Health Special पावसाळ्याचा बेत म्हटलं की, गरमागरम वड- भजी असंच चित्र डोळ्यासमोर येतं. पण अनेकदा या भजी आणि वड्यांवर ताव मारलयानंतर पोटाच्या तक्रारी सुरू होतात. अशा वेळेस पावसाळ्यात काय खावं आणि काय टाळावं हे आधीच ठावूक असेल तर?

पोट बिघडलंय

“पल्लवी पावसाळा सुरु झालाय आणि आता माझं सगळं डाएट बिघडणार आहे. एकतर पालेभाज्या बंद होणार आहेत आणि मला इतकी भूक लागते आहे गेले काही दिवस की, …”- रीमा सांगत होती .
“माझं दर पावसाळ्यात असंच होतं. सगळं जैसे थे वर येत”
“कालपासून पोट बिघडलंय “
“काय खाल्लं होतं?”
“सगळं नॉर्मल डोसा, पोळी भाजी, पेर, दाणे संध्याकाळी सँडविच, एवढंच खाल्लय.”
“ चटणी खाल्लीय का ?”
“हो, पुदिना आणि खोबऱ्याची चटणी – ती एकच बाहेरून खाल्लीये”
मला रीमाच्या पोटाच्या तक्रारींचे आणि खाण्याचे धागे हाती लागू लागले आणि दाणे- पुदिना रोस्टेड होते.
(अलीकडे रोस्टेड आणि बेक्ड या नावाने एक मीठ आणि मसाल्याची जोरदार धूळफेक बाजारपेठेत सुरु आहे. त्यावर एक सविस्तर लेख लवकरच)

हेही वाचा : Health Special: लसूण आरोग्यासाठी किती फायदेशीर?

मला नेमका संदर्भ लागला आणि मी रीमाला आहारविषयक बदल ठरवून दिले. तिचं आहार नियमन करता करता पावसाळा आणि त्यासोबत आहारात करता येण्याजोगे लहानसहान बदल याबद्दल मनात विचारचक्र सुरु झालं.
ऋतुमानातील बदलानुसार आहारात बदल करणं आवश्यक आहे, हे अनादी अनंत काळापासून सत्य आहे. उन्हाळा सरत सरत पावसाळ्याची चाहूल सगळीकडेच लागली आहे. अनेक ठिकाणी मान्सून ट्रेक्स आणि पर्यटनाचे प्लॅनिंग सुद्धा सुरु झाले आहे.

मोजकीच प्रथिनं

त्यामुळे आता पावसाळ्यात नेमका डाएट कसं सांभाळावं हा प्रश्न सर्रास विचारला जातो. पावसाळ्यात महत्वाचं असतं ते पाण्यामुळे होणारे आजार न होऊ देणं. उन्हाळ्याच्या दिवसात आपली पचनशक्ती थोडी संथ होते आणि त्यामुळेदेखील रोगप्रतिकारशक्ती कमी होऊ शकते. पावसाळ्यात प्रथिनांचं प्रमाण मोजकं ठेवावं.

हेही वाचा : Masaba Gupta: गरोदरपणात सर्दी, खोकला झाल्यास काय करावं? मसाबा गुप्ताचा ‘हा’ घरगुती उपाय तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल का? तज्ज्ञांचे मत जाणून घ्या

कोबी, फ्लॉवर टाळा

पावसाळ्यातील भाज्या कोणत्या खाव्यात हा प्रश्न पडणं साहजिक आहे. पावसाळ्यात शक्यतो काकडी, मुळा , भेंडी , तोंडली, गाजर ,बीट यांचे आहारातील प्रमाण वाढवावे . पालेभाज्या चोखंदळ निवडाव्यात. शक्यतो कांद्याची पात, फ्लॉवर, कोबी यासारख्या भाज्या कमी खाव्यात. यातील पाण्याचे प्रमाण संसर्गजन्य रोगांचे प्रमाण सोबत घेऊन येतं. त्यामुळे या भाज्या न खाणे उत्तम.

तळलेले पदार्थ, सूप आणि भाजी

पावसाळा आणि मक्याचे कणीस, भजी यांचे वेगळे नाते जनमानसात रुजलेले आहे. एखाद्या दिवशी तळलेल्या पदार्थांचा बेत असेल तर मुळात प्रमाणात खाणं आणि पुढच्या जेवणात भाज्यांचं सूप किंवा भरपूर भाजी असणारा आहार घेणं महत्वाचं आहे.

