Health Special: मेअखेर आणि जून महिन्याची सुरुवात झाली की, दरवर्षीप्रमाणे सगळ्यांनाच दहावी- बारावीच्या, विविध प्रवेश परीक्षांच्या रिझल्टचे आणि पुढच्या कॉलेज प्रवेशाचे वेध लागतात. हा तोच काळ असतो की, ज्या वेळेस यशस्वितांचे कोडकौतुक होते आणि चांगले गुण मिळूनही अनेकांच्या माथी अपयशाचा शिक्का मारला जातो. अनेकदा गोष्टी सापेक्ष असतात आणि त्या कायमस्वरूपीही नसतात हेही आपण विसरतो. इथूनच अपयशाची भीती मनात बसते

यशाची सर्वमान्य परिमाणे

निकालाच्या काळात वर्तमानपत्रात छापून येणारी ९७-९८%, अगदी १००% अशी टक्केवारी, ती मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचे फोटो आणि त्यांनी मिळवलेल्या यशाचे रहस्य जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांनाच असते. त्या बरोबरच विविध परीक्षांमधील अनिश्चितता, खूप वेळा होणाऱ्या कोर्ट- कचेऱ्या या सगळ्यामुळे ताणही बराच असतो. त्यातच आपण यशस्वी होऊ की नाही, स्पर्धेमध्ये टिकू की नाही, ही भीती असते. ९७-९८% गुण मिळवणारा विद्यार्थी यशस्वी आणि ८०% गुण मिळवणारा विद्यार्थी तितकासा यशस्वी नाही, अशी सर्वसाधारण समजूत असते; यशाची अशी काही सर्वमान्य परिमाणे आपण ठरवून टाकली आहेत.

हेही वाचा : दिवसभराचा थकवा घालवण्यासाठी संध्याकाळी करा ही योगासने, एकदा Video पाहाच

अपयशाची भीती

परीक्षेतील गुणवत्ता, शिक्षणातील डिग्री, चांगली नोकरी, लठ्ठ पगार, अशी ही एक चढती कमान असते. परीक्षेत यश मिळवले पाहिजे म्हणजे चांगली नोकरी लागेल, चांगली नोकरी लागली तर चांगले घर, गाडी आदी गोष्टी मिळतील म्हणजेच आयुष्यात यशस्वी व्हायला मदत होईल; असे आपण लहानपणापासून शिकतो. आपोआपच परीक्षेचे महत्व मनात प्रचंड वाढते आणि परीक्षेत अपयश म्हणजे आयुष्यात अपयश अशी आपली समजूत होते! अपयशाची भीती मनात निर्माण होते. ‘मला पुरेसे मार्क मिळतील ना?’ अशी शंका मनात येऊ लागते. आत्मविश्वास नाहीसा होतो, मग आपोआप प्रयत्न न करता विद्यार्थी अभ्यासाची टाळाटाळ करू लागतो. झोपा काढणे, भटकणे, मोबाईलवर चॅटिंग करणे, ओटीटी प्लॅटफॉर्मवर तासन् तास सिरीज बघत बसणे अशा गोष्टी करण्यात वेळ घालवतो आणि मग पुन्हा अभ्यास झाला नाही म्हणून टेन्शन घेऊन बसतो.

