मन वढाय वढाय
उभ्या पिकातलं ढोर|
किती हाकला हाकला
फिरून येतं पिकांवर ||

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

खान्देशकन्या बहिणाबाई चौधरींच्या या ओळी मनाच्या चंचलतेबद्दल आपल्याला बरच काही सांगून जातात. अशा अस्वस्थ मनाला स्वस्थ ठेवण्यासाठी त्याला समजणे अत्यंत महत्वाचे आहे . हे ‘मानसिक आरोग्य किंवा स्वास्थ्य’ म्हणजे ‘मानसिक आजार’ असा गैरसमज समाजात आहे. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या व्याख्येनुसार मानसिक आरोग्य म्हणजे अशी स्वास्थ्यस्थिती ज्यामध्ये प्रत्येक व्यक्ती आपल्यातील क्षमता ओळखून त्याजोगे पुरेपूर वागू शकेल, दैनंदिन जीवनातील ताणतणावांचा सामना करू शकेल, उत्पादनक्षमपणे कार्यरत राहील व समाजाप्रती योगदान करू शकेल. मानसिक स्वास्थ्य हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. आपले विचार, भावना आणि वर्तन या तीन गोष्टी मानसिक संतुलनाचा आधार आहेत. परंतु व्यक्ती आणि परिस्थितीनुसार या तीन गोष्टी बदलतात. तेव्हा हे संतुलन बिघडून मानसिक आजार उद्भवू शकतात.

आजच्या धावपळीच्या युगात संसाधनां पलीकडे मागण्या, वाढते कामाचे तास, आजारग्रस्तांची काळजी घेणे, आर्थिक समस्या, एकटेपणा अशी अनेक कारणे आव्हानांचा सामना करण्याच्या क्षमतेला आव्हान देतात. त्यातच ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ म्हणजे अनेकांचे स्वभावदोष मन अस्वस्थ करतात. उत्तम मानसिक आरोग्य असलेल्या व्यक्ती बिकट स्थितीत ताणतणाव कसा कमी करावा यावर उपाय शोधू शकतात. दुसऱ्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करतात आणि प्रसंगी चुकीच्या गोष्टींना विरोध करून योग्य निर्णय घेतात.

हेही वाचा… Health Special: आल्हाददायक शरद ऋतू शरीरासाठी असतो तरी कसा?

मानसिक आरोग्याचा थेट संबंध शारीरिक आरोग्याशी आहे. डिप्रेशन, अ‍ॅन्झायटी सारखे आजार डोकेदुखी, पचनसमस्या, मधुमेह, उच्च रक्तदाब अशा अनेक आजारांना निमंत्रण देतात. म्हणूनच शरीराबरोबर मनावर लक्ष देणे आवश्यक आहे. Emotional Intelligence (EI ) म्हणजे भावनात्मक बुद्धीमत्ता यात महत्वाची भूमिका बजावते. EI चांगला असल्यास विचारक्षमता, निर्णयक्षमता सुधारते. स्वतःची जाणीव होणे, आवेगावर नियंत्रण येणे, दुसऱ्याबद्दल सहानुभूती निर्माण होणे, कामात चिकाटी असणे आणि प्रेरणा मिळणे अशा अनेक चांगल्या गोष्टी भावनात्मक बुद्धीमुळे सतत सोबत राहतात आणि नातेसंबंधामध्ये होणारे संघर्ष कमी करण्यास मदत तर करतातच त्याचबरोबर मन शांत ठेवण्यास मदत करतात.

हेही वाचा… Health Special: कोणत्या प्रकारची कॉफी आरोग्यासाठी उत्तम? केव्हा आणि कशी प्यावी?

बालपणी अनुभवलेली हिंसा, कर्करोग किंवा मधुमेहासारखे आजार, मेंदूतील रसायनांत झालेला बदल, मादक पदार्थांचे सेवन, डोक्याला गंभीर मार लागणे, आकडीची समस्या अशी अनेक कारणे मानसिक आजाराशी निगडीत आहेत. भारतात प्रत्येक ८ पैकी १ जण मानसिक आजाराने ग्रस्त आहे. आजची मुलही सोशल मीडियाच्या काळात एकाकी आहेत. फोनवर मित्रांची गर्दी असते पण गरजेच्या वेळी समजून घेणारे मित्र त्यांना सोबत नसतात, हे सगळे थांबावयास हवं. सतत कुणा ना कुणाशी जोडलेलं असणं ही त्याची गुरूकिल्ली आहे. स्वतःबरोबर आपल्या लोकांची विचारपूस करणे, गरज पडल्यास त्यांना मदत करणे, सकस आहार आणि पुरेशी झोप घेणे, आवडीचा व्यायाम, प्राणायाम करणे, नकारात्मक बातम्या कमी ऐकणे महत्वाचे आहे. ‘गुड फिलिंग’चा व्हायरस समाजात पसरवणे काळाची गरज आहे!

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is the benefit of emotional intelligence hldc dvr