मुक्ता चैतन्य

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतातल्या माणसांचा सरासरी स्क्रीन टाईम जवळपास ७ तास १८ मिनिटे इतका आहे. यात सर्वप्रकारचे स्क्रीन्स आले. कोविडनंतर स्क्रीन टाइम किती हवा आणि किती स्क्रीन टाईम योग्य हे दोन्ही प्रश्न अतिशय अवघड होऊन बसले आहेत. मुलांचा स्क्रीन टाईम प्रचंड आहे हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. भारतीय माणसाचा सरासरी स्क्रीन टाइम जरी ७ तासांचा असला तरी आजवरच्या माझ्या कामाच्या अनुभवातून माणसं झोपतात तेवढीच स्क्रीन पासून दूर असतात असं दिसून आलेलं आहे. मुळात मोबाईल, टीव्ही किंवा टॅबचा स्क्रीन कशासाठी वापरायचा आणि कशासाठी नाही याचा ताळमेळ अजूनही आपल्याला घातला येत नाहीये. या सगळ्याचा विचार करेपर्यंत करोना महामारी आणि लॉकडाऊन येऊन आदळल्यामुळे त्या दोन वर्षांच्या काळात तर मोबाइलनेच आपल्याला विविध स्तरांवर तारलेलं आहे. पण आता जेव्हा आपण पूर्वीचे सुरळीत आयुष्य जगायला सुरुवात केलेली आहे तरीही कोव्हीड काळात जे बदल अपरिहार्यता म्हणून आपण स्वीकारले होते ते अजूनही पूर्ववत करायला आपण तयार नाही.

आणखी वाचा: Mental Health Special: शाळकरी मुलांहाती मोबाईल …

माणसं यापुढे हायब्रिड आयुष्यच जगणार आहेत असं मानलं तरीही ज्या गोष्टी सहज ऑफलाईन होणं शक्य आहे त्या ऑनलाईन करणं यातून आपणच आपल्याला चुकीच्या सवयीच्या बेड्या ठोकून घेतो. उदा. करोना काळात जेव्हा शाळा ऑनलाईन गेल्या तेव्हा मुलांना सोयीसाठी गृहपाठ whatsapp वर दिला जायचा. अनेकदा इंटरनेट कमकुवत असायचे, ऑनलाईन शाळा मुलांना करायची सवय नव्हती त्यामुळे या गोष्टी करणं भाग होतं. पण शाळा परत ऑफलाईन सुरु झाल्यानंतरही या गोष्टी आजही अनेक शाळांमध्ये सुरु आहे. आजही गृहपाठ मुलांना शाळेत न देता whatsapp वर किंवा शाळेच्या वेबसाईटवर दिला जातो. हे दिसायला कितीही सोयीचं आणि फॅन्सी दिसत असलं तरी मुलांमध्ये जी कौशल्ये विकसित होण्याची गरज असते ती अशा गोष्टींमुळे आपण मारून टाकतो. आता गृहपाठाचेच उदा. घेऊया. शाळेत गृहपाठ जेव्हा दिला जातो तेव्हा तो लिहून घेणं, व्यवस्थित लिहून घेणं, किंवा शिक्षकांनी सांगितलेल्या सूचना नीट समजून घेणं, त्याप्रमाणे गृहपाठ पूर्ण करणं ही सगळी जीवन कौशल्ये आहेत. जेव्हा मुलांना आयता गृहपाठ मिळतो तेव्हा यातली अनेक कौशल्ये वजा होऊन जातात. गृहपाठ हे फक्त वह्या भरण्याचे काम नाहीये. दुसरं कामाच्या निमित्ताने हे अनेकदा जाणवले आहे की शाळेतून मिळालेला ऑनलाईन अभ्यास, गृहपाठ बघण्यासाठी म्हणून मुलं पालकांकडे मोबाईल मागतात (जर त्यांच्याकडे स्वतःचा मोबाईल नसेल तर), जर त्यांच्याकडे त्यांचा स्वतःचा मोबाईल असेल तर त्यात डोकं घालून बसतात. गृहपाठ बघणं ही पाचसात मिनिटांची फारतर फार गोष्ट असते पण हातात मोबाईल आला की रील्स बघत बसणं, गेमिंग करत बसणं या गोष्टी सुरु होतात आणि त्यात वेळ जायला लागतो.