भीतीचे दुष्टचक्र

भीतीचे दुष्टचक्र सुरु झाले की, तो यशापासून दूर जाऊ लागतो. भीतीने झोप येईनाशी होते. छातीत धडधडू लागते, अभ्यासात लक्ष लागत नाही, भूक मंदावते. तो चिंताग्रस्त होतो. इतका की, मनोविकारतज्ज्ञाची मदत घेण्याची वेळ येते. अशावेळी औषधगोळ्या आणि मानसोपचार यांचा त्याला नक्कीच फायदा होतो. यश आणि अपयश म्हणजे काय याची स्पष्टता येऊ लागते. विद्यार्थ्याप्रमाणेच नवीन नोकरीला लागलेल्या तरुण- तरुणींचीही अवस्था अशीच होऊ शकते. हल्ली स्पर्धेच्या क्षेत्रांमध्ये व्यवसायात नेमून दिलेले लक्ष्य दिलेल्या वेळेत पूर्ण कसे होईल, आपल्याला प्रमोशन कसे मिळेल, अशा चिंता अनेकांना सतावतात. म्हणूनच यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली कोणती, हे जाणून घेतले तर आपल्या वाटचालीला नक्कीच मदत होऊ शकते. यशस्वी जीवनाचे रहस्य जाणून घेण्याआधी ‘यश’ म्हणजे काय ते जाणून घेतले पाहिजे. एखादी गोष्ट ठरवून मिळवणे, आपण ठरवलेले ध्येय पूर्ण करणे म्हणजे यश मिळवणे. यश नेहमी वैयक्तिक असते. त्या- त्या माणसाचे असते. उदा. ८०-८५% मार्क मिळवणाऱ्या विद्यार्थ्याचे लक्ष्य ८०% मिळवणे असे असेल तर त्याचे उद्दिष्ट साध्य झाले आणि त्याला यश मिळाले असे म्हणता येईल. यातून त्याचे त्यालाच समाधान मिळते.

हेही वाचा : बीटाचा रस पिण्याचे फायदे वाचलेत का? ‘या’ वयोगटातील महिलांना होऊ शकतो मोठा लाभ; अभ्यासात सांगितले आहे ‘हे’ योग्य प्रमाण

वास्तववादी महत्त्वाकांक्षा महत्त्वाची

‘माझे स्वप्न’, ‘माझे ध्येय’, ‘माझी महत्वाकांक्षा’ पूर्ण करण्यासाठी प्रत्येक जण झटत असतो. पण तरी कुणी यशस्वी होतो, कुणी नाही. असे का होते? बिल गेट्स सारखा माणूस आपले महविद्यालयीन शिक्षण अर्धवट सोडून ‘मायक्रोसोफ्ट’ ही छोटीशी कंपनी काढतो आणि जगातला सर्वात श्रीमंत माणूस होतो. म्हणजेच शैक्षणिक अर्हतेबरोबरच इतरही काही गुणवैशिष्ट्यांचा यशस्वी होण्यासाठी उपयोग होतो. स्वप्ने पाहणे, महत्वाकांक्षा असणे योग्यच, पण ती महत्वाकांक्षा वास्तववादी असेल, तर पूर्ण होऊ शकते. सातत्याने, अविरत कष्ट केल्याशिवाय यश मिळत नाही. ‘मी डॉक्टरच बनणार’ असे ध्येय बाळगणाऱ्या विद्यार्थ्याची बौद्धिक क्षमता, कष्ट करण्याची तयारी आणि मानसिक तयारी या सगळ्यावर त्याला त्याच्या प्रयत्नांत यश मिळणार की नाही हे ठरते.

ध्येयाच्या दिशेने…

ध्येयाच्या दिशेने वाटचाल करताना अपेक्षित यश मिळाले नाही, तर आपण अपयशी ठरलो असे वाटते. पुरेसे मार्क न मिळणे, हवी तशी नोकरी न मिळणे, व्यवसायात नफा न होणे अशी अपयशाची अनेक कारणे असतात. अपयशाने माणूस खचून जातो. मनात निराशा निर्माण होते. आपल्या, कुटुंबाच्या आणि समाजाच्या अपेक्षा पूर्ण करता आल्या नाहीत तर आपल्याच नजरेतून आपण न्यून ठरतो. जगण्यात काही अर्थ उरला नाही असे वाटू लागते आणि आत्महत्त्येचे विचार येतात आणि काही जण तसा प्रयत्नही करतात.

हेही वाचा : ‘व्हिटॅमिन सी’ अति सेवनाचे दुष्परिणाम तुम्हाला माहिती आहेत का? तज्ज्ञांकडून जाणून घ्या…

