचैनी कमी करण्यासाठी शिथीलतेचे व्यायाम (relaxation exercise), एखादी कृती पुन्हा पुन्हा न करता मनातली बेचैनी सहन करायला शिकणे असे अनेक उपाय केले जातात. परत परत… पुन्हा पुन्हा अशा बेचैन अवस्थेतून पेशंट बाहेर पडतो आणि शांतपणे प्रत्येक कृती आणि विचार पूर्णत्वास नेतो!

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is ocd hldc dvr
Show comments