Upset stomach : ठराविक अन्नपदार्थांमुळे तसेच खाण्या पिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे सहसा पोट बिघडते. पोट बिघडल्यानंतर पोटाच्या विविध समस्या व पोटदुखीचा त्रास सहन करावा लागतोच, पण त्याचबरोबर आपण आवडते पदार्थ खाऊ शकत नाही आणि काही कालावधीसाठी चविष्ट नसलेले कंटाळवाणे अन्नपदार्थ खावे लागते. ज्यांचे सतत पोट बिघडते त्यांनी जेवण करावे की नाही, हा एक जुना प्रश्न आहे.

खरंच पोट बिघडल्यानंतर जेवण करणे टाळणे फायदेशीर असते का? पोट बिघडल्यानंतर काय खावे आणि काय खाऊ नये, याविषयी द इंडियन एक्स्प्रेसनी तज्ज्ञांच्या हवाल्याने सविस्तर माहिती जाणून घेतली.

सर एचएन रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलच्या क्लिनिकल आहारतज्ज्ञ वेदिका प्रेमानी सांगतात, “पोट बिघडल्यानंतर जेवण न केल्याने पोटात अन्नापेक्षा जास्त ॲसिड तयार होऊ शकते ज्यामुळे पोट फुगणे, ॲसिडिटी, पोटात अस्वस्थता जाणवणे इत्यादी लक्षणे दिसू शकतात.

हेही वाचा : पित्ताशयातील खडे शस्त्रक्रियेशिवाय नैसर्गिकरित्या काढता येतात का? वाचा डॉक्टरांचे मत

आहारतज्ज्ञ प्रेरणा सोलंकी याविषयी सांगतात, “पोट बिघडल्यानंतर उपवास करावा की नाही किंवा जेवण करावे की नाही, हे पोट बिघडण्याचे कारण आणि त्याच्या तीव्रतेवर अवलंबून असते.
त्या पुढे सांगतात, “जर लक्षणे सौम्य असतील तर तुम्ही थोड्या प्रमाणात एका ठराविक वेळेनंतर जेवण करू शकता. सहज पचणारे अन्नपदार्थ आणि मसालेदार व फॅट नसलेले पदार्थ खाऊ शकता, पण जर लक्षणे गंभीर असतील तर पोटाला आराम द्या आणि जास्तीत जास्त पाणी पिण्याकडे लक्ष केंद्रित करा; तसेच काही तास उपवास करा.”

सोलंकी सांगतात की, जेव्हा तुमचे पोट बिघडते तेव्हा उपवास केल्यामुळे किंवा जेवण न केल्यामुळे तुमच्या पचनसंस्थेला आराम मिळतो.
पण, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे की आपले यकृत आणि किडनी हे नैसर्गिकरित्या शरीरातून विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करतात; त्यासाठी उपवास करण्याची गरज नाही, पण काहीवेळा जेवण कमी केल्याने पोटाच्या समस्या दूर होऊ शकतात.

पोट बिघडल्यानंतर तुम्ही उपवास केला तरी हायड्रेटेड राहणे खूप महत्त्वाचे आहे. पाणी, हर्बल चहा किंवा सूपसारखे द्रव्य पदार्थ प्यायल्याने शरीरात पाण्याची कमतरता भासत नाही. विशेषत: जेव्हा तुम्हाला उलट्या किंवा अतिसाराचा त्रास होत असेल तर शरीर हायड्रेटेड ठेवा.

यावर चांगला उपाय कोणता?

सोलंकी सांगतात, “पोट खराब झाले असेल तर काही कालावधीसाठी उपवास करणे आणि भरपूर पाणी पिणे, हा एक उत्तम उपाय आहे.”

“जेव्हा पोट बिघडल्याची लक्षणे कमी होतात, तेव्हा BRAT ( bananas, rice, applesauce, and toast) आहार घेऊ शकता; म्हणजेच केळी, भात, सफरचंद आणि टोस्टचा आहारात समावेश करू शकता. त्यानंतर तुमचे शरीर वेगवेगळ्या अन्नपदार्थांवर कशी प्रतिक्रिया देते, याकडे लक्ष द्या. जर एखाद्या अन्नपदार्थाच्या सेवनाने तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल तर तुमच्या पोटाला बरे वाटेपर्यंत ते पदार्थ खाणे टाळा” असे त्या पुढे सांगतात.

हेही वाचा : “नवरात्रीमध्ये खा केळ्यांचे वेफर्स, खारीक अन् काजू-बदामाची पुरी”, सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट रुजुता दिवेकरचा सल्ला, तज्ज्ञांचे काय आहे मत?

“दुग्धजन्य पदार्थ, सूप, फळांचा रस, भात यांसारख्या पदार्थांमुळे अतिसार, मळमळ दूर होते, याशिवाय उलट्यांचा त्रास कमी होतो”, असे डॉ. प्रार्थना शाह सांगतात.

डॉ. शाह सांगतात, केळीसारखे पदार्थ खाल्ल्याने पोटॅशियमची पातळी वाढण्यास मदत होते, कारण जे तुमच्या शरीराला इलेक्ट्रोलाइट्स पुरवितात. या दरम्यान जर नारळाचे पाणी तुम्ही प्यायला तर कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि सोडियमसारखे पोषक घटक तुमच्या शरीराला मिळू शकतात. याशिवाय बटाटे आणि टोस्ट हे सुद्धा अत्यंत उपयोगी आहेत, जे तुमच्या पोटातील ॲसिड शोषून घेण्यास मदत करतात.