आत्मपरीक्षण गरजेचे

अपयशाला तोंड देताना आत्मपरीक्षण करणेही गरजेचे असते. आपले ध्येय व्यावहारिक आहे ना, हे तपासून पाहावे लागते. आपल्या अपयशाची जबाबदारी स्वीकारण्याचे धैर्य दाखवावे लागते. जबाबदारी घेणे म्हणजे स्वतःला अपराधी समजणे नाही, तर आपल्या प्रयत्नांचे, मनातल्या भावभावनांचे मूल्यांकन करणे. मनात दुर्दम्य आशावाद असला की, यश हमखास मिळते. अपयशानंतरही आशा सोडली नाही तर परिस्थिती बदलण्याचे बळ येते. आशावादाबरोबर आत्मविश्वासही निर्माण करावा लागतो. या दोन्हीमुळे परिश्रम कठीण वाटत नाहीत. आशावादाच्या जोरावर संकटांना सामोरे जाण्याचे बळ येते. आपल्यातील कमतरता ओळखून त्या दूर करण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. उदा. अभ्यासात हुशार पण संवाद कौशल्यात कमी अशा व्यक्तीने संवाद कौशल्य मिळवले तर नोकरी व्यवसायातही यश मिळणे सोपे जाते. कमतरतांबरोबर आपल्यातील चांगल्या गुणांचे सतत स्मरण ठेवले तर आत्मविश्वास वाढतो. आपलेच ध्येय आपणच तपासून पहिल्याचा उपयोग होतो. आपल्यासमोर असलेल्या विविध पर्यायांचा विचार केला तर हे लक्षात येते, की एकाच कुठलीतरी गोष्ट केली, उदा. सीए केले, तरच मी यशस्वी अन्यथा नाही, असे असण्याची गरज नाही. एक दरवाजा बंद झाला तरी दूसरा कुठला तरी नक्की उघडतो. आशावाद हे ही शिकवतो.

मनाचे रिकामपण आणि मोह

मनाचे रिकामपण (mindlessness) लक्षात यावे म्हणूनही काही युक्त्या लढवाव्या लागतात. उदा. दर तास दोन तासांनी गजर लावणे. गजर झाला की स्वतःलाच विचारावे, ‘मी आत्ता काय करतो आहे? काय विचार मनात येताहेत? काय भावना मनात आहेत? मला आत्ता हेच करायचे आहे का?’ अस विचार केला की आपले मन जागे होऊन पुन्हा कामाला लागते. तसेच मोहाला काही काळ तरी दूर ठेवण्याचे मनाला प्रशिक्षण द्यावे लागते. उदा. अभ्यास पूर्ण करूनच टीव्ही बघेन असे ठरवणे. अभ्यास केल्यावर टीव्ही बघितला की, ते एक प्रकारचे आपल्या कष्टांचे बक्षीसच असते. जर आधीच टीव्ही बघण्यात वेळ घालवला तर मनात प्रचंड अपराधीपणाची भावना निर्माण होते आणि अभ्यास करताना लक्ष लागत नाही, आत्मविश्वास कमी होतो आणि आपण यशापासून दूर जाऊ लागतो.

हेही वाचा : खूप रागावल्यावर खरंच हृदयविकाराचा झटका येतो का? तळपायाची आग मस्तकात जाताना नेमकं शरीरात घडतं काय?

यशाच्या दिशेने प्रवास…

परीश्रमांबरोबर विश्रांती, विरंगुळा, करमणूक यांचीही आवश्यकता असतेच. तरच उत्साह टिकून राहतो. यशाविषयीच्या या चर्चेत आणखी एक मुद्दा महत्त्वाचा ठरतो. ऐहिक गोष्टी मिळवणे म्हणजेच यशस्वी होणे हे कितपत खरे आहे? जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हरसारखा माणूस अन्नटंचाईच्या संकटावर मात करण्यासाठी भुईमुगाची शेती करायला लागतो, भुईमुगाच्या अनेक जाती विकसित करतो. वैयक्तिक यशाच्या पलीकडे जाऊन तो यशस्वी ठरला, असे म्हटले पाहिजे. जे काम करताना आपल्याला आनंद मिळतो, मनाला समाधान लाभते ते करणे म्हणजे यशस्वी होणे. शिक्षण, पैसा याबरोबरच शारीरिक, मानसिक आरोग्य जपणे, कौटुंबिक, सामाजिक नातेसंबंध , मित्रपरिवार राखणे, समाजोपयोगी काम करणे यातून यश मिळत राहते. म्हणून यशापयशाची मानसिकता जाणून घेतो त्याच क्षणापासूनसुद्धा आपण यशाच्या दिशेने प्रवास सुरु करू शकतो.