हळद

पावसाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी हळदीचे दूध पिणे उत्तम. शक्यतो रात्री झोपताना हळद-दूध प्यायल्यास उत्तम झोप लागू शकते. ज्यांना हॉर्मोनल / शारीरिक ग्रंथींचे विकार आहेत त्यांनी रात्री झोपताना गरम पाण्यातून एक चिमूट हळद एकत्र करून हे पाणी नक्की प्यावे.

हेही वाचा : स्टेनलेस स्टील, नॉन-स्टिकच्या तुलनेत नवा कूकवेअर आरोग्यासाठी फायदेशीर; जाणून घ्या तज्ज्ञांचे मत…

मसाला चहा

भारतीय मसाल्यांचे- त्यातील योग्य मसाल्याच्या पदार्थांचे योग्य प्रमाणात मिश्रण चहासोबत एकत्र करून आपला नेहमीच चहा आणखी आरोग्यदायी ठरू शकतो . विशेषतः त्यात साखरेचे प्रमाण शून्य ठेवणे केव्हाही उत्तम. उदाहरणार्थ चहामध्ये आलं , वेलदोडे , बडीशेप, दगडफूल, चहाची पात, गुलाबाच्या पाकळ्या यासारखे पदार्थ एकत्र केल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास आणि पावसाळ्यातील चहाची तल्लफ पूर्ण होण्यास मदत होते.

लसूण

हिरव्या लसूणपातीचा पराठा, मिरची- लसूण ठेचा, लसूण चटणी यांना भारतीय आहारात महत्वाचे स्थान आहे. पावसाळ्यात विशेषतः तळलेले किंवा मसालेदार पदार्थ खाण्याची इच्छा असल्यास आहारात लसूण जरूर समाविष्ट करावी. शरीरातील चयापचय क्रिया वाढविणारे आणि रोगप्रतिकारशक्ती शाबूत राखण्यासाठी लसूण अत्यंत गुणकारी आहे.

मक्याचे कणीस

पावसाळा आणि मक्याचे कणीस यांचं जवळच नातं आहे. उकडलेल्या मक्याच्या दाण्यासोबत एक वाटी उकडलेली कडधान्ये जरूर खावीत. मक्याचे भाजलेले कणीस खाताना अतिरिक्त मीठ आणि मसाले टाळावेत. गोडसर चवीचे कणीस एका वेळी तुम्हाला भरपूर प्रमाणात कर्बोदके देऊ करते, त्यामुळे आहारात कणीस असल्यास इतर पदार्थ प्रथिनांनी भरपूर असणे आवश्यक ठरते.

हेही वाचा : किडनी खराब होण्याआधी शरीर देतं ‘हे’ ८ संकेत; वेळीच ओळखा अन् मूत्रपिंड निकामी होणे टाळा

बेसन

पावसाळ्यात भजी या प्रकाराला अवाजवी महत्व येतं. गरम आणि चटकदार या दोन मुद्द्यांचा विचार करता भजीला प्रदान केलेलं महत्त्व समजण्याजोगं आहे. मात्र तुमचे कोलेस्ट्रॉल जास्त असेल तुम्हाला पचनाचे विकार असतील तर भजीच काय कोणतेही तळलेले पदार्थ कोणत्याही ऋतूत अतिरेकी प्रमाणात वर्ज्य करणे उत्तम! बेसनची कढी, बेसनाचे धिरडे / पोळे / चिला /विविध भाज्या एकत्र करून केलेले बेसनाचे पदार्थ खाणे उत्तम!

उकळलेलं पाणी

पावसाळा आणि आजारपण यांचं विशेष नातं आहे. पावसाळ्यात पाण्यातून संसर्गजन्य आजार वेगाने बळावतात . त्यामुळे पिण्याचे पाणी उकळून घेणे महत्वाचे ठरते. तसेच भाज्या खाताना त्याचे सूप , शिजवलेल्या भाज्यांची कढी अशा स्वरूपात भरपूर पाणी असणारे पदार्थ पिणे उत्तम!