स्क्रीन टाईम मार्गदर्शक तत्वं

आणखी वाचा: सर्फिग : हमारी ही मुठ्ठी में आकाश सारा

अशा अनेक गोष्टी अधोरेखित करता येतील. मुळात मुद्दा हा आहे की शालेय मुलांच्या संदर्भात अनेक जीवन कौशल्ये विकसित होत असतात, पण ज्या गोष्टी ऑफलाईन शक्य आहेत त्याही ऑनलाईन केल्यामुळे हा जीवनकौशल्य विकास आपण मारून टाकतो. सतत गेमिंग किंवा चॅटिंग करणाऱ्या मुलांमध्ये नजरेला नजर न देता येण्याची समस्या मी अनेकदा बघितली आहे. या मुलांना समोरच्या व्यक्तीशी नजरेला नजर देऊन बोलता येत नाही. त्यांची नजर सतत भिरभिरत असते कारण अशा संवादाची त्यांची सवयच मोडून जाते. टीव्ही आला तेव्हापासून मोठ्यांच्या जगाने त्यांच्या सोयीसाठी मुलांना टीव्हीसमोर बसून जेवायची सवय लावली होती. त्या पिढीच्या मुलांना मुलं झाल्यावर ती सवय मोबाईल बघत जेवण्याकडे वळली आहे. या सगळ्यात मुलांचं विविध स्तरीय नुकसान होतं पण याबाबत तेव्हाही पालक निष्काळजी होते, आजही पालक निष्काळजी आहेत. पण जेव्हा मामला फक्त टीव्ही पुरता मर्यादित होता तेव्हा तो टीव्ही कधीतरी बंद होत होता, आता मोबाईल २४/७ आपल्या खिशात आणि मुलांच्या हातात आहे अशावेळी मोठ्यांच्या जगाने निष्काळजीपणा दाखवून चालणार नाही.

तुमचा मोबाईल, टॅब, लॅपटॉप आणि टीव्ही यांचा वापर मिळून तुमचा दिवसाचा स्क्रीन टाईम ठरतो. त्यामुळे तो किती असावा असा विचार जेव्हा कराल, तेव्हा या सगळ्याचा एकत्रित विचार आवश्यक आहे. कशासाठी स्क्रीन वापरात आहात, तुमचा हेतू काय आहे, याची स्पष्ट कल्पना असायला हवी. अनेकदा निर्हेतुक आणि उगीचच सतत मोबाईल बघितला जातो. त्यामुळे स्क्रीनसमोर वेळ देण्यामागचा उद्देश स्पष्ट हवा. अति स्क्रीन टाईममुळे शारीरिक आणि मानसिक समस्या तयार होतात. झोपेच्या समस्या, पाठदुखी, डोळ्यांच्या समस्या, डोकेदुखी अशा प्रकारच्या शारीरिक समस्या निर्माण होतात. नैराश्य, अस्वस्थपणा, रागीटपणा, सतत उदास वाटणं अशा स्वरूपाच्या मानसिक समस्याही उद्भवतात. तर मुलांच्या आकलन कौशल्यावरही अति स्क्रीन टाईमचा परिणाम होतो. एखाद्या गोष्टीचं आकलन, विचार करणं, विश्लेषण करणं, वाचन, भाषा, स्मृतीवरही अनेकदा अति स्क्रीन टाईमचा परिणाम होतो. मुलांच्या संदर्भात एकाग्रता नष्ट होणं, लक्ष न लागणं, सलगपणे एखादी गोष्ट करता न येणं अशा अनेक समस्या उद्भवू शकतात, हे लक्षात घेतलं पाहिजे.

स्क्रीन टाइम किती हवा, यापेक्षाही आपल्याला सतत मोबाईल लागत नाही हे मान्य करणं आताच्या घडीला अत्यावश्यक आहे. मोबाईल आपण कशासाठी वापरायचा, कशासाठी वापरायचा नाही या डिजिटल विवेकाचा भाग आहे. त्यावर मोठ्यांच्या जगाने गांभीर्याने विचार करायला हवा.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What should be screen time for children gadgets social media smartphone devices hldc psp
Show comments